ज्ञान युद्धाची सांगता...
जोगळेकरांच्या घरी फोन केला आणि प्रेमाबाईंनी तो उचलला की, साहेबांना फोन दिला जायचा. माझा एक प्रश्न ठरलेला. ‘‘हाऊ इज लायन?’’ फोन सावरून जोगळेकर म्हणायचे, ‘‘लायन इज रोअरिंग अॅज चर्चिल रोअर्रड् फॉर युनायटेड किंंगडम.’’ ज. द. जोगळेकर हे असे होते. जोगळेकरांची पहिली भेट कधी झाली ते आठवत नाही, पण त्यांच्याबाबतचा एक प्रसंग नीट आठवतो. २००५ साली ‘सा. विवेक’चा राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार ज.दं.ना देण्यात आला होता. लालकृष्ण अडवाणी, मदनदासजी देवी, प्रमोद महाजन अशा दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमसंपण्यापूर्वीच ते निघाले होते. त्यांच्या सवयीनुसार पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची काही रक्कमघालून तो परत करून ते घरी परतत होते. त्यांना विचारले तर म्हणाले, ‘‘अरे काही कात्रणं काढली आहेत. मग लेख लिहिणार आहे.’’ त्यांचा लेख त्यांच्या डोक्यात घुमत होता. चिंतन, मनन, लेखन हा त्यांचा पिंडच होता. लिखाण ही त्यांच्या आयुष्याची प्रेरणा होती. सतत लिहीत राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तरुण वयात जोगळेकरांनी कुस्तीतही दोन हात केले होते. त्यामुळे तालीम, सराव हा त्यांच्या नित्यकर्माचा भाग होता. कुस्ती सुटली, पण नंतर हाच अभ्यास त्यांनी लिहिण्याच्या बाबतीत आत्मसात केला होता. त्यांच्या लिखाणाची मांडणी कधीच भावनिक आधारावर नव्हती. अत्यंत तर्कशुद्ध आणि भरपूर संदर्भांनी संपन्न असे त्यांचे लिखाण. त्यासाठी ते तितकेच कष्ट घेत. वृत्तपत्रांची कात्रणे, त्यासंदर्भातील विषयवार वाचन, संदर्भांच्या प्रमाणिकरणासाठी टिपणे काढणे, असे त्यांचे कामअव्याहतपणे चालत होते. ‘मध्यपूर्वेचे राजकारण’ या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला. हिंदुत्वनिष्ठांची मुस्लीमप्रश्नाविषयीची मांडणी सर्वश्रुत आहे. पण जोगळेकरांच्या मांडणीत सूत्रबद्ध वेगळेपणा होता. लादेनने केलेल्या अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील हल्ल्यानंतर इस्लामी दहशतवादाचे भयंकर स्वरूप एकदमपाश्चिमात्य राष्ट्रांच्या लक्षात आले आणि या विषयावर अभ्यासपूर्ण पुस्तकांची निर्मिती व्हायला लागली. जोगळेकरांनी या विषयातील जवळजवळ सर्वच पुस्तके मिळवून वाचून काढली होती. ते ‘एशियाटिक’चे लायब्ररीचे सदस्य होते, पण पुस्तकाची भूक त्यांना वाचनालयापुरती मर्यादित ठेवू शकली नाही. त्यांच्या घरात प्रचंड पुस्तके आहेत. टीव्ही वगैरेही ते फारसे पाहत नसत. इंटरनेट न वापरणार्या पिढीचे असल्याने त्यांना मदत लागायची मग फोन करून पुस्तके मिळविण्याची आज्ञा यायची. ‘ऍमेझॉन,‘ ‘फ्लिपकार्ट‘सारख्या संकेतस्थळांवरील उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती जोगळेकरांना कोण देते हे मला आजही न उलगडलेले कोडे आहे. जोगळेकरांना पुस्तके आतूनच सुचायची. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत, त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले होते. जोगळेकरांना अनेक पुरस्कार मिळाले; परंतु त्याच्यालेखी हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार. वृत्तीने लेखक असले तरी जोगळेकर स्वभावाने अत्यंत रसरशीत होते. वाळकेश्र्वरच्या त्यांच्या शांत घरी गेले की, अत्यंत खट्याळ डोळ्यांनी आणि हसतमुख मुद्रेने ते स्वागत करायचे. ‘‘ऐक, तुला एक गंमत सांगतो,’’ असे म्हणून ते जे सुरू व्हायचे त्याला तोड नाही. दोन-तीन तासांची निश्र्चिती. मग राज्यक्रांत्या घडायला सुरुवात व्हायच्या. आपण जोगळेकरांचे बोट धरून दुसर्या महायुद्धानंतरच्या जगाच्या सफरीवर निघालोय, असंच वाटत राहायचं. युद्धाच्या तोफा सरकायला लागायच्या... नेपोलियनपासून ते चर्चिलपर्यंत कोण कोण यात येऊन जायचे. या नायकांची अवतरणे ते अस्खलित ब्रिटिश धाटणीच्या उच्चारात खणखणीतपणे म्हणून दाखवायचे. कधी ती अवतरणे नसायची, तर ते उतारेच्या उतारे सांगायचे. हा सगळा मामला त्यांना तोंडपाठ होता. नुसता तोंडपाठ नाही, तर अचूक. या साधनेचे एक तेज असते आणि ते त्यांच्या रोमारोमात भरलेले होते. जोगळेकर एखाद्या ज्ञानयोद्धाच्या आर्विभावात बोलत; किंबहुना तोच त्यांचा स्थायी भाव होता. त्यांची मूळ कथा नेपोलियनची, पण त्यात केमाल पाशाही जोडला जायचा. हे जरा विचित्र वाटेल, मलाही वाटायचे, पण त्यातच जोगळेकरांचे वेगळेपण होते. अनेकांसाठी अशी युद्धे प्रेरक, रंजक वगैरे असतात. जोगळेकरांना त्यात परस्पर संदर्भ सापडायचे. जागतिक युद्धे ही केवळ पराक्रमाच्या गाथा सांगत नाहीत, तर इतिहास, भूगोल, अर्थकारण आणि राजकारणही बदलतात. ही अनेक वर्षे चालणारी प्रक्रिया असते. ज.दं.ना ही प्रक्रिया उत्तमकळत होती. मराठीत अशी पुस्तकेच नाहीत; किंबहुना मराठीत अशा प्रकारची पुस्तके लिहिणारे ज. द. पहिलेच असावेत. ‘हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व‘ हा त्यांचा १९५० साली लिहिलेला पहिला ग्रंथ. ‘राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयत्व’ या विषयावर त्यांनी भरपूर लेखन केले आहे. हिंदुत्व, भारतीयत्व आणि निधर्मी शासन, जागतिक राष्ट्रवादाचे प्रवाह आणि हिंदुस्थान, हिंदुत्व आणि इतर विचारधारा ही त्यांची अशीच काही पुस्तके. ज.दं.च्या नावावर ३५ एक पुस्तके आहेत. त्यातील ही काही. हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाची मांडणी करताना पाश्चिमात्यांना सरसकट चुकीचे ठरविण्याचा प्रमाद त्यांनी कधीही केला नाही. उलट ज्या ज्या राष्ट्रपुरुषांनी पश्र्चिमेकडे राष्ट्रवादाचे निरूपण केले त्यांची लहान लहान चरित्रेच त्यांनी लेखमालेच्या स्वरूपात लिहून काढली. ‘निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार‘ नावाचे त्यांचे पुस्तक आहे. रूशेल्यू ते केमाल पाशा अशा सात राष्ट्रनायकांचे अत्यंत रंजक आणि तटस्थ चित्रण त्यांनी यात केले आहे. या मंडळींनी त्यांचा त्यांचा राष्ट्रवाद निर्माण करताना काय संकटांना तोड दिले, त्याचे वर्णन त्यांनी यात केले आहे. राष्ट्रवादाच्या संकल्पनांचा विचार करताना असे जागतिक संदर्भ सोडून पुढे सरकता येत नाही. अमेरिकनांच अमेरिकेच्या संदर्भातला ‘ही भूमी आमची आहे आणि तिचे रक्षण करण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ’ हा आणि इतका नेमका अमेरिकन राष्ट्रवाद नेमका कसा आणि कुठून विकसित होतो हे समजायला ज. द. वाचावे लागतात. ज. द. आक्रमक होते. मूळचे सावरकरवादी असल्याने आपला विषय ठामपणे मांडायची त्यांना सवय होती. वाद–विवादात ते कधीच मागे हटले नाहीत. पण भांडण नाही. वादातही अनेक संदर्भ, अवतरणे, किस्से असायचेच. जितक्या चटकन चिडायचे तितक्याच चटकन नंतर शांतही व्हायचे मग हाताचा पंजा दाखवून ‘जरा थांब’ म्हणायचे. आपण जरा जास्तच तापलो, असा काहीसा भाव चेहर्यावर असायचा. ते सदैव योद्ध्याच्या पवित्र्यातच जगले. त्यांचे लिखाणही तसेच होते. तात्यारावांची झुंजार वृत्ती ते आपल्याला वारशात देऊन गेले आहेत असेच समजून ज.द. जगले.
इस्लामी दहशतवादावर बोलणार्या, लिहिणार्यांना जातीयवादी ठरविण्याच्या, त्यांना सार्वजनिक व्यासपीठे उपलब्ध करून न देण्याच्या काळात जोगळेकरांनी आपले लिखाण केले आहे. आज इस्लामी दहशतवादाचे जागतिक स्वरूप लक्षात येत असताना जोगळेकरांसारख्या विचारवंतांनी काय लिहिले होते, हे संदर्भासाठी पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे, पण तेव्हा हे सोपे नव्हते. सत्ता कॉंग्रेसकडे आणि विचारवंतांची शक्तीस्थाने डाव्यांकडे अशा काळात जोगळेकर लढले आहेत. उजव्या विचारांच्या विचारवंतांची कुचेष्ठा, अवहेलना होत असताना ते लिहीत राहिले. या सगळ्या कामात त्यांच्या पत्नीने त्यांना खूप साथ दिली. डॉ. शोभा जोगळेकर या प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ. ज.दं.च्या सगळ्या कामाला त्यांनी सर्वप्रकारे हातभार लावला. ज.दं.ना या त्यांच्या कामासाठी सर्व प्रकारे मोकळे ठेवले. ज.दं.नी त्याची पूर्ण जाण ठेवली. ते त्यांना प्रेमाने डॉक्टर म्हणत. कधी खूप खिन्न झाले किंवा उत्साहात आले की, ज. द. उसळून म्हणायचे, ‘‘ए...आज डॉक्टर असती तर?’’ दुदैवाने डॉक्टर त्यांच्या आधीच गेल्या. मुले अमेरिकेत स्थायिक झाली. ज. द. मात्र कधीही अमेरिकेत रमले नाहीत. तिथे जाऊन ते भरपूर पुस्तके घेऊन यायचे. त्यांना इथे त्यांच्या हिंदुस्थानातच राहायचे होते. काही ना काही कारण काढून जोगळेकर अमेरिकेहून मुलाकडून परत येत. दोनदा ते आता परत येणार नाही, असे सांगून गेले होते. परत आल्यावर भेटायला गेलो तर डोळे मिचकावून म्हणाले, ‘‘अरे! आपलं सगळं इथेच आहे.’’ खरोखरच त्यांचं सगळं इथेच होतं.