आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजार आणि पाचशेच्या नोटा मध्यरात्रीपासून चलनातून रद्द होणार असे जाहीर केले आणि मी पहिलं काम केलं ते म्हणजे माझी पर्स उघडून पाहिली. आत वट्ट पाचशेच्या तीन नोटा, शंभरच्या दोन नोटा आणि दहा-वीस रुपयांच्या दोन-तीन नोटा असा दोन हजाराच्या आतलाच ऐवज होता. घरातले सगळे खण शोधून पाहिले तरी काही सापडलं नाही. खरं मला हल्ली मी फार पैसे जवळ ठेवतच नाही. ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्या मावशी, जिम इंस्ट्रक्टर, मुलांचे गाण्याचे शिक्षक, माळी, सगळ्यांनाच पगार बँक ट्रान्स्फरनेच दिला जातो. ज्या दुकानदाराकडून मी किराणा माल आणते तो कार्ड घेतो. त्यामुळे भाजी, फळे वगैरे जिनसा आणण्यासाठीच तेव्हढी मला रोकड लागते त्यामुळे तसेही रोख पैसे घरात कमीच असतात. पण दोन दिवसांनंतर मी एका कार्यक्रमासाठी भोपाळला जाणार होते, त्यामुळे थोडी रोख रक्कम लागली असती, पण आता पुढचे दोन दिवस बॅंका आणि एटीएम बंद असल्यामुळे पैसे काढणं शक्यच नव्हतं. शेवटी नशिबावर हवाला ठेऊन, होते तेव्हढे पैसे घेऊन भोपाळला जायचं ठरवलं.
अकरा तारखेला संध्याकाळचं विमान होतं, तेही मुंबईहून. माझ्याच गाडीने मुंबईला निघाले. वाटेत सासूबाईंना ठाण्याला सोडून मला विमानतळावर जायचं होतं. सरकारने टोलमाफी केल्यामुळे टोलला पैसे द्यावे लागले नाहीत. वाटेत फक्त चहा घेतला. तिथे दहा-दहाच्या सुट्ट्या नोटा गेल्या. नवी मुंबईत खूप ट्रॅफिक लागला म्हणून मी गाडी ठाण्याला पाठवली आणि मी ऐरोलीहुन विमानतळावर जायला टॅक्सी घ्यायचं ठरवलं. प्रश्न पैशांचा होता. तिथे उभ्या असलेल्या पहिल्याच टॅक्सीवाल्याला विचारलं. ड्रायव्हर मराठीच होता. तो म्हणाला, विमानतळावर सोडायचे सहाशे रुपये होतील. माझ्याजवळ तर शंभरच्या फक्त तीन नोटा होत्या आणि पाचशेच्या तीन. त्याला तसं सांगितलं तर तो म्हणाला, 'ताई, मी घेईन तुमची पाचशेची एक नोट आणि एक शंभरची द्या. मलाही बॅंकेतच तर टाकायचेत आणि आमच्याकडे कुठे लाख-लाखाचे काळे पैसे असतात?'. विमानतळाकडे जाताना त्याच्याशी ह्याच विषयावर बरंच बोलणं झालं. मी त्याला विचारलं की 'तुम्हाला त्रास झाला का ह्या निर्णयाचा?', तर तो म्हणाला, 'फारसा नाही, कारण आमच्याकडे ज्या हजार-पाचशेच्या नोटा आहेत त्या पेट्रोल भरताना खपून जातील, पण सध्या सुट्ट्या पैशांचे खूप वांधे आहेत त्यामुळे वाटेत काही खायला-प्यायला विकत घेताना त्रास होतो. आम्ही छोट्या हॉटेलमध्ये किंवा वडा-पावच्या गाडीवर जेवतो ताई. तिथे काही कुणी कार्ड घेत नाही आणि आता पाचशेच्या नोटाही घेत नाहीत. त्यामुळे शंभरच्या नोटा अगदी पुरवून पुरवून वापराव्या लागतात'. विमानतळावर पोचले. टॅक्सीवाल्याचे पैसे दिले. आता फक्त पाचशेच्या दोन नोटा, शंभरची एक आणि काही चिल्लर एवढेच पैसे शिल्लक होते आणि पुढचे पाच दिवस भोपाळला काढायचे होते. रात्री भोपाळला पोचले. विमानतळावर घ्यायला संयोजकांचे लोक आले होते. हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण केलं. दुसऱ्या दिवसापासून कार्यक्रम सुरु होता. सकाळी उठून चालायला गेले. चहाचे ठेले नुकतेच उघडत होते. चहा घ्यायला थांबले. अजूनही एक-दोघेजण त्या ठेल्यावर चहा घ्यायला आले होते. कपड्यांवरून साधारण परिस्थितीतलेच वाटत होते. चहा घेता-घेता त्यांना विचारलं, 'हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे तुम्हाला त्रास झाला का'? 'परेशानी तो है दीदीजी,' आपल्या गळ्यातला गमचा झटकत चहावाला म्हणाला. 'छुट्टे पैसे की बडी पिराब्लेम है. हमारे रोजके ग्राहक हैं उनको तो हमने बोल दिया, हिसाब लिखके रखेंगे, हफ्तेभर बाद दे देना'. 'आपको क्या लगता है, मोदीजी ने किया, सही किया?' मी जरासं खोचून विचारलं. 'हां हां, ये सारे अमीर लोग हैं उनके पास बहुत काला धन है. वो निकलेगा तो देस के लिये अच्छाही होगा ना?' चहावाला म्हणाला. चहा पिणाऱ्या गिऱ्हाईकांनीही त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्याचे पाच रुपये सुट्ट्या पैश्यात देऊन हॉटेलवर परत आले.
पुढचा सगळा दिवस लोकमंथनच्या कार्यक्रमातच गेला. सगळी व्यवस्था संयोजकांनी उत्तम केली असल्यामुळे तिथे कुठेच पैसे लागले नाहीत. तिथेच सभागृहाबाहेर काही हस्तकलेच्या वस्तूंचे, साड्यांचे, मातीच्या दागिन्यांचे वगैरे स्टॉल लागले होते. त्यातल्या काही वस्तू मला खूप आवडल्या, पण कार्ड स्वीकारण्याची व्यवस्था नव्हती आणि पैसे काही माझ्याकडे नव्हते. मातीचे दागिने स्वतः बनवून विकणारे हरीश धवन नावाचे गृहस्थ होते.
त्यांना सांगितलं मी की 'मला तुमचे दागिने खूप आवडले, पण मी घेऊ नाही शकत कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत'. एक क्षण विचार करून ते म्हणाले, 'तुम्ही घेऊन जा तुम्हाला काय आवडलंय ते. मी माझे बॅंक डिटेल्स देतो तुम्हाला. तुम्ही घरी जाऊन जमेल तेव्हा ट्रान्सफर करा पैसे'. मी दोन गळ्यातली निवडली. त्यांनी एका कागदावर मला त्यांचा अकाउंट नंबर आणि इतर डिटेल्स लिहून दिले, पण त्यांनी ना मला माझं नाव विचारलं, ना माझा फोन नंबर. दोन्ही गळ्यातल्याची किंमत मिळून अडीच हजाराच्या घरात जात होती, म्हणजे अगदीच मामुली रक्कम नव्हती, तरीही त्यांनी इतक्या निःशंकपणे माझ्यावर विश्वास ठेवला होता. मला भरूनच आलं एकदम. डोळ्यात पाणीच उभं राहिलं. धड बोलताही येईना. माझी अवस्था बघून हरीश धवन बिचारे आपला स्टॉल सोडून बाहेर आले, आणि माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, 'आप बैठिये, पानी लिजिए', 'आपने इतना विश्वास किया, मुझे बहुत अच्छा लगा' मी कसंबसं म्हणाले. 'अरे बेटा, विश्वास तो भगवान पर होना चाहिये. उनपे विश्वास किया तो सबपे विश्वास किया', ते हसून म्हणाले. त्यांचे आभार मानून मी तिथून बाहेर पडले.
पुढचे दोन दिवस कार्यक्रमाच्या गडबडीत गेले. नंतरचे तीन दिवस मला भोपाळ जवळची सांची, भीमबेटका, भोजपूर वगैरे प्रेक्षणीय स्थळे बघायची होती. त्यासाठी गाडी हवी होती म्हणून एम पी टूरीजम वाल्यांना विचारलं. त्यांनी ड्रायव्हरचा नंबर दिला. त्याला फोन करून सांगितलं की मला तीन दिवस गाडी पाहिजे पण रोख पैसे नाहीत. तर तो म्हणाला, 'मी अकाउंट नंबर देतो, तुम्ही तिथे पैसे ट्रान्स्फर करा'. तो ही प्रश्न सुटला होता. हॉटेलचे पैसे तर कार्डनेच भरणार होते. आता फक्त वाटेत खायचा, गाईड वगैरेला पैसे द्यायचाच प्रश्न होता. बँकांमध्ये तर तुफान गर्दी होती, पण भोपाळमध्ये तरी मी ज्या ज्या बँका बघितल्या तिथे सगळीकडे बाहेर मांडव घातलेला होता, खुर्च्या ठेवलेल्या होत्या, प्यायला पाणी ठेवलेलं होतं आणि लोक बऱ्यापैकी शांतपणे रांगेत राहून आपले व्यवहार करत होते. तिथल्या लोकांशी बोलले तर बहुतेकांनी सांगितलं की मोदींनी चांगलंच केलं.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मला तिथल्या विधानभवनमधल्या एटीएम मधून दोन हजार रुपये काढता आले. कार्यक्रम संध्याकाळी संपला. दुसऱ्या दिवशी मला भीमबेटकाला जायचं होतं. ठरवलेल्या गाडीचा ड्रायव्हर सोनू सिंग चांगलाच बोल घेवडा निघाला. मी माझा ठरलेला प्रश्न त्यालाही विचारला, 'चलनबंदीच्या निर्णयामुळे तुम्हाला काही वैयक्तिक त्रास झाला का'? मुंबईच्या टॅक्सीवाल्याप्रमाणेच तो ही म्हणाला की 'हमारे हजार पाचसो के नोट तो पेट्रोल पंप मे ही चले जायेंगे लेकिंन रास्ते में खाने-पीनेकी थोडी कठीनाई जरूर हुई'. मग म्हणाला, 'हा निर्णय चांगलाच आहे. हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे आता बघा नक्षलवाद आटोक्यात येईल, पाकिस्तानवरून येणाऱ्या खोट्या नोटा बंद होतील आणि काळा पैसाही बाहेर येईल. सही निर्णय लिया मोदीजीने. कुछ दिन कठीनाई जरूर होगी, लेकिन इतना बडा निर्णय सिर्फ मोदीजी ही ले सकते हैं'. त्याला विचारलं तुझा व्हिडियो घेऊ का? तो म्हणाला, 'हो, घ्या की'.
भीमबेटकाला पोचलो. भीमबेटकाला शैलगृहांचा एक विस्तृत समूह आहे. आदिमानवाने काढलेली हजारो वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे तिथे आहेत. वाकणकर नावाच्या मराठी पुरातत्वशास्त्रज्ञाने लोकविस्मृतीत गेलेल्या ह्या गुहांचा परत एकदा नव्याने शोध लावला. आता भीमबेटकाच्या गुहांमधल्या भित्तीचित्रांना विश्व परंपरा स्मारकाचा दर्जा मिळालाय.
त्या गुहा आणि तिथली चित्रे दाखवायला तिथल्याच एका रखवालदाराला बरोबर घेऊन गेले. त्यालाही विचारलं, 'चलनबंदीच्या निर्णयामुळे तुम्हाला काही वैयक्तिक त्रास झाला का'? तो हसायलाच लागला. म्हणाला, 'मला पगार आहे जेमतेम पाच हजार. हजाराची नोट तर मी कधी हातात देखील घेतली नाही, मला कशाला त्रास होईल. झाला तर तुमच्यासारख्या लोकांनाच त्रास होईल ह्या निर्णयाचा'. त्याला विचारलं 'तुझा बॅंकेत अकाऊंट आहे का', तर तो म्हणाला 'आहे की. माझ्या बायकोचं पण नाव टाकलंय त्यात'.
भीमबेटकाहुन भोजपूरला गेले. तिथे हजार वर्षांपूर्वीचं धारा नगरीच्या राजा भोजाने बांधलेलं एक भव्य शिवमंदिर आहे. ह्या शिव मंदिरातली पिंडी तब्बल २३ फूट उंचीची आहे आणि तिच्या भोवती असलेली चौकोनी शाळुंका एका पाषाणाची आणि जवळ जवळ १५ फूट रुंदीची आहे. सामान्यतः आपल्याकडे आधी मंदिर बांधलं जातं आणि सगळ्यात शेवटी पिंडीची विधिवत प्रतिष्ठापना होते. इथे मात्र आधी त्या विशाल एकपाषाणी पिंडीची प्रतिष्ठापना झाली असावी आणि नंतर वर मंदिर बांधलं गेलं असावं असा पुरातत्व शास्त्रातल्या तज्ज्ञांचा कयास आहे. देवळात दर्शनाला गेले तर जवळच्या गावातले एक म्हातारेसे गृहस्थ होते, ते आपणहून म्हणाले, 'चला, मी दाखवतो तुम्हाला मंदिर'. त्यांनी फिरून मला सगळं मंदिर दाखवलं. त्यांनाही मी माझा आवडता प्रश्न विचारलाच, ''चलनबंदीच्या निर्णयामुळे तुम्हाला काही वैयक्तिक त्रास झाला का'? ते म्हणाले, 'आमच्या गावात तर आम्ही सगळं सामान, अगदी भाजी सुद्धा ओळखीच्या दुकानातून खात्यावरून मांडूनच विकत घेतो, त्यामुळे फार त्रास झाला नाह पण आमच्या भोपाळमध्ये कामाला जाणाऱ्या मुलांना झाला'. मोदींनी हा निर्णय घेतला हे चांगलं केलं का हे विचारलं तर ते काका म्हणाले, 'हां हां देस के लिये तो अच्छाही है'!
संध्याकाळी हॉटेलवर पोचले तेव्हा माझे जेवण, चहा वगैरे खर्च आणि दोन्ही गाईड्सनां दिलेले पैसे मिळून रोख फक्त साडेपाचशे रुपये खर्च झाले होते. दुसऱ्या दिवशी सांची आणि उदयपूरला जायचं होतं. सांचीचा जगप्रसिद्ध स्तूप बघताना एएसआई चा प्रशिक्षित गाईड घेतला. त्यांचं नाव होतं चंद्रमा गिरी. चलनबंदीबद्दल बोलताना तेही खुश दिसले. म्हणाले 'आता काळा पैसे साठवून ठेवलेल्या लोकांचा खूप जळफळाट होईल.' त्या दिवशी हॉटेलवर परत आले तेव्हा माझा खर्च झाला होता सहाशे रुपये!
तिसऱ्या दिवशी भोपाळमधले म्युझियम बघितले आणि तिथल्या प्रसिद्ध कैलास मिठाईच्या दुकानात जाऊन गजक विकत घेतलं. तिथल्या दुकानदारालाही विचारलं, की चलनबंदीबद्दल त्याचं मत काय आहे? गल्ल्यावर बसलेला माणूस म्हणाला 'निर्णय का तो हमें स्वागतही करना चाहिये. अंतमे सबके लिये ही अच्छा निर्णय है', तर त्याचा मुलगा म्हणाला, 'निर्णय तो अच्छा है लेकिन इम्पलेमेंटेशनमें कई सारे प्रॉब्लम हैं. छुट्टे पैसे की सबसे बडी दिक्कत है. बिजनेस भी कम हो गया है हमारा, लेकिन कभी कभी बडे लाभ के लिये छोटी कठिनाई झेलनी पडती है'. संध्याकाळी माझी परतीची फ्लाईट होती. परत पुण्याला पोचेल तेव्हा पाकिटात शिल्लक होत्या त्याच पाचशेच्या दोन नोटा आणि शंभरच्या दहा नोटा! भोपाळच्या सहा दिवसाच्या प्रवासात माझी फक्त बाराशे ते तेराशे रुपये एवढीच रोख रक्कम खर्च झाली होती.
-शेफाली वैद्य