‘एक होता कार्व्हर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांना आज अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यशैलीचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख....
‘कार्व्हर’ची पहिली आवृत्ती १९८१ साली प्रकाशित झाली आणि त्याने इतिहास रचला. आज या पुस्तकाच्या ४२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. हा आकडाच या पुस्तकाच्या लोकप्रियतेबाबत सर्व काही बोलून जातो. ‘कार्व्हर’ची लोकप्रियता पाहता त्याच्या आवृत्त्यांचे अर्धशतक येत्या काही वर्षांतच पूर्ण होईल, याची खात्री वाटते. काही वर्षांपूर्वी त्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला. एखाद्या मराठी पुस्तकासाठी हा दुर्मिळच योग म्हणायला हवा. तरुण आणि प्रौढ वाचकांना तर या पुस्तकाने मंत्रमुग्ध केले आहे. लाखो पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक वाचायला लावले आहे आणि लावलेच पाहिजे. या पुस्तकाची संस्कारक्षमताच तशी अफाट आहे. सकारात्मकता आणि आशावाद याचे मूर्तिमंत चित्रण त्यात आहे आणि त्याला गवाणकर यांच्या सिद्धहस्त परंतु संयमी लेखणीची जोड मिळाली आहे. कुठेही शब्दांची उधळण नाही की अतिरंजित भावनाशीलता नाही. अगदी नेटके, मोजूनमापून आणि चपखल लेखन कसे करावे, याचा हा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. म्हणूनच गेली चार दशके त्या मराठी वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. वीणा गवाणकर यांनी वाचकांच्या किमान दोन पिढ्या घडविल्या आहेत. मराठीतील अन्य क्वचितच कोणा लेखिकेला हे श्रेय मिळेल. ‘एक होता कार्व्हर’नंतर गवाणकर यांचे नाव साहित्यजगतात स्थिर झाले. त्यानंतर डॉ. आयडा स्कडर, सर्पतज्ज्ञ रेमंड डिट्मार्स, पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली, महान क्रांतिकारक आणि कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे, जलतज्ज्ञ विलासराव साळुंके यांच्या जीवनावरही त्यांनी पुस्तके लिहिली आणि वाचकांनी त्यांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, गवाणकर यांचे नाव ‘कार्व्हर’शी अतूटपणे जोडलेले आहे.
कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या तज्ज्ञांच्या चरित्रावर आधारित ललितलेखन त्या करतात. त्यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार एसएनडीटी विद्यापीठातर्फे २०१४ मध्ये ‘वूमन ऑफ दी इयर’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पर्यावरण साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्ष होत्या. अशा या लेखिकेला अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘स्नेहांजली पुरस्कार’ मिळत आहे. साहित्यजगतातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार या निमित्ताने एका सर्वार्थाने योग्य व्यक्तीला मिळत आहे. यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या हातून आणखी उत्तमोत्तम साहित्यसेवा घडत राहो, ही शुभेच्छा!
- देविदास देशपांडे
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/