महिला आरक्षणासंदर्भात भाजपच्या आंदोलनामध्ये एक महिला अतिशय त्वेषाने परवा विरोध करताना दिसली. यावर ‘अमूल’ने ‘एक्स’वर लगोलग एक जाहिरातदेखील प्रसारित केली. त्यात लिहिले आहे, ‘क्वेश्चन करना अलॉव हैं|’ ‘अमूल’चे म्हणणे बरोबर आहे; कारण सदर महिला महाविकास आघाडीचा मोर्चा किंवा ओवेसींचा मोर्चा किंवा कम्युनिस्टांच्या मोर्चात अशी घुसू शकली असती का? बरं, गेली असती आणि तसेच वर्तन तिथे केले असते, तर तिला प्रत्युत्तर काय मिळाले असते? पण, भाजप पक्षाचे आंदोलन असल्याने ती अतिसुरक्षित वातावरणात वाद घालू शकली. प्रश्न विचारू शकली. भाजप सत्तेत आहे, म्हणून ‘क्वेश्चन करना अलॉव हैं’ हेच खरे!
दुसरीकडे, भाजपमुळे सत्ता गमावणार्यांना आणि भाजपवर राग असणार्यांना त्या महिलेमध्ये रणरागिणी दिसली. पण, ही महिला प्रश्न विचारू शकली किंवा ती जे बोलू शकली. कारण, तिला खात्री होती की, हे ‘भाजपवाले’ आहेत. आपण काहीही बोललो, तरी करमुसेसारखे घरातून उचलून आपल्याला मारणार नाहीत की केतकी चितळेसारखे तुरुंगात डांबणार नाहीत. उलट, आपण तिथे जाऊन ‘पब्लिसिटी स्टंट’ किंवा हुल्लडबाजी केली, तरी ते आपलं ऐकून घेतील. आपले बोलून झाले की सुरक्षितपणे आपल्याला जाऊही देतील. थोडक्यात, भाजपच्या सत्ताकाळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिला सन्मान केला जातो, हे त्या महिलेला माहीत होते. त्यामुळेच तर ती इतक्या आत्मविश्वासाने भाजपच्या आंदोलनात घुसली. असो. आंदोलनामुळे वाहतुककोंडी झाली, उशीर होतो. तिने मुलाचाही संदर्भ दिला म्हणे. पण, चळवळीत काम करताना जाणवले आहे की, अनेक घटनांच्या मागे कर्ता-करविता दुसराच असतो. त्यामुळेच या घटनेत असे वाटते की, चारचाकी वाहनातून प्रवास करणारी, पाश्चात्य पद्धतीचा पोशाख केलेली इंग्रजी बोलणारी सुशिक्षित महिला, ती आई आहे, तिला तिच्या मुलाची काळजी आहे; पण ती भाजपच्या विरोधात गेली. तसेच, भाजपच्या सत्ताकाळात शिकलेली महिलासुद्धा महिला आरक्षणाला पाठिंबा देत नाही, हे दाखवण्यासाठी कुणीतरी हे मुद्दाम केलेले नाही ना? असे असेल, तर ‘क्वेश्चन करना अलॉव’ असले, तरीसुद्धा ‘क्वेश्चन’ची पार्श्वभूमी तपासून जशाला तसे आणि व्यवस्थित उत्तरेही देणारे हवेत. नुसते भाजपमध्येच नकोत, तर समाजातसुद्धा!
निदा खानच्या निमित्ताने...
नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणातील आरोपी निदा खान तीन महिन्यांची गरोदर आहे, म्हणून तिला सवलत मिळावी, असा युक्तिवाद तिच्या वकिलाने केला म्हणे. याआधीही गरोदर आहे, म्हणून एका गुन्हेगार स्त्रीने शिक्षेबाबत अशीच सवलत मागितली होती. मान्य आहे, आईपणाचा दर्जा महत्त्वाचा. गरोदरपणात महिलेची मानसिक-शारीरिक स्थिती नाजूकच असते. पण, म्हणून तिने जर गुन्हा केला असेल, तर त्या समाजविघातक कृत्यातून तिची सुटका कशी होऊ शकते? निदाच्या बाबतीत काही लोकांचे म्हणणे आहे की, नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ची आरोपी निदा खान ही समाज-देशाच्या कल्याणासाठी किंवा कामासाठी गरोदर राहिली का, की ज्यामुळे, तिला कायदेशीर कारवाईतून सवलत द्यावी?
नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये पीडित आणि शोषित महिला यासुद्धा कुणाच्या तरी मुली होत्या, कुणाच्यातरी पत्नी होत्या. पद्धतशीर षड्यंत्र रचत धर्मांधतेने त्या महिलांचे शोषण करताना निदा खानमधली मातृत्वाची चाहुल लागलेली आई कुठे होती? अत्याचार करताना तिला कुठेही वाटले नाही की, तीही एक स्त्री आहे. पुढे-मागे तीसुद्धा कुणाची तरी आई होणार आहे. आपण जसे वागतो, तसेच आपल्या लेकीशी कुणी वागले, तर कसे वाटेल, हा विचार तर निदाच्या मनात येणे शक्यच नव्हते! कारण, तिच्यावर जे संस्कार झाले असतील, त्यानुसार संपर्कातील हिंदू मुलींशी कसे वागावे, याचे तिला चांगलेच ज्ञान होते! त्यामुळेच, इतर आरोपी त्या हिंदू मुलींशी अत्यंत अश्लाघ्य वाईट वर्तन करत होते, त्यावेळी निदा त्यांना साथ देत होती. त्या हिंदू महिलांच्या धार्मिक भावना दुखावत होती. जणू काही त्या महिला हिंदू आहेत, मुस्लीम नाहीत, म्हणून त्यांना त्रास द्यायलाच हवा, असे तिचे वागणे. आता कुणी म्हणेल की, आपली संस्कृती आणि न्यायव्यवस्था हे मानवी मूल्ये जपतात. त्या मानवी मूल्यांसाठी तरी निदा खान हिच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा. पण, ज्यांच्या आयुष्यात हिंदू महिला या ‘माणूस’ नसून केवळ ‘धर्मांतरण करण्याच्या बळी’ आहेत, त्यांच्याशी मानवी मूल्यांनी संस्कारी वर्तन करावे का, हा प्रश्न आहे. उच्चशिक्षित असूनही धर्माधतेने हिंदू महिलांना लक्ष्य करताना निदा खानने कोणती मानवी मूल्ये जपली होती?
९५९४९६९६३८