मुंबई : (MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
या याचिकेत मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांवर केलेल्या हल्ल्यांचा तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिंदी भाषिकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका महाराष्ट्रातील नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात दाखल केली आहे.
ॲड. श्रीराम परक्कट यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सुनील शुक्ला आणि इतर हिंदी भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचे अनेक खटले दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासोबतच, मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\