मुंबई : (Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात ५ एप्रिल रोजी एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. या याचिकेत ही कारवाई भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे तसेच वैयक्तिक जीवन जगण्याच्या अधिकारांवर गदा आणत आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि श्रीराम एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी कामराला चौकशीसाठी अनेक समन्स बजावले होते. मात्र अद्यापही कुणाल कामरा चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेला नाही. उलट त्यानेच पोलिसांना पत्र पाठवून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने मुंबईत दाखल झालेल्या याच प्रकरणात कामराला ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\