नवी दिल्ली : (Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत वादानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या पोस्टमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. ही पोस्ट सोमवार दि. २८ एप्रिलला रात्री पोस्ट करण्यात आली होती, यामुळे भाजपकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनीदेखील ही पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर भाजपने काँग्रेसला चांगलेच फैलावर घेतले होते.
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींची गैरहजेरी अधोरेखित करत काँग्रेसने एक शिर नसलेल्या व्यक्तीचे पोस्टर पोस्ट केले होते. पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे थेट नाव घेतले नसले तरी, कॅप्शनमध्ये "जबाबदारीच्या वेळी गायब होतात," असे स्पष्टपणे लिहिले होते. म्हणजेच ही टीका पंतप्रधान मोदी यांना उद्देशून होती हे स्पष्ट होते.दरम्यान भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी भारतीयांच्या दबावामुळे काँग्रेसने ही 'गायब' पोस्ट डिलिट केल्याच्या दावा केला आहे. "भारतीय नागरिकांच्या दबावाखाली काँग्रेस पक्षाने त्यांचे 'सर तन से जुदा हे इमेजरी द्विट डिलीट केले आहे! यामुळे काँग्रेसचे राष्ट्रविरोधी पाकिस्तान समर्थक गुणधर्म लपणार नाहीत!" असे ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\