पाकिस्तानातून आलेल्या 'त्या' लोकांना परत जावे लागणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
28-Apr-2025
Total Views | 68
मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्य सरकारनेही यासंबंधीची कारवाई सुरु केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सिंधी समाजाचे हिंदू लोक भारतात दीर्घकालीन व्हिसावर आले आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अप्लाय केले आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे लोक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना ४८ तासांत देश सोडावा लागणार आहे," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिक भारताच्या बाहेर गेले याबाबतचा योग्य आकडा लवकरच पोलिस विभाग घोषित करेल. जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर जायला हवेत त्या सगळ्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क करून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या श्रेणीमध्ये बसणारा कोणताही नागरिक असा नाही की, जो आम्हाला सापडलेला नाही," असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होणार!
"२०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होऊ शकते. त्यापद्धतीने काम सुरु असून २०२८ च्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धवजींनी बुलेट ट्रेनचे काम बंद पाडले. त्यामुळे अडीच वर्षे आपण मागे गेलो. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम खूप पुढे गेले आणि आपण मागे राहिलो. पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या आणि वेगाने काम सुरु केले," अशी माहितीही त्यांनी दिली.