नवी दिल्ली, काँग्रेस पक्ष एकीकडे दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगत आहे, त्याचवेळी अनेक काँग्रेस नेते दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्यांवर प्रश्न निर्माण करून त्यांचा अपमान करत आहेत; असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी केले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाबद्दल बोलताना ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले आहेत की 'युद्ध आवश्यक नाही', त्याचप्रमाणे २६ एप्रिल रोजी त्यांनी म्हटले आहे की भारताला युद्धाचा अधिकार नसून त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या विधांनाचा वापर पाक लष्कराकडून भारताविरोधात केला जात असल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. काँग्रेस नेते आर. व्ही. तिमापूर यांनीदेखील दहशतवाद्यांनी धर्म विचारला नसल्याचे विधान केले आहे. मात्र, प्रत्यक्षात दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याचे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याची आठवणही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी करून दिली.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय एकात्मतेस महत्त्व द्यावे, असे आवाहन रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी भाजपने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता, याचीही आठवण रविशंकर प्रसाद यांनी करून दिली.
काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी, खर्गे संतप्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या प्रकरणात काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षाची प्रतिमाही मलिन झाली आहे. काँग्रेस नेतृत्व यावर नाराज आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना पहलगाम हल्ल्यावर अनावश्यक विधाने करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य दर्जावरून राजकारण करणार नाही – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज जम्मू विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याचा वापर आपण पूर्ण राज्याच्या मागणीसाठी करणार नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडे राज्याचा दर्जा मागणे हे आपल्यासाठी लज्जास्पद असल्याचेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.