संकटात आशादायी ठरणारे डोंबिवलीतील ‘स्वामींचे घर’

    26-Apr-2025
Total Views | 38
 
Swami House in Dombivli
 
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरलेली. त्यांची ठिकठिकाणी मंदिरे, मठही आहेत. परंतु, डोंबिवली पूर्वेच्या टिळकनगरमधील ‘स्वामींचे घर’ हे भक्तांसाठी श्रद्धास्थानाबरोबरच आशादायी ठरत आहे. आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ‘स्वामींचे घर’ या संस्थेच्या संस्थापिका माधवी सरखोत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.
 
‘स्वामींचे घर’ची स्थापना कधी झाली आणि स्थापनेमागची कारणे काय होती?
 
‘स्वामींचे घर’ची स्थापना दि. 16 जुलै 2019 साली गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर झाली. ही जागा माझ्या आईच्या मालकीची होती. 2004 मध्ये आईने मृत्युपत्र केले. 1964 साली एका प्रसंगामध्ये वडिलांनी ही जागा, त्यांचे सर्वस्व एवढेच नव्हे, तर त्यांचे आयुष्यही हातांवर पाणी सोडून अक्कलकोटच्या श्री गजानन महाराजांना दानपत्रित केले. आईची गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच आईला धनुर्वाताचा टक आला. धनुर्वात प्रतिबंधक उपचार उपलब्ध नव्हते. डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. तसे सर्टिफिकेटही तयार केले. वडील घाबरले. आम्ही सगळी भावंडे लहान होतो. त्यावेळी मी केवळ तीन वर्षांची आणि सर्वांत मोठी बहीण 15 वर्षांची होती. वडिलांनी अक्कलकोटच्या श्री गजानन महाराजांना “माझे माझे म्हणून जे काही आहे, ते तुमच्या चरणी अर्पण करतो, पण हिला वाचवा,” असे हातावरून पाणी सोडत सांगितले. बराच वेळ वाट पाहूनही आईच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसताच वडिलांनी पुन्हा “माझे सर्वस्व अर्पण करतो,” असे सांगितले. पण, तरीही आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शेवटी त्यांनी “माझे प्राण मी आपल्या चरणी अर्पण करतो,” असे सांगितले. ही गोष्ट दि. 28 एप्रिल 1964 रोजी दुपारी 4.15 - 4.30 वाजेच्या दरम्यानची. वडिलांनी हा संकल्प सोडताच मृत घोषित केलेली आई बरी झाली. त्यानंतर दि. 10 सप्टेंबर 2004 रोजी तिचा मृत्यू झाला. जवळजवळ 40 वर्षांचे आयुष्य पुढे ती जगली. पुढे वडिलांचा दि. 28 एप्रिल 1966 रोजी दुपारी 4.15 ते 4.30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. म्हणजे वडिलांनी सोडलेला संकल्प आणि वडिलांचा मृत्यू हा केवळ योगायोग नव्हता. वडिलांनी त्यांचे आयुष्य आईला दिले होते. ते त्यांचे प्राणार्पण होते. ही जागा महाराजांना देत आहे, हे त्यावेळी केवळ तोंडी बोलले गेले होते. पुढे आईच्या मृत्युपत्रामुळे त्याला लेखी स्वरूप प्राप्त झाले. हे सगळे दान अक्कलकोटच्या श्री गजानन महाराजांना आणि बाळाप्पा मठाला दानपत्रित आहे. 1983 साली एका घटनेनंतर जागा विकून पैसे गजानन महाराजांना आणि बाळाप्पा मठाला देऊन टाकू, असे आईला वाटू लागले होते. दरम्यानच्या काळात 1983 साली अक्कलकोटचे गजानन महाराज आले होते. त्यांनी “ही जागा सरखोतांनी आम्हाला दिली आहे. आम्ही जे कार्य आयुष्यभरासाठी घेतले आहे, ते कार्य येथून व्हावे. त्याच कार्यासाठी ही जागा असावी. त्यामुळे ही जागा सोडून बाकी सगळे विकलेत तरी चालेल,” असे निक्षून सांगितले. याद्वारे महाराजांनी ही जागा त्यांची आहे, असे सांगत वडिलांनी 1964 साली हातावर पाणी सोडून केलेले दान स्वीकारले, त्यामुळे दान स्वीकृतीची प्रक्रिया इथे पूर्ण झाली. भगवान परशुरामांनी श्रीविद्या दीक्षा दिल्यानंतर श्रीगजानन महाराजांना गुरुदक्षिणा मागितली. त्यावेळी महाराजांनी भगवान परशुरामांच्या चरणी हातावरून पाणी सोडून मी श्रुतींचे पुनरूज्जीवन करेन, ही शपथरुपी गुरुदक्षिणा बहाल केली. त्यामुळे महाराजांनी आमचे कार्य इथून करा, असा स्पष्ट आदेश दिल्यामुळे या जागेवर भविष्यात वेद पाठशाळा स्थापन करणे अभिप्रेत आहे. आमच्यावर आईवडील, गुरू यांच्याप्रति नैतिक जबाबदारी येते. ती नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मृत्युपत्रामुळे लेखी पाया मिळाला.
 
सरखोत कुटुंबाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
 
माझी आजी दत्तगुरुंशी बोलत असे. आजीकडून ही परंपरा आईकडे आली. आईच्या लहानपणी नरसोबावाडीला दत्तगुरूंच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एका भटजीचे घर रिकामे झाले होते. त्या घरात एक-दोन वर्षे आई, आजी, आजोबा, मामा वगैरे राहात होते. दत्तगुरूंच्या मंदिराच्या आवारात राहात असल्याने तो भाव अधिक वाढत गेला. दत्तपरंपरा आमच्याकडे आजी आणि आईकडून आली. वडील आणि आई गुरूदेव रानडे यांचे शिष्य आहेत. गुरूदेवांनी 1957 मध्ये समाधी घेतल्यानंतर आईवडिलांना पोरकं झाल्यासारखं वाटायला लागलं. एकदा वडील ध्यानाला बसलेले असताना त्यांना “अक्कलकोटला जा” असा आवाज ऐकू आला. त्यामुळे हा आपल्याला गुरूदेवांचा आदेश आहे, याची खात्री वडिलांना झाली आणि वडिलांनी अक्कलकोटचा शोध घेतला. पुढे लगेचच वडिलांना त्यांच्या एका मित्राने 1958 साली अक्कलकोटला नेले. गुरूदेवांनी वडिलांना जे अनुभव दिले, त्यांची महाराजांसोबत चर्चा झाली. तेव्हापासून वडील आणि पुढे आम्ही सर्वच कुटुंबीय अक्कलकोटशी जोडले गेलो, ते आजतागायत. मला चार भाऊ आहेत. त्यांच्या मुंजी गजानन महाराजांनीच केल्या. वडील गेल्यानंतर एक वर्षाच्या आत कार्य होणे गरजेचे होते. म्हणून महाराजांनी स्वतः खर्च करून बाळाप्पा मठात मुंजी केल्या आहेत. वडिलांना पहिला गुरूमंत्र गुरूदेवांनी दिला. त्यानंतर 1962 साली गजानन महाराजांनी दुसरा गुरूमंत्र दिला. 1963 साली आईला गुरूमंत्र दिला. त्यानंतर 1966 साली मोठ्या बहिणीला आणि 1967 रोजी चौघा भावांना गायत्रीमंत्र हा गुरूमंत्र म्हणून दिला. पुढे 1977-78च्या काळात मला गुरूमंत्र दिला. त्यामुळे गजानन महाराज हे आमचे कौटुंबिक गुरू झाले. वडील गेल्यानंतर आई दुःखी झाली होती. तेव्हा महाराजांनी आम्हीच मुलांचे आईवडील आहोत, तुम्ही निमित्तमात्र आहात, असे सांगितले. आम्ही महाराजांना ते आमचे गुरू आहेत, आमचे माय-बाप आहेत असं म्हणणं आणि त्यांनी स्वतः आम्हीच मुलांचे आईबाप आहोत, असे म्हणणे यात खूप फरक आहे.
 
‘स्वामींच्या घरा’त दररोजची दिनचर्या कशी असते?
 
‘स्वामींचे घर’ येथे पहाटे 4 वाजता दिवे लागतात. त्यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास पूजा होते. 5.45 वाजता मुख्य द्वार उघडले जाते. सूर्योदयास अग्निहोत्र होते. 6.30 नंतर महाप्रसादाची तयारी सुरू होते. दुपारी 12 वाजता अन्नदान होते. ‘वंदे मातरम्’ आणि मातृभूमीची म्हणजेच रा. स्व. संघाची प्रार्थना आपण लावतो. दुपारी 2.30 वाजता ‘हरे राम’चा सामुदायिक जप करतो. संपूर्ण कर्मचारीवर्ग त्यात सहभागी होतो. सायंकाळी अग्निहोत्र व 7.30 वाजता आरती होते. 8.30 वाजता दार बंद होते. ‘स्वामींच्या घरा’त वेगवेगळे यज्ञ होतात. दर गुरुवारी सामुदायिक अग्निहोत्र होते. वैदिक, पुराणोक्त यज्ञ होतात. अनेक प्रकारची अनुष्ठाने होतात. विविध शांती होतात. संस्कारवर्ग होतात. याशिवाय, विविध सांस्कृतिक उपक्रम, संगीत महोत्सव होत असतात.
 
‘कोरोना’ महामारी किंवा महापुरासारख्या संकटकाळात ‘स्वामींचे घर’मार्फत कसे योगदान दिले गेले?
 
स्वामींच्या घरात नेहमीच म्हणजे दररोज अन्नदान होत असते. ‘कोरोना’मध्ये सगळे काही बंद होते. राजकीय पक्षांनी काही दिवस अन्नदान चालू ठेवले होते; नंतर बंद केले. अशा वेळी स्वामींच्या घराने अन्नदानाची 650 पाकिटे दररोज तयार करून वाटप केले होते. त्यामध्ये 90 फीटपासून नामदेव पथाच्या पलीकडे टंडन रोड, गणपती मंदिर, सम्राट चौक, कोपर रेल्वे स्थानक येथे चौकाचौकांत डबे वाटत जात होतो. सगळी मंदिरे व प्रार्थनास्थळे या काळात बंद होती, परंतु कदाचित संपूर्ण विश्वात ‘स्वामींचे घर’च फक्त चालू होते.
 
‘स्वामींच्या घरा’त देशभक्तीचे धडे गिरविले जातात, त्याबद्दल काय सांगाल?
 
‘स्वामींच्या घरा’त देशभक्तीचे धडे गिरविले जातात, हे खरं आहे. सावरकर जयंतीपासून आरतीच्या नंतर आता ‘वंदे मातरम्’ लावतो. कारण, राष्ट्र प्रथम. देश राहिला तर धर्म टिकेल, धर्म टिकला, तर मंदिरे राहतील. देश नसेल तर मंदिर कोठून टिकणार आहेत? म्हणून देशाप्रति आपले योगदान आहे. म्हणून ‘स्वामींचे घर’ येथे ‘वंदे मातरम्’ सुरू केले. पण, त्यानंतरही काहीतरी कमी आहे, असे वाटत होते. त्यानंतर रा. स्व. संघाची मातृभूमीची प्रार्थना लावण्यास सुरुवात केली. कराटेचे इथे वर्ग होतात. व्याख्यानमालेच्या माध्यमातून देशाप्रति प्रेम वाढविण्याचा आपण येथे प्रयत्न करतो.
 
आतापर्यंत आपल्या ‘स्वामींचे घरा’ला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत?
 
‘स्वामींच्या घरा’ने अनेक उपक्रम केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातूनही उपक्रम केले आहेत. त्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. ‘कल्याण नागरिक’चा ‘कल्याणी पुरस्कार’ मिळाला आहे. ‘रोटरी क्लब’नेही पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘इनरव्हिल क्लब’ने पुरस्कृत केले आहे, ‘बीबीएनजी’चा पुरस्कार मिळाला आहे, ‘बीएनआय’ने अनेक पुरस्कार दिले आहेत. शिवाय, ‘कोरोना’ काळातील कामासाठीदेखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना काय संदेश द्याल?
 
स्वामींची भक्ती करणे आणि ती अगदी मनातून असणे, यात खूप फरक आहे. स्वामी तुमच्या हृदयात हवेत. माझे सगळे स्वामींच्या इच्छेने चालते, एवढे फक्त तोंडाने बोलण्यापेक्षा तो विश्वास दृढ असायला हवा. एखादं आलेलं संकट हे भक्तांचा विश्वास दृढ आहे की नाही, हे पाहण्याची परीक्षा आहे, हा विश्वास असायला हवा आणि हा विश्वास ढळता कामा नये.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121