पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द! पुढच्या तीन दिवसांत भारत सोडण्याचे आदेश
24-Apr-2025
Total Views | 14
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून पुढील तीन दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारने गुरुवार, २४ एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले असून येत्या २७ एप्रिलपर्यंत त्यांना भारत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मेडिकल व्हिसाची मुदत २९ एप्रिलपर्यंत वैध ठेवण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर देश सोडून जावे लागणार आहे.
पहलगाम येथे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवार, २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
१. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित.
२. अटारी एकात्मित तात्काळ प्रभावाने बंद. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
३ पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. त्याअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत.
४. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत.
५. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.