पुस्तके मानवी जीवनाला उद्धाराचा मार्ग दाखवत असतात. शिक्षणाने शिक्षित झालेली माणसे पुस्तकाच्या सहवासात अधिक फुलतात आणि बहरतात. मात्र, केवळ शाळेची पाठ्यपुस्तके वाचून बहरणे आणि फुलणे होईलच, असे नाही. शाळेत अक्षरांची साक्षरता येते. त्या साक्षरतेला समृद्धतेच्या आणि अर्थपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पुस्तकातील शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याचे काम वाचनाने घडते. म्हणूनच आज ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्ताने चला, वाचते होऊया!
शिकलेली माणसे पदव्या मिळवतील, पण शिक्षणातील अपेक्षित बदल आणि ध्येयापर्यंतचा प्रवास पुस्तके घडवत असतात. शिक्षणाने वर्तमानात शहाणपण येते, असे दिसत नाही. त्याचे कारण शिक्षणाचा अर्थ केवळ पुस्तक आणि गुणांपुरता मर्यादित झाला आहे. त्यामुळे शालेय जीवनात जोपर्यंत अवांतर पुस्तके हाती पडून इतिहास आणि वर्तमान जाणून घेता येणार नाही, तोपर्यंत शिक्षण केवळ हुशारी पेरत राहील आणि शहाणपणाला समाज पोरका बनत राहील. पुस्तके म्हणजे वास्तवाचे दर्शन असते. विवेकाची पेरणी असते. शहाणपण जपणे असते. प्रामाणिकपणाची ओळख असते. सत्ता आणि संपत्तीचा अर्थ जाणणे असते.
पदाची आणि माणसांच्या उंचीतील फरक ओळखणे असते. जीवनात सत्य की सत्ता, चेहरा की मुखवटा, प्रामाणिकपणा की अहंकार, सत्व, तत्व की खोटी प्रतिष्ठा यांत नेमके काय, हे पुस्तकांच्या सहवासाने कळत जाते. पुस्तकांनी सत्तेची आणि संपत्तीची उंची आणि माणूसपणाची उंची यांतील महत्त्व अधोरेखित होताना योग्य निवडीचा विवेक अंगी येण्यास मदत होते. पुस्तकांनी जीवन फुलते हे खरेच, पण त्याचवेळी पुस्तके जीवनाची समृद्धतेची वाटचाल सुरू राहावी, याकरिता शक्ती बहाल करत असतात. पुस्तकांनी घडवलेली मस्तके कोणाच्याही चरणावर नतमस्तक होत नाहीत. ती माणसे स्वाभिमान जपून असतात. त्यांना आनंदाच्या वाटा सापडत जातात.पुस्तकवाचनाने समाजात शहाणपणाची पेरणी घडते आणि गर्दीला समाजाचे रूप येते आणि देशाला राष्ट्राच्या दिशेने प्रवास करणे सुलभ होते.
पुस्तके माणसाच्या आयुष्यावर अत्यंत खोलवर परिणाम करत असतात. आपल्याकडे अनेक राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर अत्यंत खोलवर परिणाम झालेला आपण जाणत आहोत. कलामांसारखा माणूस राष्ट्रपती होणे, हा त्या पदाचा सन्मान होता. पदावर पोहोचल्यानंतरही आपल्याला त्या पदाचा लाभ नको. त्या पदाचा कोणताही अतिरिक्त फायदादेखील नको. पद हे विश्वस्त म्हणून भोगायचे असते, मालक नाही.देशातील सर्वोच्च पद मिळाल्यानंतर अहंकारांने त्यांना स्पर्श केला नाही. त्यांच्यातील संवेदना संपल्या नाहीत. त्यांच्यातील सहृदयता सातत्याने त्यांनी जोपासली होती. कधीकाळी अपंग मुलांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या मुलांच्या हाती असलेल्या काठीचे वजन त्यांनी विचारले, तेव्हा ते वजन त्या मुलाच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक होते.
त्या वजनामुळे अपंगांना ते घेऊन चालताना अडचणीचे ठरते. तेव्हा त्या काठीचे वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांना हलकी काठी तयार करण्यासाठी आदेश दिले. आपल्या पदाद्वारे त्यांनी अपंगांसाठी संवेदनांचे दर्शन घडविले. ही संवेदना येते कोठून, असा प्रश्न कोणालाही पडेलच. त्याचवेळी पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी मिळत असतानादेखील त्यांनी नकार देणे, इतकी अपेक्षा शून्यता येते कोठून? आपण सर्वोच्च पदावर असताना आपले कुटुंब गरिबीत आहे, म्हणूनदेखील त्यांना कोणताही फायदा, लाभ मिळवून देण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. हा प्रामाणिकपणा ठासून भरलेला दिसतो, त्याचे कारण त्यांच्यावर पुस्तकांनी केलेले संस्कार.
त्यांनी जीवनभर पुस्तकांशी केलेली मैत्री. राष्ट्रपती भवन सोडताना केवळ आपली संपत्ती म्हणजे पुस्तके तेवढीच बरोबर नेण्याचा प्रयत्न, म्हणजे जीवनातील सत्याचा प्रवास आहे. पुस्तकाच्या सहवासात राहिल्यानंतर जीवनाचा अर्थ उलगडत जातो. जीवनाची सत्यता कळते. जीवनात आनंदाच्या वाटा कोणत्या, याचे आकलन होत जाते.आणि खोट्या आणि फसव्या मुखवट्यांचे त्यांना कधीच आकर्षण वाटत नाही.
पुस्तके आपल्या हाती येणे, त्यांच्या सहवासात राहायला मिळणे, ही तर खरी समृद्धी असते. पुस्तके ही सतत मार्गदर्शक असतात. ती कधीच आपल्यावर अन्याय करण्याची शक्यता नसते. जीवनाचा मार्ग त्या पुस्तकातून दिसू लागतो. हेच पाहा ना, जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांना वयाच्या12व्या वर्षी त्यांचे गुरू मॅक्स टॅलमूड यांनी ‘युक्लिडीयन भूमिती’ हे पुस्तक भेट दिले होते. हे पुस्तक हाती आल्यावर त्यांनी असे म्हटले की, या पुस्तकामुळे मला अनेक आश्चर्ये सापडली आहेत. या पुस्तकामुळे विशुद्ध विचार आणि प्रांत या संकल्पनेची ओळख झाली. त्यासाठी त्यांना पुस्तकांनी मदत केली. हे सामर्थ्य त्यांना पुस्तकांच्या मदतीने प्राप्त झाले. कलामांनीदेखील जीवनभर सत्याची वाट चालत राहण्यासाठी पुस्तकांचीच निवड केली होती.
त्यांनी म्हटले आहे की, मी ‘लाईट फॉर मेनी लॅम्प्स’ हे लिलियन आयशर वॅटसन यांनी संपादित केलेले पुस्तक 1953 साली जुन्या बाजारातून खरेदी केले होते. हे पुस्तक पाच दशकांहून अधिक काळ माझी सोबत करीत आहे. ते वाचून इतके जुने झाले आहे की, अनेक वेळा बाईंडिंग केले आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा समस्या उभी राहाते, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी उघडतो. तेव्हा ते पुस्तक मला सावरते. अनेकदा जीवनात आनंदाचे भरते येते. तेव्हा मन सैरभैर होते. तेव्हा मनाचा समतोलपणा साधण्याकरिता पुस्तकेच मदत करतात. पुस्तके जीवनाच्या कोणत्याही प्रसंगी विचाराचा आधार देतात. त्यांचा आवाज खरच अंतःकरणापासून ऐकला, तर प्रत्येक व्यक्ती योग्य पावलावर चालण्याची शक्यता अधिक आहे.
‘जीवनाची उंची आणि हिमालयाएवढ्या उंचीची माणसे’ पुस्तकातील शब्दांनी उलगडा केल्याने त्यांच्या आयुष्याच्या प्रकाशवाटा वाचणार्याचे आयुष्य उजळून टाकतात. पुस्तकांच्या प्रकाशात उजळणारे आयुष्य कधीच खोट्या प्रतिष्ठेमागे चालत जात नाही. आपण काय आहोत, याची जाणीव होत जाते. आपण स्वतःला ओळखायला शिकतो. आपल्या मर्यादा आणि आपली बलस्थाने यांची ओळख होते. त्यातून वाचणार्याच्या मनावरदेखील शब्दांचा प्रभाव पडतो. त्या शब्दांतील केवळ अक्षरे वाचण्याऐवजी त्या अक्षरांतील अर्थ उलगडत जातात. त्या अर्थातून जीवनाचा अर्थ शोधणे घडते. ती केवळ शब्द नसतात.
तो प्रत्येक शब्द म्हणजे एक अनुभव असतो. त्या प्रत्येक अनुभवात जीवन उभे करण्याची शक्ती असते. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकाचे महत्त्व जाणले होते. जीवन पुस्तके वाचण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यात ही पुस्तके क्रांती घडून आणतील, याची त्यांना जाणीव होती. म्हणून परदेशातून येताना त्यांनी सोबत केवळ पुस्तके आणली होती. त्यांना जीवनाचा अर्थ पुस्तकात दिसला होता. त्यांना ना परदेशी वस्तू आकर्षित करू शकल्या, ना धन, संपदा. वाचन जीवनाला अर्थ देत जाते. महात्मा फुले यांच्या आयुष्यात आलेल्या एका पुस्तकाने त्यांना जीवनाची वाट सापडली.
महात्मा गांधी यांच्या जीवनात आलेल्या एका गोष्टीने त्यांचा ‘मोहनदास करमचंद गांधी’ ते ‘महात्मा’ हा प्रवास घडविला. नरेंद्र दत्त यांच्या आयुष्यात आलेल्या वर्डस्वथच्या कवितेने त्यांना जीवनाचा अर्थ उलगड गेला. मोठ्या माणसांच्या आयुष्यावर पुस्तकांचा मोठा प्रभाव होता, हे त्यांचे चरित्र सांगत असते. अनेकांना त्यांच्या जीवनप्रवासात पुस्तकांनी दिशादर्शन घडविले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पुस्तकांमध्ये न रमणारी माणसे अनेकदा दुःखात असतात. त्याचे कारण जीवनाचे सार कशात आहे, याचे दिशादर्शन झालेले नसते. जीवनात पुस्तके दृष्टीत बदल घडवतात. एखाद्या प्रश्नाकडे, परिस्थितीकडे, प्रसंगाकडे कसे पाहायचे असते, हे त्यादृष्टीने घडते.अनेकदा जीवन न कळालेल्या माणसांच्या आयुष्यात अर्थ न सापडता प्रवास करत जाताना त्यांना आनंद मिळतो; पण ते कोठे चालले आहेत, याची वाट ते हरवलेले असतात. पुस्तके आयुष्याला घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून पुस्तकांच्या सहवासातील समृद्धता वेळेचे महत्त्व सांगत जाते. पुस्तके आपण कोण आहोत आणि आपल्या मर्यादा काय आहेत, याची जाणीव करून देत असतात. आपली बलस्थानांची ओळख होते आणि जीवनाच्या उन्नतीसाठी उत्तम गुणांची जाणीव करत जातात.
परिस्थिती, संकटे येतात, तेव्हा त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. पुस्तकांमुळे मनात सकारात्मकता ठासून भरली जाते. भाषेतील शुद्धता आणि मानवी जीवनासाठी लागणारे शहाणपण यांची ओळख होते. पुस्तके वाचणार्या माणसांची प्रतिमा समाजामनांत वेगळीच असते. ती माणसे संपूर्ण प्रवासात माणूसपण केंद्रस्थानी ठेवतात. पुस्तके, लेखक, कवी हे वाचकांची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम करीत असतात. पुस्तकाची किंमत कधीकधी वाचताना कळत नसेल, पण प्रसंग आल्यावर त्या पुस्तकातील विचार मात्र निश्चित उपयोगी पडू शकतात. पुस्तकांच्या सहवासाने चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता नाही.
भ्रष्ट आचरण आणि पैशाचा भ्रष्टाचार करण्याकडे त्यांचा कल फारच कमी असू शकतो. मात्र, पुस्तके वाचून जीवन परिवर्तनाच्या वाटेने जात नसेल, तर तो पुस्तकांचा पराभव नाही, तर त्या पुस्तकांनी जे काही सांगितले आहे, त्या विचारांचे चिंतन, मनन झालेले नाही. पुस्तकांचे वाचन म्हणजे काही शब्दांचे वाचन नाही, तर त्यात दडलेल्या विचाराचे जगणे असते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचण्याचा संकल्प सोडला, तर उद्याची पहाट अधिक प्रकाशमान असण्याची शक्यता आहे.
जीवनात ज्ञानाच्या क्षेत्रात आदान-प्रदान करण्याचा व्यवसाय करणार्यांनी तर पुस्तकांशी संगत करायला हवीच. त्या संगतीने त्या व्यक्तीची उंची वाढते आणि अखंड ज्ञानाचा प्रवास घडत जातो. त्या प्रवासाने त्यांच्या सोबत काम करणार्या प्रत्येकाला ज्ञानाची वाट दिसत जाते. ज्ञानाचे तेज प्रचंड असते. त्या तेजात बाहूंच्या शक्तीचा विचार करावा लागत नाही. त्या तेजापुढे बाहूची शक्तीदेखील चालत नाही. ज्ञानाच्या शक्तीने हजारो माणसे दिपत जातात आणि लाखो माणसे प्रतिभेच्या मागे चालत येतात. खोट्या वाटा शोधून भक्त शोधावे लागत नाहीत. मुखवट्यांची गरज पडतच नाही.
समाजात पोलीस, न्यायालयांची संख्या, तुरुंगांची संख्या वाढत जाते, तेव्हा ते चांगल्या समाजाचे लक्षण नसते. तो उत्तम काही पेरायचे राहून गेले, असेच काही असते. तो शिक्षणाचाही पराभव असतो. शिक्षणातून अखंड शिक्षणाचा विचार पेरायला हवा असतो. तो शिक्षण विचार म्हणजे केवळ औपचारिक शिक्षणाचा भाग नाही, तर अखंड ज्ञानसाधनादेखील आहे. त्या साधनेने शिक्षण होत राहते. त्यामुळे समाजात ज्ञानसंपन्न आणि सातत्याने ज्ञानाचा प्रवास करणारी माणसे हीच समाजाची श्रीमंती आहे.
ज्या समाजात ही संपन्न माणसे असतात, तिथे संघर्ष आणि युद्धाची शक्यता नसते. वाचता समाज हा शांतताप्रिय असतो. तो उत्तमतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहतो. नव्याचा शोध आणि सर्जनशील विचाराची पेरणी करत राहतो. आपण त्या दिशेने जाण्यासाठी वाचते होण्याची गरज आहे.
गाव तेथे ग्रंथालय असायला हवे. शाळा-महाविद्यालयांतून आपल्याला अधिक चांगला माणूस व राष्ट्रनिर्माण करायचे असेल, तर शाळा, महाविद्यालयात समृद्ध ग्रंथालये असायला हवीत. त्यातून मोठी माणसे जाणता येतील आणि वर्तमानात छोट्या माणसांच्या दिसणार्या मोठ्या सावल्या हळूहळू हटतील. हे घडले तर, आपल्याला नवसमाजनिर्मितीचे आव्हान सहज पेलता येईल. हाती पुस्तके आली, तर हिंसेच्या बंदुका गळून पडतील. द्वेषाचे शस्त्र निकामी बनेल. लोकशाहीच्या नावाखाली होणारे खोटे खेळही थांबतील. उत्तम काय याचा विचार अंतःकरणात रूजेलही. म्हणून चला वाचते होऊया!
-संदीप वाकचौरे