मत्स्य व्यवसायाला मिळणार कृषीचा दर्जा! मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर...
22-Apr-2025
Total Views |
मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर कोळी बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांसाठी एकूण ८ निर्णय घेण्यात आले आहेत.
- मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मच्छिमारी आणि मत्स्य व्यावसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सवलतींचा लाभ होणार आहे.
- सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मौजे नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेणयात आला आहे. या स्मारकासाठी १४२.६० कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७.१७ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली आहे.
- भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
- विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना ३५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मानधन मिळणार आहे.
- १४ व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या १६ अतिरिक्त न्यायालयांना आणि २३ जलदगती न्यायालयांना आणखी २ वर्षे मुदतवाढ देण्यास आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
- पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती आणि त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे.
- पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.