काँग्रेसमध्ये चापलूसीचे राजकारण! जो चापलूसी करेल तोच...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
22-Apr-2025
Total Views | 17
मुंबई : काँग्रेसमध्ये चापलूसीचे राजकारण आहे. जो चापलूसी करेल तोच मोठा होतो, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मंगळवारी काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संग्राम थोपटे युवा, तडफदार आणि संघटनेला मजबूत करणारा तसेच पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र काम करणारे कार्यकर्ते आहेत. आज भारतीय जनता पक्षाकरिता मोठा दिवस आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे पतन होण्याकरिताही हा मोठा दिवस आहे. पुढच्या महिनाभरात भोर विधानसभा मतदारसंघात २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. संग्राम थोपटे हे भाजपच्या अत्यंत महत्वाच्या टीममधील नेते असतील. त्यांना काँग्रेसमध्ये जेवढा सन्मान मिळाला नाही त्यापेक्षा जास्त सन्मान भाजपमध्ये देण्यात येईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या वेळीच ८ मुख्यमंत्री ठरले होते. आम्ही हा विचार केला नाही. तर महायूती पुढे नेण्याचा विचार केला. महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये पाय ओढण्याचे काम करतात. संग्रामसारख्या ईमानदार कार्यकर्त्याला पक्षात न्याय मिळत नाही. इथे चांगल्या कार्यकर्त्याला समोर नेत नाहीत. काँग्रेसमध्ये चापलुसीचे राजकारण आहे. जो चापलुसी करेल तो मोठा होतो. पण भाजपचे राजकारण विकास आणि तत्वाचे आहे. माझ्यासारखा बुथवर काम करणारा कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष होतो हे भाजपमध्येच होऊ शकते."
काँग्रेस पक्षाने आचार, विचार सोडला
"काँग्रेस पक्षाने आचार, विचार आणि तत्व सोडले आहे. पक्ष स्थापन करताना केलेला विचार काँग्रेसने सोडला आहे. आज काँग्रेसचे देशातील नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. घटनेने तयार झालेल्या महत्वाच्या संस्थांपैकी निवडणूक आयोग एक आहे. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला महाराष्ट्रात बहुमत मिळाले. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. पण आम्ही कधीही निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले नाही. तर आमचा पराभव का झाला, यावर आम्ही विचार केला. पुढच्या चार महिन्यात आम्ही सरकार म्हणून निर्णय घेतले आणि चार महिने जीवाचे रान केले," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.