भारतविरोधी मोहिमेत पाकिस्तानचे घेतलेले सहकार्य, बांगलादेशातील देशभक्त नागरिकांना रुचणार नाही, याचा अंदाज युनूस सरकारला आहे. त्यामुळेच काहीही झाले, तरी पाकिस्तानपुढे नमते घेणार नाही, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजेच युनूस यांनी केलेली मागणी. थोडक्यात, सांगायचे तर बांगलादेशी नागरिकांना पुन्हा एकदा मूर्ख बनवण्याचा मोहम्मद युनूस यांचा हा डाव. त्यामुळे बांगलादेशींना भानावर येणे गरजेचे, अन्यथा जोवर निवडणुका होत नाहीत, तोवर युनूस यांची निरनिराळ्या अस्मितांची बनवाबनवी सुरूच राहणार, हे निश्चित!
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांना एक रक्तरंजित इतिहास. 1971 सालच्या बांगलादेशच्या स्वतंत्र चळवळीदरम्यान पाकिस्तानने बांगलादेशमध्ये प्रचंड अत्याचार केले. आता याचीच नुकसान भरपाई म्हणून बांगलादेशने पाकिस्तानकडून माफी आणि 4.3 अब्ज डॉलर्सची नुकतीच मागणी केली आहे. अर्थात, नैतिकदृष्ट्या हे सारे न्याय्य असले, तरी त्याची वेळ आणि आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे ही मागणी हास्यास्पदच ठरावी.
1971च्या नरसंहारात कित्येक लाख बांगलादेशी मारले गेले, अनेक स्त्रियांवर बलात्कार झाला आणि ज्या देशाने ही हिंसा केली, तो पाकिस्तान आजतागायत माफी तर दूरच, याची साधी कबुलीही देत नाही. अर्थात, गुन्हा करून नामानिराळे राहण्याचा पाकिस्तानचा जुनाच खेळ. परंतु प्रश्न असा आहे की, गेली 50 वर्षे गप्प बसलेला बांगलादेश आता अचानक का जागा झाला? त्याचे उत्तर मिळते, ते सध्याच्या बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये.
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर, मोहम्मद युनूस नावाचा तथाकथित अर्थतज्ज्ञ बांगलादेशच्या गादीवर बसवला गेला. विकासाचे राजकारण देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे असे सांगत, युनूस यांनी बघता बघता बांगलादेश धर्मांधांच्या ताब्यात दिला. यानंतर तेथील जनतेला सत्याची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली आहे. शेख हसीना यांच्या लोकशाही मार्गाने आलेल्या सत्ताकाळामध्ये बांगलादेशची आर्थिक प्रगती होत होती, महागाई आवाक्यात होती, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळत असल्याने गुंतवणूकदारही बांगलादेशच्या बाजारपेठेमध्ये रस दाखवत होते. मात्र, मोहम्मद युनूस यांच्या सरकार काळामध्ये ही सगळी सुखं इतिहासजमा झाली. आज महागाईमुळे दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी, अतिरिक्त पैसा बांगलादेशच्या नागरिकांना मोजावा लागत आहे. या सगळ्यापासून जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी हा अस्मितांचा खेळ युनूस खेळत आहेत.
स्वातंत्र्यानंतर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध अत्यंत मधूर असेच होते. त्या उलट परिस्थिती बांगलादेश-पाकिस्तान संबंधांची. मात्र, युनूस यांनी गादीवर येताच, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकला. धर्मांधांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, हिंदूंना लक्ष्य केल्याने भारत दुखावला गेला. ‘भारतविरोध’ हेच ज्याच्या जन्माचे अंतिम उद्दिष्ट आहे, अशा पाकिस्तानला ही संधीच वाटली. त्यामुळे भारताच्या विरोधात बांगलादेशला आम्ही हरप्रकारे सहकार्य करू असे सांगत, इस्लाममधील ‘उम्मा’च्या आणाभाका आणि एकमेकांना मिठ्या मारण्याचे उद्योग पाकिस्तानचे शरीफ आणि बांगलादेशचे युनूस यांनी केलेदेखील. युनूस यांनी तेव्हा मारलेली मिठी, आज पाकिस्तानसाठी मगरमिठी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. तेथील स्थिती इतकी खराब आहे की, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, चीन आणि आखाती देशांच्या दारात उभे राहूनही तो स्वतःची पत उभी करू शकत नाही. अतिरेक्यांना ‘स्ट्रॅटेजिक ऍसेट’ मानून आपण स्वतःतेच नुकसान करून घेत आहोत, हे गेली 75 वर्षे त्यांना समजत नाही आहे. अशातच बांगलादेशची ही मागणी ऐकून पाकिस्तानी नेत्यांची अवस्था, कुठे दुर्बुद्धी सुचली आणि मदतीचा हात पुढे केली, अशी झाली असेल.
मात्र, पाकिस्तानी नेत्यांना घाबरण्याचे काही एक कारण नाही. पाकिस्तानला विरोध हा तर मोहम्मद युनूसचा एक दिखावा आहे. भारताविषयी बांगलादेशी नागरिकांच्या मनात विष कालवण्यात युनूस यांना यश आले असले, तरीही पाकिस्तानविषयी आपुलकीची भावना बांगलादेशी नागरिकांच्या मनात नाही, हे युनूस जाणून आहेत. त्यामुळे भारतविरोधी मोहिमेत पाकिस्तानचे घेतलेले सहकार्य, बांगलादेशातील देशभक्त नागरिकांना रुचणार नाही, याचा अंदाज युनूस सरकारला आहे. त्यामुळेच काहीही झाले, तरी पाकिस्तानपुढे नमते घेणार नाही, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजेच युनूस यांनी केलेली मागणी. थोडक्यात, सांगायचे तर बांगलादेशी नागरिकांना पुन्हा एकदा मूर्ख बनवण्याचा मोहम्मद युनूस यांचा हा डाव. त्यामुळे बांगलादेशींना भानावर येणे गरजेचे, अन्यथा जोवर निवडणुका होत नाहीत, तोवर युनूस यांची निरनिराळ्या अस्मितांची बनवाबनवी सुरूच राहणार, हे निश्चित!
कौस्तुभ वीरकर