मुंबईच्या समृद्ध इतिहासाचे वारसादर्शन

    20-Apr-2025
Total Views | 16
A legacy of Mumbai


नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक वारसा दिना’निमित्ताने मुंबईच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणार्‍या ‘वारसा मुंबईचा’ या पुस्तकाचा घेतलेला हा कानोसा...

मुंबईकर-पुणेकर-नागपूरकरांच्या पुढे ‘कर’ जोडताना पु.ल. हे लिहून गेले आहेत, “.... एक तर मुंबईच नव्हती. ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच.” ते तत्कालीन व्यंगात्मक लेखन होते. त्याचा आस्वाद घेत आपण सगळेच मनमुराद हसतो. पण, वास्तवात मुंबई आणि मुंबई भोवतालच्या परिसराला हजारो, किंबहुना कोटींच्या कोटी वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत पुरातत्त्वज्ञ आणि कलेतिहासकार डॉ. सूरज पंडित यांनी ‘अपरांत आणि पुरातत्त्व विभाग व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ’ प्रकाशित ‘वारसा मुंबईचा’ या पुस्तकात तो समृद्ध इतिहास उलगडला आहे.

तो उलगडावा वाटला याचे कारण सूरज पंडित यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात, “मला कायम प्रश्न पडत असत, ही मुंबई अशी का आहे? ही जर पोर्तुगीज-ब्रिटिशांनी वसवलेली असेल, तर प्राचीन साहित्यात तिचे उल्लेख कसे येतात? या प्रश्नांचा मागोवा घेताना एक प्रवास सुरू झाला. त्याला साथ मिळाली ती ‘मुंबई महानगर विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एमएमआरडीए’च्या वारसा संवर्धन विभागाची आणि त्याअंतर्गत उभ्या राहिलेल्या प्रकल्पाची. या प्रकल्पाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूरज पंडित यांनी सुरू केलेला तो प्रवास या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. इतिहास संशोधनाचे स्रोत कोणते? त्यातही प्राचीन इतिहासाचे स्रोत कोणते? अश्मयुगीन हत्यारे, अवशेष, भांडी, त्यापुढे ताम्रपट, शिलालेख, स्तुप, लेणी, मूर्ती, वेद-पुराण-ग्रंथ, परकीय प्रवासी आणि त्यांचे अनुभव, नाणी, वस्तू इत्यादी. या सर्वांचा साद्यन्त अभ्यास करून इतिहास उलगडत जातो.

भारतीय उपखंड आणि त्यातही भारतीय द्वीपकल्प हा भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जितका जुना आहे, तितकाच आधुनिकही आहे. म्हणजे काही कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला अरवली पर्वत कदाचित हिमालयापेक्षाही उंच होता, ज्याची धूप होत सध्या आहे, तितका उरला आहे. दुसर्‍या बाजूला हिमालय पर्वत निर्माण ही निरंतर प्रक्रिया अजूनही सुरू आहे. दरवर्षी काही मिलीमीटरने हिमालयाची उंची वाढत आहे. याच मालिकेत मुंबईचीदेखील गोष्ट येते. भारतीय उपखंड आशिया प्लेटकडे सरकत असताना लाव्हारस प्रचंड प्रमाणात वाहत होता, तो स्थिर होत होता, समुद्राची पातळी कमी-जास्त होत होती. पश्चिम किनार्‍यावरील डोंगररांगा, अजस्र सह्याद्री ही सर्व याची देणगी आहे. मुंबईची ही कथा सांगणारा ढळढळीत पुरावा अंधेरी भागात ‘गिलबर्ट हिल’च्या रूपात इमारतींच्या दाटीवाटीत उभा आहे.

मुंबई परिसरात ज्ञात इतिहास उलगडण्याची सुरुवात होते, ती शूर्पारक म्हणजेच आजच्या सोपार्‍यात. तिथे अशोकाच्या राजाज्ञा, स्तूप आणि अनेक प्राचीन मूर्ती आढळून आल्या आणि प्राचीन व्यापाराचा समृद्ध इतिहास प्रत्यक्षात आला. शूर्पारक या बंदराचा आणि परिसराचा इतिहास त्याही मागे जातो. मगधाची राजधानी पाटलीपुत्र आणि शूर्पारक परिसरातील चिंचणीचा पुत्रक यांची कहाणी चित्तवेधक आहे. शूर्पारक आणि पुढील काळात विकसित झालेली सेमूल म्हणजेच चौल, कल्याण आणि घोडबंदर ही बंदरे मुंबई परिसर प्राचीन काळापासून व्यापारी वृत्ती-प्रकृतीचा असल्याचे द्योतक आहेत.

मुंबईचा प्राचीन इतिहास उलगडण्यात कृष्णगिरी पर्वत आणि तेथील भिक्खू संघ हा खूप महत्त्वाचा स्रोत आहे. प्रामुख्याने सातवाहन काळात बहरलेल्या या भिक्खू संघाने एका प्रचंड मोठ्या लेणी समूहाची निर्मिती केली, ज्याला आपण सध्या ‘कान्हेरी लेणी’ म्हणून ओळखतो. भारतीय पौराणिक परंपरेत पौराणिक कथेमुळे, प्रत्यक्ष ती देवता तेथे अवतरल्याच्या, वास करीत असल्याच्या कथेमुळे मंदिराला, तेथील देवतेला माहात्म्य येते. तीच परंपरा बौद्ध-जैन या भारतीय पंथात-धम्मात दिसून येतात. बौद्ध विचारात ‘त्रिकाय’ संकल्पनेला महत्त्व आहे. त्यातच ‘धर्मकाय’ अशी एक संकल्पना येते आणि त्याचा आविष्कार साक्षात तथागत भगवान बुद्धांनी शूर्पारकला भेट दिल्याच्या कथेत दिसून येतो.

कान्हेरीची लेणी अनेक कारणांनी महत्त्वाची आहेत. त्या लेणी खोदण्यासाठी, तेथील भिक्खू संघासाठी सातवाहन ते त्रैकूटक ते कलचुरी अशा राजघराण्यांनी दाने दिलीच, पण त्यात व्यापार्‍यांनी, श्रेणीच्या ‘श्रेष्टींनी’ दिलेल्या दानांचे तपशीलवार वर्णन तेथील विस्तृत शिलालेखात आहेत. कान्हेरीच्या लेण्यांत कोकण किनारपट्टी ते मध्य आणि पश्चिम आशिया तसेच ग्रीक-रोमन साम्राज्याशी असणार्‍या व्यापाराचा विस्तृत पट उलगडतो. दोन मदारींच्या बॅक्ट्रियन उंटाचे शिल्प, ग्रिफिन या ग्रीक लोककथेतील सिंह आणि गरुड यांच्या मिश्रणातून होणार्‍या प्राण्याचे शिल्प यातून ते अधिक ठळक होते. नाशिकच्या ‘त्रिरश्मी’ लेण्यांतदेखील या ग्रिफिनचे शिल्प आहे, यातून या व्यापाराच्या विस्तृत पटाची कल्पना येते.

कान्हेरीबरोबरच जोगेश्वरी ही दुसरी महत्त्वाची लेणी आहेत. दक्षिण भारतातील सर्वांत जुने, किंबहुना भारतातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक असे जोगेश्वरी आहे. आज इतिहास अभ्यासाच्या सोयीकरिता तांत्रिकदृष्ट्या त्याचे वर्गीकरण लेणी या प्रकारात केले जात असले तरी ते एक मंदिर आहे. यातून हे दिसून येते की, मुंबईच्या परिसरात एकाच वेळी बौद्ध आणि हिंदू पद्धती-परंपरा गुण्यागोविंदाने नांदत होत्या, किंबहुना बहरत होत्या. त्या बहराचे पुढचे पाऊल म्हणजे घारापुरीची लेणी.

एका बाजूला मंदिर-लेणी-शिलालेख हे स्रोत धुंडाळत असताना तत्कालीन राजघराणी यांचाही आढावा सूरज पंडित यांनी घेतला आहे. मौर्य, सातवाहन, क्षत्रप, अभीर, गुप्त, वाकाटक, त्रैकूटक, कलचुरी, कोकण मौर्य, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, मोढ, यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, गुजरातचे सुलतान, मराठे, पोर्तुगीज, ब्रिटिश अशी सलग मालिका आहे. त्यात ‘श्रीस्थानक’ म्हणजेच ठाण्यातून राज्य करणार्‍या शिलाहारांनी कित्येक अप्रतिम देणग्या दिल्या आहेत. त्यात घोडबंदर, अंबरनाथ शिवमंदिर आणि कित्येक मूर्तींचा समावेश आहे. श्रीस्थानक अर्थात ठाणे हे अनेक आळ्या-पाखाड्या आणि तलावांचे शहर म्हणून नावारूपाला आले, ती शिलाहारांची कर्तबगारी आहे.

परकीय व्यापारी आणि त्यांच्या अनुभवांतून उलगडणारा इतिहास समृद्ध करणारा असतो. हर्षवर्धनच्या काळात भारतभ्रमणासाठी आलेल्या ह्युएन त्संगने आपले अनुभव लिहून ठेवले आहेत. आपल्या भ्रमणकाळात त्याने शूर्पारक, कृष्णगिरी भिक्खू संघ आणि तत्कालीन राजवटींची भेट घेतली होती. ह्युएन त्संग लिहितो, “इथली माणसं साधी, सरळ पण स्वाभिमानी आहेत.” हे वाचून आपल्याबद्दलच एक अभिमान वाटू लागतो.

आठव्या शतकात अग्निपूजक झरत्रुष्टच्या अनुयायांना इस्लामी आक्रमणापासून वाचण्यासाठी पळ काढावा लागला. ते संजानला उतरले आणि दुधात साखर, पाण्यात मीठ मिसळून जावे तसे मिसळून गेले. त्यांचाही संपर्क येथील लोकांशी, राजवटींशी आला आणि त्यांचे व्यापारी संबंध, त्यांचे अनुभव इतिहास उलगडण्यात मदत करतात. पर्शियन लोक अशा पद्धतीने आले, तर अरब व्यापारी त्यापूर्वीपासूनच येत-जात होते. त्याचे उल्लेख आणि संपर्क अनेक ठिकाणी दिसून येतात. उत्तर कोकणात ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले जाणारे ज्यूदेखील मिसळून गेले आणि मुंबई परिसराला समृद्ध करून गेले.

यादवांच्या पाडावानंतर उत्तरेत गुजरातेत इस्लामी आक्रमणे झाली आणि लोकांच्या स्थलांतराचा मोठा ओघ मुंबई परिसरात आला. त्यांनी ‘महिकावती’ म्हणजेच माहीमला आपली राजधानी थाटली. या स्थलांतरित लोकांमध्ये पाठारे प्रभू, सामवेदी ब्राह्मण आणि क्षत्रियांचा समावेश आहे. मुंबईचा परिसर अनेक राजघराणी, जगभरातील व्यापाराच्या निमित्ताने येणारे लोक, व्यापारी-औद्योगिक समृद्धीमुळे, इतर भागांतील आक्रमणे इत्यादींमुळे होणार्‍या स्थलांतरामुळे सातत्याने बदलता राहिला. मध्ययुगीन काळातील सुंदोपसुंदी आणि तांत्रिक प्रगतीकडे केलेले दुर्लक्ष आणि पोर्तुगीज-इंग्रजांची राजवट, हा इतिहास बहुतेकांना ज्ञात असतो. त्यामुळेच त्यापूर्वीचा समृद्ध इतिहास उलगडणारे हे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य आहे.

पंडित यांना सातत्याने पडणार्‍या प्रश्नांचा मागोवा घेताना, एका प्रकल्पांतर्गत हा इतिहास उलगडला आहे. तो एका वर्तमानपत्रात स्तंभलेखनाच्या माध्यमातून ते मांडत गेले आणि त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. सामान्य वाचकांसाठी अचंबित करणारी माहिती सोप्या शब्दांत आणि अभ्यासकांसाठी खोलात शिरण्यासाठी प्रवेशद्वार असे हे पुस्तक आहे. मुंबईत राहणार्‍या आणि भारतभरातील लोकांनाही ठाऊक असावे की मुंबईचा इतिहास प्राचीन आहे, यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, संग्राह्य आहे. मुंबईचा हा समृद्ध वारसा वाचून ही वारसास्थळे पाहण्याची, जतन करण्याची प्रेरणा मिळो, ही सदिच्छा!


पुस्तकाचे नाव : वारसा मुंबईचा
लेखक : सूरज पंडित
प्रकाशक : अपरांत प्रकाशन आणि पुरातत्त्व व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ प्रकाशन
मूल्य : 300 रूपये



शौनक कुलकर्णी 
9404670590
Sgk28774@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121