मुंबई : कुशल संघटक ज्येष्ठ नेते ग. दि. कुलथे यांच्या निधनामुळे शासन आणि अधिकारी-कर्मचारी संघटनेतील संवाद सेतू हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे सोमवार, १४ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने नेरूळ येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. दुपारी १वाजता नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-4, नेरुळ( पश्चिम), नवी मुंबई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसंदेशात म्हणाले की, "ग. दि. कुलथे यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कौशल्याने सोडवले. पारदर्शक प्रशासनासाठी आग्रही असणारे कुलथे स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी होते. महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी अतिशय कणखर भूमिका घेतली. राजपत्रित अधिकारी महासंघाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व करताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांत पारदर्शकता, संवेदनशीलता, जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. 'पगारात भागवा' सारखा अनोखा उपक्रम राबवला."
अधिकारी कर्मचारी प्रिय नेतृत्व गमावले
"राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन महासंघाच्या वतीने मदतीचा हात पुढे केला. ज्येष्ठ नेते कुलथे यांच्या निधनामुळे अधिकारी कर्मचारी प्रिय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.