प्रश्न असा होता की, शताब्दी वर्षानिमित्त संघाने दोन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. शाखांची संख्या एक लाखापर्यंत वाढवणे आणि पंचपरिवर्तनाची कल्पना प्रत्यक्षात आणणे. हे वृत्तीतील बदलाचे संकेत देते का? त्यावर उत्तर देत सरकार्यवाह म्हणाले, हे सर्व संघाच्या विचारसरणीचे मूळ घटक आहेत. प्रगतीच्या मार्गावर उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने आपण पुढे जात असताना, नवीन दरवाजे उघडत राहतात. हिंदुत्व हे काही अमूर्त अध्यात्मिक ज्ञान नाही, तर ती जीवनपद्धती आहे. हिंदुत्वाचा अर्थ केवळ कलम ३७० हटवणे, गोरक्षण करणे किंवा अयोध्येत राम मंदिर बांधणे असा होत नाही. पंचपरिवर्तनात असलेल्या सर्व गोष्टी हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. बदलत्या काळाशी जुळवून घेणे हा हिंदू समाजाचा स्वभाव आहे. जिवंत समाजात वेळोवेळी बदल आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून पंचपरिवर्तन हे राष्ट्रधर्म आणि युगधर्म या दोन्हींशी जोडलेले आहे.