ईदच्या दिवशी धामी सरकारचे धाडसी पाऊल; औरंगजेबपुरचे झाले शिवाजी नगर!

01 Apr 2025 15:02:00

Pushkar Singh Dhami

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangzebpur becomes Shivaji Nagar) 
उत्तराखंडच्या धामी सरकारने रमजान ईदच्या दिवशी औरंगजेबपुरचे नामांतर शिवाजी नगर करत धाडसी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तराखंडमधील ४ जिल्ह्यांतील १७ ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या ठिकाणांची यादी शेअर केली आहे. भारतीय संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही नावे बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचलंत का? : वैदिक गणिताला सरकारी पाठबळ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यंनी पोस्ट केलेल्या यादीनुसार, हरिद्वार जिल्ह्यातील दहा ठिकाणांचा उल्लेख यामध्ये आहे. त्यात भगवानपुर ब्लॉकमधील औरंगजेबपुरचे नामांतर शिवाजी नगर करण्यात आले आहे. बहादराबाद ब्लॉकमधील गाजीवाली आणि चांदपुरचे नाव अनुक्रमे आर्य नगर, ज्योतिबा फुले नगर केले. नारसन ब्लॉकमधील मोहम्मदपुर जट व खानपुर कुर्सली यांचे नामांतर अनुक्रमे मोहनपुर जट व अंबेडकर नगर असे केले आहे. खानपुर ब्लॉक मधील इरदीशपुर व खानपुर यांचे नामांतर अनुक्रमे नंदपुर व श्रीकृष्णपुर करण्यात आले आहे. रुड़की ब्लॉक अकबरपुर फाजलपुरचे नामांतर विजयनगर केले आहे. तर रुड़की नगर निगम विभागातील आसफनगर व सलेमपुर राजपूतानाचे नामांतर अनुक्रमे देवनारायण नगर व शूरसेन नगर करण्यात आले आहे.


देहरादून जिल्हा पाहता मियांवाला शहराचे नामांतर रामजीवाला झाले आहे. विकासनगर ब्लॉकमधील पीरवाला आणि चांदपुर खुर्द यांचे नामांतर अनुक्रमे केसरी नगर व पृथ्वीराज नगर करण्यात आले आहे. तसेच सहसपुर ब्लॉकबाबत पाहिल्यास अब्दुल्लापुरचे नामांतर दक्षनगर करण्यात आले आहे. नैनीताल जिल्ह्यातही दोन ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. नवाबी रोडचे अटल मार्ग नामांतर झाले असून पनचक्की से आईटीआई मार्गचे नामांतर गुरु गोवलकर मार्ग करण्यात आले आहे. त्यानंतर उधम सिंह नगर जिल्ह्यातील नगर पंचायत सुल्तानपुर पट्टीचे नामांतर कौशल्यापूरी झाले आहे.


Powered By Sangraha 9.0