भुवनेश्वर : ( Kamakhya Express Accident 11 coaches derail ) ‘बंगळुरु-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्सप्रेस’ला ओडिशातील कटक जिल्ह्यात नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११.५४ वाजता अपघात झाला. या रेल्वेगाडीचे ११ डबे रूळावरून घसरले असून अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तीन रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
‘पूर्व तट रेल्वे’चे महाव्यवस्थापक आणि खोरदा रोडचे विभागीय रेल्वेव्यवस्थापक यांसह वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी वैद्यकीय मदत, गाड्या पाठवण्यात आल्या आहेत. ‘पूर्व तट रेल्वे’कडून अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली जात आहे.
प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले असून भुवनेश्वर, भद्रक आणि कटक रेल्वेस्थानकांवर मदतकक्ष उभारण्यात आले आहेत, असे ‘पूर्व तट रेल्वे’च्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच, “या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आमचा मुख्य भर या मार्गावरील अडकलेल्या गाड्यांचे नियोजन आणि अपघातस्थळी प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवण्यावर आहे. त्यांच्या सुटकेसाठी लवकरच विशेष ट्रेनची व्यवस्था केली जाईल,” असे ‘पूर्व तट रेल्वे’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले.