महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्राच्या ‘प्रसाद’ योजनेत करावा

- माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

    29-Mar-2025
Total Views |
 
Ashtavinayak temples in Maharashtra should be included in the Centrel goverment Prasad scheme rahul shewale
 
मुंबई: ( Ashtavinayak temples in Maharashtra should be included in the Centrel goverment Prasad scheme rahul shewale ) केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन योजना म्हणजेच ‘प्रसाद’ योजनेत करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याविषयीचे लेखी निवेदन शेवाळे यांनी केंद्रीय संस्कृतिक मंत्री गंजेंद्रसिंह शेखावत यांना सादर केले आहे.
 
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "मोरगाव येथील मोरेश्वर, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक,पाली येथील बल्लाळेश्वर, महाड येथील वरदविनायक, थेऊर येथील चिंतामणी,लेण्याद्री येथील गिरिजात्मज, ओझर येथील विघ्नेश्वर आणि रांजणगाव येथील महागणपती ही मंदिरे अष्टविनायक म्हणून ओळखली जातात. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही अष्टविनायक मंदिरे आपला संस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा आहे.
 
या मंदिरांचा समावेश प्रसाद योजनेत झाल्यास देशभरातील इतर महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसोबत अष्टविनायक मंदिरे जोडली जातील. इथल्या पायाभूत सुविधांचा विकास होऊन भाविकांना सोई सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल"
 
फायदा काय होणार?
 
केंद्र सरकारने ‘प्रसाद’ योजनेच्या माध्यमातून देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत तीर्थक्षेत्रांचे संवर्धन करतानाच त्याठिकाणी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, पर्यटनाला चालना देणे, समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करणे, भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे अशा महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे भाविकांना देखील मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होतात.