शिवरायांच्या मंदिरासाठी राज्य सरकार महिन्याला ५० हजार रुपये देणार

    28-Mar-2025
Total Views |

 Chatrapati Shivaji Maharaj Temple
 
मुंबई : सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  (Chatrapati Shivaji Maharaj Temple) मंदिराला (श्री शिवराजेश्वर मंदिर) दर महिना २५० ऐवजी ५० हजार रुपये देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल सचिवांना दिले आहेत. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये खर्च होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी तुटपुंजे अर्थसाहाय्य हा अन्याय आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.
 
या मागणीवर शिंदे यांनी महसूल विभागाच्या सचिवांना श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी दरमहा २५० रुपयांऐवजी ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. या वेळी शासनाची मदत मिळण्याआधी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने वैयक्तिकरित्या महाराजांच्या मंदिरासाठी ५० हजार रुपयांचे साहाय्य केले. तसेच त्यांनी नियमितपणे मंदिरासाठी निधी घेऊन जाण्यासही सांगितले.
 
केंद्रात काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१२ पासून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी देणे सुरू करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी ६.५० लाख रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करता औरंगजेब हा एक क्रूर आक्रमक होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्या केली. असा आक्रमक आदरास पात्र नाही आणि त्याच्या कबरीच्या देखभालीसाठी निधी खर्च करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. त्यामुळे हा निधी सरकारने बंद करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली.
सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास करा!
 
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे येथे लाखो शिवप्रेमी आणि पर्यटक येतात. किल्ल्यावर बोटीने यावे लागते. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची योग्य सोय करणे आवश्यक आहे. किल्ला मोठा असल्यामुळे झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्या हटवून किल्ल्याचे सुशोभीकरण करणे, परिसरात सुंदर बगीचा तयार करणे, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह आणि गोड्या पाण्याच्या विहिरीचे सुशोभीकरण करणे यांसारखी अनेक विकास कामे तातडीने व्हावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.