मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईतील फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा करुन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच फनेल झोनसारखे निर्णय स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
मुंबईतील सांताक्रृझ, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निबंर्धामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तेवढया क्षेत्राचा टिडीआर मालकाला उपलब्ध करुन देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
हे वाचलंत का? - दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवे वळण! वडिलांचं अफेयर आणि...
माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, “मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगवेगळ्या कारणांमुळे रखडला आहे. मुंबई बँक ही मुंबईतील सहकारी संस्थांची शिखर बँक असून मुंबईतील हाऊसिंग सोसायट्या मुंबई बँकेच्या सभासद आहेत. या हाऊसिंग सोसायटयांबरोबरच इतरही सोसायट्यांना पुनर्विकासात मदत करण्याच्या दृष्टीने मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज योजना सुरु केली. आतापर्यंत बँकेकडे १६०० गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुनर्विकासासाठी बँकेशी संपर्क साधला आहे. २२ प्रकल्पांना आम्ही मंजुरी दिली, १५ सोसायट्यांना २५६ कोटी रुपयांचे कर्ज दिले तर ७ प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेले असून त्यांच्या इमारतीही उभ्या राहिल्यात.”
“२०२३ पासून सेल्फ रिडेव्हलपमेंटचे हे प्रकल्प पूर्ण करताना ज्या अडचणी आमच्या लक्षात आल्या त्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही आम्ही स्वयंपुनर्विकासातील १२ अडचणींबाबतचे निवेदन दिले होते. फनेल झोनमधल्या सोसायट्यांचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा येत असल्याने त्यांचा पुनर्विकास होत नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना टीडीआर द्यावा, शासकीय शुल्क, प्रिमियममध्ये सवलत द्यावी, अशी मागणी आम्ही त्या निवेदनात केली होती. शासनाने ही मागणी मान्य केली आहे,” असे प्रविण दरेकर यांनी सांगितले. तसेच फनेल झोनमधील सर्व सोसायट्यांच्या वतीने महायूती सरकारचे आभार मानले.