मुंबई: ( Monsoon session from June 30 ) बहुचर्चित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवार, दि. २६ मार्च रोजी सूप वाजले. येत्या दि. ३० जून रोजीपासून मुंबईतील विधान भवनात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.
अधिवेशन कालावधीत 16 दिवस प्रत्यक्ष कामकाज झाले. विविध कारणांमुळे १ तास, २५ मिनिटे वेळ वाया गेला. मंत्री उपस्थित नसल्याने २० मिनिटे वाया गेली. रोजचे सरासरी कामकाज ९ तास, ७ मिनिटे इतके झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४९१ प्रश्न स्वीकृत झाले. त्यातील ७६ प्रश्नांवर मंत्र्यांनी उत्तरे दिली. २ हजार, ५५७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या.
त्यातील ४४२ स्वीकारण्यात आल्या. त्यांपैकी १२९ वर चर्चा झाली. विधानसभेत नऊ, तर विधान परिषदेत तीन शासकीय विधेयके संमत झाली. ४२ अशासकीय विधेयके प्राप्त झाली, त्यापैकी २२ विचारात घेण्यात आली, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.