नवी दिल्ली: ( MP Jagdambika Pal Wakf reforms ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’विरुद्धच्या देशव्यापी आंदोलनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ (एआयएमपीएलबी)वर टीका केली आहे. तसेच या मुद्द्याचे राजकराण करत असल्याचा आरोपही त्यांनी बोर्डावर केला आहे.
‘वक्फ सुधारणा विधेयक’ हे घटनाविरोधी असल्याचा दावा ‘एआयएमपीएलबी’ने केला आहे. त्यासाठी बुधवार, दि. 26 मार्च रोजी बिहारची राजधानी पटना येथे आंदोलन केले. त्यावर ‘वक्फ’ विधेयकाच्या ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी टीका केली. ते म्हणाले की, “ज्या पद्धतीने ‘एआयएमपीएलबी’ ‘वक्फ’च्या नावाखाली राजकारण करत आहे, ते देशातील अल्पसंख्याक आणि मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
पाल यांनी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालाचा संदर्भ देत विधेयकाभोवतीच्या वादावर टीका केली. ते म्हणाले, “विधेयक अद्याप मंजूर झालेले नाही. तरीदेखील ‘एआयएमपीएलबी’ आधीच राजकीय हेतूंवर आधारित निदर्शने आयोजित करत आहे. याद्वारे देशातील मुस्लिमांची दिशाभूल केली जात आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.