मुंबई: ( Shiv Sena MLA chant on Take action against the Kunal Kamra ) शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्यातून बदनामी करणाऱ्या कुणाल कामराविरोधात शिवसेना आमदारांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधान भवन परिसरात आक्रमक घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अवमानाबाबत कुणाल कामरावर सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली.
शिवसेना आमदारांनी विकृत कुणाल कामराविरोधात घोषणाबाजी केली. कामराचा बोलविता धनी कोण याचा सरकारने शोध घ्यावा, अशी मागणी केली. कुणाल कामराचे गाणं व्हायरल झाल्यानंतर रविवारी रात्रीपासून कामरा विरोधात शिवसैनिकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खार पोलीसांत जाऊन या प्रकरणी तक्रार केली. कामरा याचा स्टुडिओ अनधिकृत असल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या की, कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस आहे. यापूर्वी देखील कामरा याने अशीच विकृती दाखवली होती. माननीय एकनाथ शिंदे यांचा एक शेतकरी पुत्र, रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा जीवन प्रवास काही नतद्रष्ट लोकांच्या डोळ्यात खुपतोय, त्यामुळे अशा विकृत लोकांला हाताशी धरुन उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केली जात आहे, असे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या. काही लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रगती खटकतेय.
एक सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री बनला हे आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडले असते, असे आमदार कायंदे म्हणाल्या. आरजे मलिष्का, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने सुडापोटी कारवाई केली होती. तेव्हा संविधान नव्हते का, शोच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे, निंदा करणे ही कला आहे का असा सवाल आमदार कायंदे यांनी उपस्थित केला.
नाक घासून माफी मागावी
कुणाल कामरा याने नाक घासून माफी मागावी आणि वादग्रस्त गाणे सोशल मीडिया हँडलवरुन डिलीट करावे. स्टॅंडअप काँमेडीवर सेन्सॉरशीप असायला हवी. संविधान हातात घेऊन ज्यांनी निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवले त्यांचे खरे चेहरे आज समोर आले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण केली. उबाठाचे कार्यकर्ते संपले म्हणून एका कॉमेडियनची मदत घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी खरमरीत टीका मनीषा कायंदे यांनी केली.