औरंगजेब भारताचा आदर्श होऊ शकत नाही!

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची परखड भूमिका

    24-Mar-2025   
Total Views |

Dattatray Hosbale on Aurangzeb Controversy

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale on Aurangzeb Controversy)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप त्याचबरोबर इथल्या परंपरा आणि मातीशी जोडलेला दारा शुकोह हे भारताचे आदर्श होऊ शकतात. औरंगजेबासारखा परकीय आक्रांत स्वतंत्र भारताचा आदर्श होऊ शकत नाही", अशी परखड भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी मांडली. बंगळुरू येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

हे वाचलंत का? : राणा सांगा यांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या सपा खासदाराची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर

औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी नागपुरात हैदोस घातला. यावर औरंगजेब प्रासंगिक नाही अशी भूमिका संघाने यापूर्वीच मांडली असली, तरी यावर सविस्तर उत्तर दत्तात्रेय होसबळेंनी दिले आहे. ते म्हणाले, "दिल्लीमध्ये औरंगजेब रोड होता, त्याचे नामांतर करून त्याला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड असे नाव दिले, म्हणजेच त्यामागे काहीतरी असे निश्चित धोरण होते. परकीय आक्रांतांची मानसिकता सोडण्याची गरज या नामांतरातून आपण पूर्ण केली. हा विषय केवळ धर्माचा नाही, तर भारतातली संस्कृती, परंपरा आणि मातीशी संबंधित विषय आहे."

पुढे ते म्हणाले, इंग्रजांबरोबर भारताने स्वातंत्र्य युद्ध लढले. पण त्याआधी देखील देशात परकीय आक्रमकांविरुद्ध स्वातंत्र्य युद्धे झाली. महाराणा प्रताप यांनी लढलेले युद्ध हे स्वातंत्र्य युद्धच होते. कारण त्यांनी परकीय आक्रमकांविरुद्ध लढा दिला होता. भगिनी निवेदिता भारतात आल्या, त्या ख्रिश्चन असल्या तरी इथल्या धर्म परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडल्या गेल्या. त्याचप्रमाणे दारा शुकोह सुद्धा भारताच्या संस्कृतीशी इथल्या मातीशी आणि परंपरांशी जोडला गेला. त्याला कोणी आदर्श म्हणून संबोधले नाही. गंगा जमनी तहजीबच्या बाता मारणाऱ्यांनी औरंगजेबाला पुढे आणले. भारतावर आक्रमण केलेल्यांना आदर्श बनवायचे त्यांचे धोरण दिसते. परकीय आक्रांत औरंगजेब हा स्वतंत्र भारताचा आदर्श कदापी होऊ शकत नाही.

विश्व शांती आणि समृद्धीसाठी सुसंवादी व संघटित हिंदू समाजाची निर्मिती
अनादी काळापासून हिंदू समाज एका दीर्घ आणि अविस्मरणीय अशा मानवी एकता आणि विश्व कल्याणाच्या प्रवासात गुंतलेला आहे. संत, धार्मिक नेते आणि महापुरुषांच्या आशीर्वादामुळे आणि प्रयत्नांमुळे, ज्यामध्ये तेजस्वी मातृशक्तीचा समावेश आहे, आपले राष्ट्र अनेक चढ-उतार असूनही सतत पुढे जात आहे. धर्माच्या पायावर आधारित आत्मविश्वासाने भरलेल्या संघटित सामूहिक जीवनाच्या आधारावरच हिंदू समाज आपली जागतिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकेल असा संघाचा विश्वास आहे. म्हणूनच पंचपरिवर्तनाला धरून समाजाची प्रतिमा निर्माण करण्याचा संकल्प करणे हे आपले कर्तव्य आहे. या आधारावर, आपण समाजाचे सर्व प्रश्न सोडवू शकू, त्यांच्या आव्हानांना उत्तर देऊ शकू आणि भौतिक समृद्धी आणि अध्यात्माने परिपूर्ण एक मजबूत राष्ट्र निर्माण करू शकू. सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जगासमोर एक आदर्श निर्माण करणारा सुसंवादी आणि अखंड भारत निर्माण करण्याचा संकल्प झालेल्या बैठकीतून करण्यात आला आहे.

महाराणी अब्बक्का यांचे जीवन नागरिकांसाठी प्रेरणादायी
भारताच्या महान महिला स्वातंत्र्यसेनानी महाराणी अब्बक्का, एक कुशल प्रशासक, अजेय रणनीतीकार आणि एक महापराक्रमी शासक होत्या. भारताच्या सर्वसमावेशक परंपरेचे अनुसरण करून राणी अब्बक्का यांनी अनेक शिवमंदिर आणि तीर्थस्थळे विकसित केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्व धर्मांच्या अनुयायांना समान आदर आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला. म्हणूनच त्यांच्या सद्भावना आणि एकतेचा वारसा आजही कर्नाटकात त्यांच्या प्रेरणादायी कथा, लोकगीते आणि लोकनृत्यांमधून प्रतिध्वनित होतो. २००३ मध्ये भारत सरकारने महाराणी अब्बक्का यांच्या अतुलनीय शौर्य, देश आणि धर्माप्रती असलेली निष्ठा आणि कार्यक्षम प्रशासनाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे चरित्र संपूर्ण देशातील लोकांमध्ये पसरवण्यासाठी त्यांच्या नावाने एक टपाल तिकिट जारी केले. २००९ मध्ये, एका गस्ती जहाजाला राणी अब्बक्का यांचे नाव देण्यात आले जेणेकरून विजयी नौदलाचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता प्रेरित होईल. महाराणी अब्बक्का यांचे जीवन संपूर्ण देशातील नागरिकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त संघाने त्यांना आदरांजली वाहत संपूर्ण समाजाला त्यांच्या गौरवशाली जीवनातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीच्या महान कार्यात प्रभावी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

सर्वसमावेशकतेने काम करण्याचा संकल्प
आगामी वर्ष हे संघ कार्याचा विस्तार आणि बळकटीकरणावर केंद्रीत असेल. यात संघाचा उद्देश आत्मपरीक्षण करणे, संघकार्यासाठी समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि राष्ट्रासाठी तसेच समाज संघटित करण्यासाठी त्यामध्ये स्वतःला समर्पित करणे हा आहे. एकुणच संघाने शताब्दी वर्षात अधिक काळजीपूर्वक, गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेने काम करण्याचा संकल्प केला आहे.

संघ शताब्दीच्या काळात पुढील विशिष्ट उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाईल :

१) मंडल तथा नगर स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातील. दरवर्षी प्रमाणे सरसंघचालक विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांना संबोधित करतील.

२) नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या तीन महिन्यांच्या कालावधीत घरोघरी संपर्क मोहीम आखण्यात आली आहे. ज्याचा विषय 'हर गांव, हर बस्ती, घर-घर' असा असेल. संपर्कादरम्यान संघ साहित्याचे वाटप केले जाईल आणि स्थानिक घटकांकडून कार्यक्रम आयोजित केले जातील.

३) सर्व मंडलं आणि वस्त्यांमध्ये हिंदू परिषदा आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाच्या जीवनात एकता व समरसता, राष्ट्राच्या विकासात सर्वांचे योगदान आणि पंचपरिवर्तनातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असा संदेश देण्यात येईल.

४) खंड किंवा नगर स्तरावर सामाजिक समरसता बैठका आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये एकत्र राहण्यावर अधिक भर दिला जाईल. सांस्कृतिक आधार आणि हिंदू चारित्र्य न गमावता आधुनिक जीवन जगण्याचा संदेश देणे हा या बैठकांचा उद्देश असेल

५) जिल्हा स्तरावर प्रमुख नागरिक संवाद आयोजित केले जातील. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय समस्यांवर योग्य चर्चा घडवून आणणे आणि आज प्रचलित असलेले गैरसमज दूर करण्यावर भर दिला जाईल.

६) विविध प्रांतांद्वारे युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. 15 ते 30 वयोगटातील तरुणांसाठी राष्ट्र उभारणी, सेवा उपक्रम आणि पंचपरिवर्तन यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित केले जातील. स्थानिक घटक गरजेनुसार कार्यक्रम आखतील.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक