मुंबई, दि.२१ : प्रतिनिधी गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मार्गाचा वापर करणाऱ्या बोटींमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली. तारांकित प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.
गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा प्रवासी वाहतूकीचे नियंत्रण व नियमन महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात येते. गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा व घारापुरी येथे जाणाऱ्या प्रवासी बोटींचे तिकीट दर हे मुंबई बंदर प्राधिकरण यांच्या कडून निश्चित केले जातात. गेट वे ऑफ इंडिया येथील हार्बर क्षेत्रात वाहतूक करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरण यांचेकडून हार्बर लायसन्स देण्यात येते. गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे प्रस्ताव दिले.
या ४९ प्रस्तावांना मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर आणि एलिफंटा या जलमार्गासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगिक तत्त्वावर दि.२५ मे २०२५पर्यन्त प्रति महिना प्रति स्पीडबोटीसाठी रु.४९९९ (जीएसटी सहित) किंवा डिसेंबर, २०२४ ते मे, २०२५ या कालावधीकरीता रक्कम रु.३०,००० (जीएसटी सहित) इतके परवानगीकरीताचे प्रवासी शुल्क महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जलमार्गासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. या ४९ स्पीड बोटींकडून रु.६,५९,९२२/- (जीएसटीसहित) महसूल शुल्क स्पीड बोट मालकाकडून प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा यांच्याकडे जमा करण्यात आलेली आहे. तसेच,या जेट्टीचा वापर करणाऱ्या बोटींमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे प्रत्येक वेळीकरीता ७७ रुपये प्रतिव्यक्ती, सिझन पास १०,७२८ रुपये आणि हाफ सिझन पास ५,७१० रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तरात देण्यात आली आहे.
----------------
वाढवण बंदरामुळे भारताचे सागरी महत्व वाढणार : नितेश राणे
"नॅशनल हायवे च्या माध्यमातून तसेच उद्योग विभागाच्या माध्यमातून या भागात रस्ते विकास केला जात आहे. जेएनपीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली जात आहे. तिसरी मुंबई उभी करण्यासंदर्भात ही सरकारची महत्त्वाची भूमिका आणि मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे. या संदर्भात संबंधित खात्याचे मंत्री योग्य पद्धतीने उत्तर देत आहेत. मात्र त्याचवेळी वाढवण बंदरामुळे अधिक विकासाची गती वाढणार आहे. आणि देशही जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकापर्यंत नेण्याची क्षमता या वाढवण बंदराची आहे."
- नितेश राणे, मंत्री