मुंबई: ( Twist in Legislative Council elections ) विरोधकांकडे एकही आमदार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. सोमवार, दि. १७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
त्यासाठी भाजपने तीन, राष्ट्रवादी एक आणि शिवसेनेने एका उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केणेकर आणि माजी आमदार दादाराव केचे यांना संधी दिली आहे, तर शिवसेनेने नंदूरबारच्या चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे. खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
आमशा पाडवी (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी), प्रवीण दटके (भाजप), गोपीचंद पडळकर (भाजप) आणि रमेश कराड (भाजप) हे विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या पाच जागा विधान परिषदेत रिक्त झाल्या आहेत आणि दि. २७ मार्च रोजी त्या जागा भरण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने दिलेल्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकीसाठी दि. १० मार्च ते दि. १७ मार्च रोजीदरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, तर मंगळवार, दि. १८ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. दि. २० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल आणि दि. २७ मार्च या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडेल.