रांची : झारखंडमधील गिरडीहमध्ये शुक्रवारी १४ मार्च रोजी म्हणजेच धुलीवंदना (Holi) दिवशी कट्टरपंथींनी होळी उत्सवादरम्यान दगडफेक केली. यामुळे घटनास्थळी सध्या तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये दोन-तीन दुचाकी पेटवण्यात आल्या आणि काही कारचाही यामध्ये समावेश आहे. संबंधित घटनेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ही घटना घोडबंद येथे घडली असून एका कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर हल्ला केला. त्यामुळे वादंग निर्माण झाला.
या प्रकरणादरम्यान आता डीसीपी राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, परिसरात सध्या शांततेचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्यांची पोलीस ओळख पटवत आहेत. ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात येणार आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही. काही वाहनांना आगही लावण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एका प्रसारमाध्यमाशी बोलताना उपविकास आयुक्त स्मिता कुमारी यांनी घडलेल्या घटनेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, ही घटना होळीच्या उत्सवादरम्यान घडली. काही समाजकंटकांचा यामध्ये हात आहे. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या एका माहितीनुसार, काही समाजकंटकांनी हे घडवून आणल्याचा दावा करण्यात आला. याबाबत आता पुढील तपास सुरू आहे.