Case Study - दाभोळ किनारा वाढता वाढता वाढे; कासवांच्या घरट्यात चौपटीने वाढ

15 Mar 2025 11:29:55
Dabhol beach


मुंबई (अक्षय मांडवकर) -
गेल्या पाच वर्षांमध्ये दापोली तालुक्यातील दाभोळ किनार्‍यामध्ये घडलेल्या बदलांचा परिणाम सागरी कासवाचा विणीवर झालेला दिसून आला आहे (Dabhol beach). गेल्या पाच वर्षांत किनार्‍याच्या रुंदीत साधारण दीड किमीची वाढ झाली असून, कासवाची घरटीदेखील चौपटीने वाढली आहेत (Dabhol beach). त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात घडणारे अनेक बदलांचे हे एक सूतोवाच असून या बदलांच्या दीर्घकालीन अभ्यासाची करण्याची गरज तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. (Dabhol beach)
 
 
सध्या कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांची वीण सुरू आहे. दापोली तालुक्यातील केळशी, आडे, आंजर्ले, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे आणि दाभोळ या किनार्‍यावर कासवांची घरटी आढळतात. यंदा दापोली तालुक्यातील सर्वाधिक कासवाची घरटी ही दाभोळ किनार्‍यावर सापडली आहेत. शुक्रवारी दाभोळ किनार्‍यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे १३१ क्रमाकांचे घरटे सापडले. गेल्या पाच वर्षांत किनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर वाळू संचयनाला सुरुवात झाल्यापासून कासवांच्या घरट्यांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने कासव संवर्धनासाठी नेमलेल्या बीच मॅनेजरन मंडळींनी केले आहे. वशिष्ठी नदी ज्याठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते, त्याठिकाणी दाभोळ किनारा आहे. त्यामुळे याठिकाणी वाळूचे संचयन मोठ्या प्रमाणात होते. २०२२ ते २०२३ सालच्या दरम्यान या किनार्‍यावर वाळूचे संचयन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे ‘सॅटलाईट मॅप’वरील छायाचित्रांच्या माध्यमातून लक्षात येते.
 
 
२०२२ ते २०२३ या वर्षभरातील काळात याठिकाणी किनार्‍याची रुंदी साधारण एक ते दीड किमीने वाढल्याचे लक्षात येते. पावसाळ्यादरम्यान वाळूचे संचयन झालेले दिसते. किनार्‍याच्या वाढीबरोबर कासवांच्या घरट्यांमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. दाभोळ किनार्‍यावर २०२१ साली कासवाची २० आणि २०२२ साली दहा घरटी आढळून आली होती. मात्र, २०२३ साली किनार्‍यामध्ये वाढ झाल्यानंतर ५१ घरटी, २०२४ साली ५९ घरटी आणि २०२५ साली शुक्रवार, दि. १४ मार्च रोजीपर्यंत १३१ घरटी आढळून आली आहेत.
 
 
 
 
२०२३ साली दाभोळ किनार्‍यावर वाळूचे प्रमाण वाढवून किनार्‍याची वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याठिकाणी बांधलेला चार फूटांचा धूपप्रतिरोधक बंधारादेखील आता वाळू खाली गाडला गेला आहे. किनार्‍यामध्ये वाढ झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत कासवाच्या घरट्यांमध्येहीदेखील वाढ झाली आहे. - परेश वाडकर, बीच मॅनेजर, दाभोळ
 
 
तज्ज्ञांचे मत काय ?
महाराष्ट्राच्या किनार्‍यांमध्ये होणारे हे बदल अभ्यासण्याची गरज ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. दीपक आपटे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांमध्ये किनार्‍यांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, हे तपासून त्याच्या उपाययोजना सागरी कासव कृती आराखड्याच्या माध्यमातून होणे गरजेच्या आहेच. वाळूचे संचयनामध्ये वर्षागणिक बदल होत राहतात. आता ज्या किनार्‍यावर वाळूचे प्रमाण वाढले आहे, तिथे भविष्यात वाळू कमी होण्याचीही शक्यता आपटे यांनी बोलून दाखवली आहे.
Powered By Sangraha 9.0