मुंबई (सुहास शेलार) : नरिमन पॉईंट परिसरातील विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, तेथील पदपथाचा वापर ‘रोजा’ सोडण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कॅमेर्यात कैद झाली आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कुणाच्या धार्मिक कार्यक्रमाला आक्षेप असण्याचे कारण नाही; मात्र विधिमंडळासारख्या संवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या ठिकाणी रस्ता अडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अतिशय गंभीर आहे. भविष्यात ही प्रथा पडल्यास किंवा अन्य धर्मियांनीही हा रस्ता अडवून त्यांचा धार्मिक कार्यक्रम केल्यास हे निस्तरणे कठीण होऊ शकते.
विधानभवनासमोरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या डॉ. उषा मेहता चौकात येस बँकेच्या बाजूला असलेला पादचारी मार्ग रमजान चालू झाल्यापासून दररोज सायंकाळी रोजा सोडण्यासाठी अडवला जात आहे. नियमित सायंकाळी 6 वाजण्याच्या वेळेत या पादचारी मार्गावरच फलाहार ठेवून तेथे बैठका अंथरुन तेथे रोजा सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. यामुळे 1 तासाहून अधिक काळ हा पादचारी मार्ग पूर्णपणे बंद रहात आहे.
तासभर रस्ता बंद
रोजासाठी एक तासाहून अधिक काळ हा पदपथ बंद ठेवला जात असल्यामुळे पादचारी आणि तेथील छोटे-मोठे व्यावसायिक यांना अडचण येत आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीने येथील छोट्या व्यावसायिकांना याविषयी विचारले असता, ‘येथे अडचणच होते, मात्र याविषयी कुणी काही बोलत नाही’, असे सांगितले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू विधानभवनासमोरील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर काही पावलांवरच हा सर्व प्रकार चालू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.