आगरतळा : त्रिपुराच्या सिपाहिजला जिल्ह्यात सुमारे २०-२५ बांगलादेशी तस्करांनी भारत-बांगलादेश सीमेवरून घुसखोरी केली. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. संबंधित तस्करांनी भारतीय गुन्हेगारांसोबत मिसळत घुसखोरी केली होती. सायंकाळी ७. ३० वाजण्याच्या दरम्यान, बीएसएफच्या तैनात असलेल्या पथकाने त्यांना अडवले. इशारा असूनही तस्करांनी सैनिकांवर हल्ला केला. बीएसएफ जवान गंभीर जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमाच्या एका वृत्तानुसार, तस्करांनी सैनिकांची बंदुक हिसकवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका सैनिकाने स्वरंक्षणार्थ नॉन-लेथल पंप अॅक्शन गनमधून गोळी झाडली. यामध्ये, मोहम्मद आलमीन नावाचा बांगलादेशी तस्कर जखमी झाला आणि त्यानंतर बिशालगड या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह हा रुग्णालयाच्या शिवागारात ठेवण्यात आला होता.
या घडलेल्या घटनेची परिस्थिती लक्षात घेता, तीन सैनिक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे तस्कर कोण होते? त्यांचे या प्रकरणाशी संबंधित किती लांब धागेदोरे होते, याचा तपास पोलीस आणि बीएसएफ पथक करत आहेत.