मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Mohanji Bhagwat in Kerala) "हिंदूंनी आत्मविस्मरणातून जागृत होऊन यशस्वी हिंदू समाज घडवण्यासाठी आपली ताकद ओळखली पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. केरळच्या चेरुकोलपुझा येथे नुकतीच हिंदू धार्मिक सभेचा एक भाग म्हणून 'हिंदू एकता परिषद' आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सरसंघचालक यावेळी म्हणाले, संघटित समाज नेहमीच विजयी होतो, हा विश्वाचा नियम आहे. धर्म हा हिंदू समाजाचा प्राण आहे. जातिभेद आणि अस्पृश्यता हे धर्माच्या चौकटीबाहेरचे असून जर एकसंघ शक्ती म्हणून उदयास यायचे असेल तर त्या त्यागल्या पाहिजेत. सत्य, करुणा, सुचेता आणि तपस हे धर्माचे चार स्तंभ आहेत. या तत्त्वांमध्ये अस्पृश्यता आणि श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठतेच्या कल्पनांना स्थान नाही. धर्माची सुरुवात प्रत्येक व्यक्तीपासून झाली पाहिजे, एकतेचे अमृत पसरवण्याची हीच वेळ आहे. आपला धर्म हा एक वैश्विक दृष्टी आहे."
समाजाला आवाहन करत पुढे ते म्हणाले, "अधर्माच्या उदयाबद्दल नुसते शोक करून उपयोग होणार नाही. प्रत्येक कुटुंबाने आपल्या संस्कृतीवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर चिंतन करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा वेळ दिला पाहिजे. भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण या सहा 'भ' च्या आधारे धर्मरक्षणासाठी साधन म्हणून काम केले पाहिजे. आपण केवळ आपल्यासाठीच नाही तर समाजासाठीही वेळ काढला पाहिजे. ज्याप्रमाणे हनुमंताने महासागर ओलांडत रावणाला प्रभू श्री रामांचे सामर्थ्य दाखवण्यासाठी एकट्याने लंका जाळून टाकली, त्याचप्रमाणे हिंदूंनीही त्यांची शक्ती ओळखून संघटित झाले पाहिजे. हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघ शंभर वर्षांपासून करत आहे."