मुबंई: (Veer Savarkar) कवी मनाचे महान योद्धे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून ‘महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार’ दिला जाणार आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रकिनार्यावरून केली.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात, त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणागीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दोन लाख रुपये, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला होता, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षीपासून एका प्रेरणागीताचा सन्मान करणार आहे. माणसाचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास हा एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारणी देण्याचे काम काव्यपंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा, तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा, अशी या मागची कल्पना असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
सावरकरांच्या गीताची निवड का?
सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी दि. 8 जुलै 1910 या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली. सावरकर 60 यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे ‘अनादी मी, अनंत मी’ हे गीत होय. हे गीत म्हणजे सावरकरांचे अत्यंत भेदक, प्रेरणा, ऊ जार्र् देणारे हे शब्द आणि ओतप्रोत देशप्रेम याला शासनातर्फे वंदन करीत हा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. लवकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.
पुरस्कारासाठी समिती
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’ संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौर्यावर असून याबाबतची ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणागीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक विभिषण चवरे, चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे पाटील, ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या संचालक मिनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार कवींना देण्यात येणार असून कवी जर हयात नसतील, तर त्यांच्या नातेवाईक अथवा त्यांचा वारसा सांगणार्या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.