महाराष्ट्रातील डाळींब थेट ऑस्ट्रेलियात

19 Feb 2025 13:17:23

pomogranets


मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात(अपेडा) अ‍ॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा या डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.
ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबांच्या निर्यातीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२५मध्ये ऑस्ट्रेलियाला डाळिंबांच्या निर्यातीसाठी एक कार्य योजना व मानक कार्यपद्धतीवर स्वाक्षरी करण्यात आली. अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटनेने यशस्वी बाजारपेठ प्रवेश सुविधा दिल्यानंतर, जुलै २०२४मध्ये पहिली हवाई वाहतूक करण्यात आली. हवाई वाहतुकीमुळे बाजारपेठेतील मागणीचे मूल्यांकन करण्यास मदत झाली, जेणेकरून वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने समुद्री वाहतूक कशी करता येईल, याचा अभ्यास सुरु झाला.

महाराष्ट्रातील सोलापूर भागातून आणलेल्या ५.७ मेट्रिक टन डाळिंबांसह पहिली समुद्री मालवाहतूक ६ डिसेंबर २०२४रोजी भारतातून निघाली आणि १३ जानेवारी २०२५रोजी सिडनीला पोहोचली. वाहतुकीदरम्यान हे डाळिंब १,९०० बॉक्समध्ये/डब्यांमध्ये पॅक करण्यात आली होती. प्रत्येक डब्यात 3 किलो उच्च दर्जाची डाळिंब होती. यात भगवा जातीचे १८७२ बॉक्स (6.56 टन) वाहून नेणारी एक व्यावसायिक समुद्री शिपमेंट ६ जानेवारी २०२५ रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे पोहोचली. डाळिंबाची खेप पोचल्यावर, सिडनी, ब्रिस्बेन व मेलबर्नमध्ये त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जोरदार मागणीमुळे आधीच अतिरिक्त शिपमेंटसाठी तात्काळ मागण्या नोंदविण्यात आल्या आहेत. यातून भारत व ऑस्ट्रेलियामधील फायदेशीर तसेच शाश्वत व्यापार संबंधांची वाढती क्षमता दिसून येते आहे. मालवाहतुकीची वेळ ऑस्ट्रेलियाच्या उत्पादन नसलेल्या हंगामाशी धोरणात्मकरित्या जुळवून घेण्यात आली होती, जेणेकरून भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठेतील संधी जास्तीत जास्त असतील याची खात्री झाली.
अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव म्हणाले, “भारताचा कृषी निर्यातीचा लँडस्केप अभूतपूर्व वेगाने वाढत आहे, ताज्या फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे २९% वाढ होत आहे. केवळ डाळिंब निर्यातीत २०% वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाला प्रीमियम डाळिंबाची यशस्वी निर्यात ही भारताची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे ताजे उत्पादन पुरवण्याची क्षमता दर्शवते."

अपेडा नेमके काय?


अपेडा ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे जी कृषी व प्रक्रिया केलेले अन्न निर्यात सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ANARNET सारख्या ट्रेसेबिलिटी सिस्टीमद्वारे बाजारपेठ विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार व निर्यात प्रोत्साहन देऊन APEDA भारतीय शेतकरी तसेच कृषी व्यवसायांना पाठिंबा देऊ करते. ताजी फळे, भाज्या, बासमती तांदूळ व प्रक्रिया केलेले अन्न यांचा समावेश असलेल्या भारताची कृषी निर्यात सतत वाढत आहे, ज्यामुळे जागतिक कृषी-व्यापार क्षेत्रात देशाचे स्थान बळकट होत आहे.
Powered By Sangraha 9.0