भटके-विमुक्तांना सामाजिक सन्मान

12 Feb 2025 11:21:28

mahakumbh
 
 
पवित्र कुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. जातीपातीपलीकडे जाऊन संतमहंत हे सर्व हिंदू समाजाचे संतमहंत आहेत, हा संदेश यामध्ये होता. या महत्त्वाच्या घटनेच्या अनुषंगाने ‘भटके- विमुक्त विकास परिषदे’चा महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून भटके-विमुक्त समाजाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेणाराहा लेख...
 
सध्या मोठ्या भक्तिभावपूर्व वातावरणात महाकुंभ प्रयागराज येथे सुरू आहे. केवळ पंचांगामध्ये एक ओळ लिहून करोडो लोक आध्यात्मिक साधनेसाठी एकत्र येतात व अमृतस्नान करतात, सत्संग करतात, हे आजही जगाला पडलेले एक कोडेच आहे. हे कुंभ आध्यात्मिक पर्व आहे, आर्थिक पर्व आहे. त्याचप्रमाणे प्रयागराजचे महाकुंभ सामाजिक समरसतेचा मंत्र देणारा कुंभसुद्धा आहे. ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना याप्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील गोसावी समाजाचे भगत रोशन मकवान महाराज, धनगर समाजाचे गुरू पू. फरांदे महाराज, बंजारा समाजाचे संत पूज्य गोरक्षनाथ महाराज, योगेश्वर पुरी महाराज, सरोदी समाजाचे समाधान महाराज गुरालकर इत्यादी देशभरातील भटके-विमुक्त समाजातील १५० संतांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. दि. २६ जानेवारीला या सर्व साधुसंतांनी अमृतस्नान केले. या अभूतपूर्व सन्मान व योजनेसाठी संपूर्ण भटके समाजामध्ये आनंदाची वातावरण आहे. विशेष म्हणजे, संतसभेमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते या सर्व साधुसंतांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी भटके-विमुक्त समाजाची गौरवशाली परंपरा मांडली, तर भैय्याजी जोशी यांनी प्रत्येक कुंभात याप्रमाणे भटके-विमुक्त समाजातील संत, साधू, महाराज यांना विशेष निमंत्रित करण्याची योजना आखावी, असे आव्हान केले. “समरसतापूर्ण व्यवहार हेच सर्व सामाजिक प्रश्नांचे उत्तर आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
समाजातील संतमहंतांचा हा सन्मान समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. प्राचीन काळापासून ‘समन्वय, सहकार्य व सहयोग’ या तत्त्वावर आपला समाज मार्गक्रमण करीत आहे. प्रत्येक घटकाचे अस्तित्व लक्षात घेऊन त्याला आपला उत्कर्ष करण्याची संधी देणारा हा हिंदू धर्म. सहअस्तित्व हे या धर्माचे तत्त्व असल्यामुळे अनेक पंथ, उपासनापद्धती इथे विकसित होऊ शकल्या. परंतु, इस्लामी आक्रमणानंतर मात्र ही परंपरा खंडित झाली. या सुलतानी आक्रमणामुळे अनेक समाजांना भटकंती स्वीकारावी लागली. आपला देव, देश आणि धर्म टिकवण्यासाठी डोंगरदर्‍यांचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने शिकार, चोरी करावी लागली. धर्म टिकवण्यासाठी गावागावांत घराघरात जाऊन देवीचे जागरण, गोंधळ करून भिक्षा मागणारा हा भटके-विमुक्त समाज मुख्य प्रवाहापासून मात्र लांब गेला. पुढे इंग्रज आले. त्यांनी या समाजाला जन्मजात गुन्हेगार ठरविले. परिणामतः हा समाज पुन्हा अन्याय, अत्याचार, गरिबी व अज्ञानाच्या दलदलीमध्ये फसला. आपल्या माथ्यावरील ‘गुन्हेगार’ हा शिक्का पुसण्यासाठी हा समाज संघर्ष करू लागला. देश स्वतंत्र झाला. परंतु, अन्यय-अत्याचाराचा ससेमिरा काही संपला नाही. १९५२ मधील आपल्या सरकारने ’Habitual offender Act’ (सवयीचा गुन्हेगार कायदा) आणून या समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. कधी काळी देव, देश आणि धर्म टिकवण्यासाठी जीवन जगणार्‍या समाजाला आपण कुसाबाहेर ठेवले, अन्याय केला; हे नाकारून चालणार नाही. परिणामतः भटके-विमुक्त समाज मुख्य प्रवाहापासून जास्त लांब गेला.
 
या समाजाला प्रेमाने, आपुलकीने जवळ घेण्याची नितांत आवश्यकता होती. या समाजाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज होती. सामाजिक सन्मान या समाजाची भूक आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे होते. मागील अनेक वर्षांपासून यासाठी अनेक संस्था, संघटना याकरिता प्रयत्न करीत आहे. ‘भटके-विमुक्त विकास परिषद’, ‘समरसता गुरूकुलम्’, ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद’, ‘भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान’, ‘गोंधळी भटक्या विमुक्त जातीजमाती विकास संघ’, ‘घुमंतू’, ‘अर्धघुमंतू विकास परिषद’ यांसारख्या संघटना या समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहेत. या समाजावर होणार्‍या अन्याय, अत्याचार घटनांमध्ये सर्व संघटना भटके-विमुक्त समाजाच्यापाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात. परभणी येथील सिकलकरी समाजाच्या अल्पवयीन मुलावर झालेला जीवघेणा हल्ला असो किंवा परभणी येथील वैदू समाजाच्या अल्पवयीन मुलीच्या छेडखानीचे प्रकरण असो, हिंगोली येथे गोसावी समाजाच्या महिलेवर झालेला हल्ला असो, या सर्व घटनांमध्ये संपूर्ण हिंदू समाज या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. वरील सर्व घटनांमुळे भटके-विमुक्त समाजाच्या मनामध्ये हिंदू समाजाबद्दल एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटके-विमुक्त समाजाची शासकीय कागदपत्रे ही एक मोठी समस्या आहे. ‘राजे उमाजी नाईक शासकीय कागदपत्र वाटप अभियान’ महाराष्ट्र शासनाने राबवून भटक्यांप्रति संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. ‘पद्मश्री’ स्व. प्रभाकरराव मांडे म्हणतात, “हिंदू समाजाच्या मनामध्ये भटके-विमुक्त समाजाप्रति विश्वास व आपलेपणाची भावना निर्माण करणे, हे मुख्य आपले काम आहे, यादृष्टीने प्रयत्नांची आवश्यकता आहे. वरील सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे आपला समरसतायुक्त व्यवहार हा आहे. समरसता किंवा समता ही केवळ भाषणे, लेख, पुस्तक लिहिण्यापुरती गोष्ट नसून ही व्यवहाराची गोष्ट आहे. जेव्हापर्यंत आपल्या व्यवहारामध्ये, कृतीमध्ये समरसता पूर्ण व्यवहार येणार नाही, तेव्हापर्यंत एकरस समाज निर्माण होणार नाही. मात्र, कुंभमेळा असू दे की, अयोध्येतील रामललांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असू दे, समाजात समरस वातावरण निर्माण होत आहे.
 
ही शृंखला इथेच थांबली नाही. मानवत येथे प. पू. गोविंद गिरीजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन केले होते. ‘कथा आयोजन समिती’ने भटके-विमुक्त समाजाचे स्मरण ठेवून नाथ जोगी समाजाचे बाबाराव साळुंखे व गिरी गोसावी नंदूजी गिरी या कुटुंबांना आरतीचा सन्मान दिला. मानवतमधील इतिहासामध्ये प्रथमच भटके- विमुक्त समाज या प्रकारच्या आयोजनामध्ये सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. पुढे जाऊन या परंपरेने भव्य रूप धारण केले. आजसुद्धा पुण्यामध्ये ‘मानाचा गणपती’ म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. यावर्षी प्रथमच भटके-विमुक्त समाजाला या गणपती मंडळाने आरती करण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण दिले. बंजारा समाजाचे संतोष राठोड, शिकलकरी समाजाचे चांद सिंग कल्याणी सहकुटुंब आरतीमध्ये सहभागी झाले होते. ज्या डोंबारी समाजाने इतकी वर्षे अपमान व अन्याय सहन केला, या समाजाला जेव्हा मानाच्या गणपतीची आरती करण्याची संधी मिळाली, तेव्हा समाज प्रमुख विलास जाधव हे आपले आनंदाश्रू रोखू शकले नाही.
 
समाजाला सन्मानित जीवन व्यतीत करता यावे, यासाठी आज सर्व सज्जनशक्ती कार्यरत आहे. मात्र, आजही भटक्या-विमुक्त समाजाच े अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार व शासकीय कागदपत्र न मिळणे इत्यादी प्रकारच्या समस्या कायम आहेत. तसेच या समाजाला सामाजिक सन्मान न मिळणे, हीसुद्धा एक समस्या आहे. भटके-विमुक्त समाजाप्रति समरसतापूर्ण व्यवहार व सामाजिक सन्मान ही काळाची आवश्यकता आहे. संपूर्ण एकरस हिंदू समाज निर्माण करण्यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षांपासून विविध संघटना, संस्थांद्वारा होणारे प्रयत्न, कार्यक्रम बघता, आता खर्‍या अर्थाने भटके-विमुक्त समाजाचा विकासाचा व सामाजिक सन्मानाचा मार्ग मोकळा झाला, असे दिसते. या प्रकारचे प्रयत्न संपूर्ण हिंदू समाजाने स्वीकारावे, हीच रा. स्व. संघाची कल्पना आहे. संपूर्ण भटके-विमुक्त समाजाला हिंदू समाज जेव्हा प्रेमाने, आपुलकीने जवळ घेईल, तेव्हाच भारताचे विश्वगुरू बनण्याचे स्वप्न साकार होईल. ‘सब समाज को लिये साथ आगे हैं बढते जाना...’ या गीताप्रमाणे आपला व्यवहार होणे आवश्यक आहे.
 
उपराष्ट्रपती भवनाचे निमंत्रण
 
भटके-विमुक्त समाजाला सामाजिक सन्मान देण्याचे प्रयत्न सर्वच क्षेत्रांमधून होण्याची आवश्यकता आहे. दिल्ली शहरात अनेक भटक्या-विमुक्त जाती राहतात. हा संपूर्ण समाज अतिशय हलाखीचे जीवन जगतो. लोकसभा, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन हे फक्त या समाजाने टीव्ही किंवा वर्तमानपत्रांमध्ये बघितलेले असतात. दिल्लीमधील कार्यकर्त्यांनी या समाजाला ही भवने दाखविण्याचा मानस व्यक्त केला व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव सहृदय स्वीकारला. एवढेच नाही, तर या समाजाला आपल्या उपराष्ट्रपती भवनामध्ये सहभोजनाचे निमंत्रण दिले. दिल्ली शहरातील विविध भटक्या-विमुक्त जातीमधील ५० समाज नेतृत्व उपस्थित भवन येथे पोहोचले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे स्वागत केले. प्रत्येकाजवळ जाऊन त्यांचा व्यक्तिगत परिचय करून घेतला. त्यांच्या पंक्तीमध्ये बसून सहभोजन घेतले. या प्रकारची चित्र व वागणूक प्रथमच भटके-विमुक्त समाजाला मिळाली होती. सर्वांच्या आनंदाचा ठाव ठिकाणा नव्हता. उपराष्ट्रपती भवनामध्ये या प्रकारचा सन्मान आपल्याला मिळेल, याची कल्पना या समाजाने स्वप्नातसुद्धा केली नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपराष्ट्रपतींनी ज्या आत्मीयतेने, प्रेमाने, आपुलकीने या सर्व समाजघटकांना जवळ घेतले की आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
 
रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही समाजप्रमुखांना स्थान
 
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे रामललाची प्राणप्रतिष्ठा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या शानदार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी उद्योगजगत, सिनेमासृष्टी, क्रीडाजगत, राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना ‘राम मंदिर ट्रस्ट’कडून निमंत्रण देण्यात आले होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातून हजारो साधुसंत सहभागी झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मार्गदर्शन केले होते. आपण ‘राम मंदिर ट्रस्ट’चे अभिनंदन केले पाहिजे, ते यासाठी की प्राचीन काळापासून देव, देश आणि धर्म टिकविण्यासाठी, धर्माचे जागरण व प्रबोधन करण्यासाठी आपले जीवन खर्ची घालणार्‍या भटके-विमुक्त समाजाचे स्मरण ठेवून या शानदार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना विशेष निमंत्रित केले. देशभरामधून भटके-विमुक्त समाजप्रमुख, सामाजिक नेतृत्व त्यांना सन्मानपूर्वक अयोध्या येथे बोलाविले. महाराष्ट्रमधील दहा समाजप्रमुख यांनासुद्धा विशेष निमंत्रणे होती. त्यामध्ये मांग गारुडी समाजाचे दीपकज लोंढे, मसनजोगी समाजाचे प्रमुख लक्ष्मण मुकुटमोरे, मरीआई समाजाचे दगडू निंबाळकर, तुळजापूर येथील वडार समाजातील सामाजिक कार्यकर्ता भारती देवकर, अ‍ॅड. सुरेश गस्ती, नाथजोगी समाजाचे प्रमुख नारायण बाबर, पाथरवड, कैकाडी इत्यादी समाजप्रमुखांना या शानदार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ट्रस्टकडून सहृदय निमंत्रण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या ११ कुटुंबांना मुख्य पूजेचा मान मिळाला, त्यामध्ये तुळजापूर येथील कैकाडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते महादेव राव गायकवाड यांना सपत्नीक पूजेला बसण्याचा बहुमान मिळाला. या शानदार सोहळ्यामध्ये मिळालेली सन्मानपूर्व वागणूक, योजनापूर्वक केलेले स्मरण, मिळालेली आपुलकीची वागणूक या सर्वांमुळे संपूर्ण भटके-विमुक्त समाज आनंदाने भोरविभोर झाला आहे. ‘अवघा हिंदू बंधू बंधू.....’ हा ‘राम मंदिर ट्रस्ट’कडून संपूर्ण हिंदू समाजाला दिलेल्या संदेश होता.
राहुल चव्हाण
Powered By Sangraha 9.0