बारीपाड्याची यशोगाथा...

    25-Jan-2025   
Total Views |
 
Vanvasi Kalyan Ashram
 
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्‍या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण्याचा योग आला होता. त्याचाच घेतलेला हा आढावा...
 
वनवासी कल्याण आश्रमाचा उद्देश म्हणजे गावं सक्षमतेने उभी करणे आणि त्यासाठी तिथेच माणूस घडवणे. जे काही करायचं ते गावानेच करायचं, तरुणांनी त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. हा विचार मनात रुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम गेली कित्येक वर्षे सातत्याने करते आहे. वनवासी कल्याण आश्रम नेमकं काय करतं, हा प्रश्न चैत्रामभाऊंना विचारला असता अगदी थोडक्या शब्दात दिलेलं हे उत्तर.
 
बारीपाडा.. उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील एक वनवासी पाडा. धुळे, नाशिक आणि गुजरातमधील डांग या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला 100 टक्के वनवासी पाडा. कोकणी, मावची/पावरा आणि भिल्ल या वनवासी जमाती या पाड्यात वास्तव्यास आहेत. या पाड्यातील एक सुशिक्षित तरूण- चैत्राम पवार वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आला आणि पाड्याचं सर्वांगीण स्वरूपच बदलायला सुरुवात झाली.
 
बारीपाडा आणि वनवासी कल्याण आश्रम यांचा संपर्क येण्यापूर्वी बारीपाडा अन्य पाड्यांप्रमाणेच समस्यांनी ग्रस्त होतं- नैसर्गिक अनुकूलता असूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्यामुळे शेती नाही, पिण्याचे पाणी नाही, इतर उद्योगधंदे नाहीत, व्यसनाधीनता आणि गावातल्या लोकांची वेगवेगळ्या दिशांना असलेली तोंडे! एकूणच अतिशय निराशाजनक असं वातावरण. या अशा वातावरणात खरे तर कोणताही सुशिक्षित तरुण विचार करेल तो म्हणजे शहरात चांगली नोकरी शोधणे, शहरातच घर बांधणे आणि सुटी असली की चार दिवस गावात येऊन राहणे. अर्थात, तसा मार्ग चैत्राम पवार यांच्याकडे चालूनही आला होता. पण, त्याचवेळी पवार यांचा संपर्क त्याच भागात वैद्यकीय सेवा पुरवणार्‍या डॉ. फाटक यांच्याशी आला.
 
त्याबद्दल सांगताना चैत्राम पवार म्हणाले की, “सुरुवातीला माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम यांच्याशी अजिबात परिचय नव्हता. मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील आहे, समाजसेवा वगैरेंशी कधी संबंध आलेला नव्हता. मात्र, आईवडिलांची आम्ही शिकावं अशी इच्छा होती. मी शिक्षण घेत असताना म्हणजे साधारणपणे 1991-92 च्या सुमारास माझा आमच्या भागात वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ. आनंद फाटक यांच्याशी आला. डॉ. फाटक, रवी सहारे आणि शंकर राजपूत हे वारसा या जवळच्या गावात असणार्‍या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या केंद्रात कार्यरत होते. सुरुवातीला आम्ही वन समिती स्थापन केली, सोबतच ‘शबरी’ या नावाने बचत गटाचीही सुरुवात केली. सोबतच पारंपरिक चुलीला पर्याय म्हणून ‘निर्धूर चूल’ हा एक नवा उपक्रमही राबवण्याचा प्रयत्न केले. तेव्हा आम्हला बर्‍याच प्रमाणात अपयश आले. अर्थात, प्रकल्प यशस्वी करण्यापेक्षाही लोकांपर्यंत पोहोचणे हा आमचा मुख्य उदेश होता. डॉ. फाटक हे आरोग्याचा क्षेत्रात काम करतच होते, त्या जोडीला सामाजिक क्षेत्रातही कामाला सुरुवात व्हावी, असा आमचा उद्देश होता. अशा प्रकारे माझा या संघटनांशी पहिला परिचय झाला आणि मी त्यांच्यातलाच एक भाग कधी बनलो ते समजलेही नाही.”
 
कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी एक प्रेरणा आवश्यक असते, कारण अस कोणी तरी मार्गदर्शक हवा असतो जो आपल्याला हे सर्व करायला भाग पडेल. त्याबद्दल पवार म्हणतात, “वनवासी कल्याण आश्रम, संघ याचं सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे काहीतरी वेगळं करण्याची भावना जागृत करणे आणि राष्ट्रभावना जागृत करणे. कारण, राष्ट्र असेल तरच आपण राहणार. अनेकदा काम करताना नैराश्याचेही प्रसंग येतात, काम करणेच बंद करावे असे वाटते. त्याचवेळी कोणीतरी संघाचा किंवा ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा कार्यकर्ता येतो, पाठीवरून हात फिरवतो आणि पुन्हा कामाची उभारी मिळते. आम्हाला दिशा दाखवण्याच महत्त्वाचे कार्य आज ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने केले आहे.”
 
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, वनवासी समाजासाठी आज खोलात जाऊन काम करण्याची नितांत गरज आहे. ‘वनवासी कल्याण आश्रम’ आज बर्‍याच प्रमाणात अशा प्रकारचे काम करताना दिसतेे. काम करताना विश्वास निर्माण होणेही गरजेचे असते. कारण, विश्वास निर्माण झाल्याशिवाय काम यशस्वी होऊच शकत नाही.
 
आज बारीपाड्यात जल, जंगल, जन, जमीन आणि जनावर या पाच मुद्द्यांना समोर ठेवून काम सुरु आहे. कारण, वनवासींचे जीवन याच बाबींशी निगडित आहे.
 
‘जंगल व्यवस्थापन’ हा विषय बारीपाड्याने अतिशय महत्त्वाचा मानला आहे. जंगलामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा मोठ्या प्रमाणावर होतो. जंगल असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजल पातळी वाढून त्याचा शेतीसाठी फायदा होतो. आज बारीपाड्यात 1100 एकराच्या परिसरात सुमारे 70 टक्के सागाचे जंगल आहे. त्याबद्दल चैत्राम पवार म्हणतात की, “हे सागाचे जंगल म्हणजे आमच्या गावाचा ‘बँक बॅलन्स’ आहे. जर या सागाच्या जंगलाची किंमत काढली, तर ती आज काही कोटींच्या घरात जाईल. शिवाय गावाच्या वरच्या भागात असल्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी जमिनीत मुरते आणि गावाला पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ शकतो. त्यासाठी लोकसहभागातून बंधारेही बांधले आहेत. शिवाय या सर्व कामात शासनानेदेखील चांगली मदत केली.”
 
तसे पाहिल्यास साग हे बाजारात उत्तम किंमत असणारे झाड. अनेकदा सागाच्या झाडांची अवैध तोडणी, चोरी अशा अनेक घटना घडल्याचे आपण ऐकतो. बारीपाड्यात मात्र 1100 एकरात साग असूनही तसे काही घडत नसल्याचे चैत्राम पवार यांनी सांगितले. ते म्हणतात, “आम्ही यासाठी कडक असे नियम केले. मुख्य झाड तोडतांना कोणी सापडल्यास 1,051 रुपयांचा दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेल्यास 700 रुपयांचा दंड आणि चोरी पकडून देणार्‍यास बक्षीस अशी व्यवस्था आम्ही केली आहे. जंगलाच्या रक्षणासाठी शासनाने रखवालदाराची नेमणूक केलेली असली तरी तो कधीही वेळेवर येत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक रखवालदर ठेवला आणि त्याला आम्ही वर्षाला साडेसात क्विंटल धान्य देतो. त्या बदल्यात तो जंगलावर लक्ष ठेवण्याच काम करतो. रखवालदर दरवर्षी बदलतो, जेणेकरून त्यानेही काही गैरप्रकार करू नयेत. गावाची जळणाची गरज भागवण्यासाठी वर्षातून 20 मोळ्या आणायचा नियम आम्ही सर्वांनी मिळून ठरवला. तेव्हा वर्षाला वीस मोळ्या पुरणार नाहीत, असे काही महिलांचे मत पडले. मग आम्ही काही घरांना सूर्यचुलीची ओळख करून दिली. आज सर्वच कुटुंब त्याचा वापर करत नसले तरी त्याबद्दल जागृती निश्चितच झाली आहे. आमचे हे प्रयत्न बघून शासनाने आम्हाला स्वतःहून एलपीजी गॅसचे कनेक्शन दिले. आज गावात अनेक कुटुंबांकडे गॅस आहे. जनतेने सहभाग दाखवला तर शासनही त्याची दाखल घेतेच.”
 
कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग. आज बारीपाड्यात जे काही घडतंय ते लोकसहभागातूनच! मात्र, चार लोकांना एकत्र आणून काही काम करणे हे फार अवघड असते. चैत्राम पवार यांनाही तो अनुभव आला. त्याबद्दल ते सांगतात, “एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती म्हणजे वनवासी माणसाला एकत्र आणणे ही फार कठीण गोष्ट आहे. एकदा तो संघटित झाला तर सहजासहजी विस्कळीत होत नाही. मात्र, विस्कळीत झाला तर पुन्हा एकत्र आणणे महाकठीण! त्यामुळे आम्हाला अगदी काळजीपूर्वक पावले टाकावी लागली. सर्वांना एकत्र आणण्यातच आमची किमान तीन ते चार वर्षे गेली.”
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आज वनवासी भागासाठी सरकारी पातळीवरून अनेक योजना आखल्या जात आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी कदाचित सरकारी खाक्याने होत असावी, म्हणून वनवासी त्यात जास्त सहभाग दाखवत नाही. आदिवासींना विश्वासाने एकत्र आणणे आणि त्यांची एकजूट टिकवून ठेवणे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
 
एकूणच विकास साधत असताना त्यात महिलांचा असणारा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बारीपाड्यात सुरुवातीला महिलांचा काहीही सहभाग नव्हता. नंतर अवघ्या चार महिलांनी थोडी रुची दाखवल्यावर त्यांना वनव्यवस्थापनात सहभागी करून घेतले. ‘बचत गट’ ही संकल्पनाही फारशी प्रचारात आलेली नसताना 1992 मध्ये ‘शबरी महिला मंडळ’ या नावाने बचत गटाची सुरुवात केली, अर्थात त्यात बरेच यशापयशही आले. मात्र, तसे असतानाही हा प्रकल्प यशस्वी झाला. आज पाच बचत गट अगदी यशस्वीपणे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, पाचपैकी एकही गटाने अद्यापपर्यंत बँकेचे कर्ज आणि शासकीय योजना घेतलेली नाही. शिवाय बारीपाड्यातील बचत गट हे जरा वेगळ्या पद्धतीने चालवले जातात. वस्तूंचे उत्पादन करून त्यांच्या विक्रीवर भर देण्यापेक्षा पैसा साठवून तोच शेती किंवा अन्य बाबींसाठी वापरणे हा प्रमुख उद्देश आहे. आता बारीपाड्यात उत्पादित होणारा तांदूळ बचतगटांच्या माध्यमातून शहरी भागात विक्रीस आणण्याचा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
 
‘जलसंधारण’ हा देखील ग्रामविकासातील एक महत्त्वाचा मुद्दा. बारीपाडा आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. एकेकाळी कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आज आसपासच्या गावांना पाणी पुरवतो आहे. त्याबद्दल सांगताना चैत्राम पवार म्हणतात की, “श्रमदानातून आम्ही 482 बंधारे बांधले. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि वापरासाठी असे पाण्याचे सुयोग्य नियोजन केले. त्याचा परिणाम म्हणजे बारीपाड्याची भूजल पातळी तब्बल 20 फुटाने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. सुमारे 250 एकराचे क्षेत्र आज दुबार पेरणीखाली आणण्यात यश मिळाले आहे. तांदळसोबतच आज स्ट्रॅाबेरीचेही उत्पादन बारीपाड्यात होते आहे.”
 
शेतीमध्येही चैत्राम पवार यांनी अनेक नवनवे प्रयोग केले. जे पीक घ्यायचे आहे, त्याबद्दलच्या तज्ज्ञाला बारीपाड्यात बोलवून मार्गदर्शन घ्यायचे, अशी पद्धत त्यांनी अवलंबवली. त्यामुळे शेतकर्‍यांना नव्या तंत्रांचे मार्गदर्शन मिळू लागले. त्यामुळे शेतीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. ऊस, गहू आणि हरभरा यांचे उत्पादन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले. सोबतच मधुमक्षिका पालनही सुरु झाले. परिणामी, वनवासी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करायला लागला आहे.
 
जंगलाचे व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, सुधारणारी आर्थिक स्थिती याचा थेट परिणाम बारीपाड्याच्या आरोग्यावरही झालेला दिसतो. उपासमार पूर्णपणे थांबली आहे. कुपोषणाची समस्या सोडवण्यात बारीपाड्याने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.
 
शिक्षण हा विकासाच्या या प्रक्रियेत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा. अन्य वनवासी पाड्यांप्रमाणेच या ठिकाणीही शिक्षणाबद्दल प्रचंड उदासीनता होती- सरकारमध्ये आणि गावातल्या लोकांमध्येही. विद्यार्थी असले तर शिक्षक नाही आणि शिक्षक असले तर विद्यार्थी असतीलच याचीही खात्री नाही. अशा परिस्थितीत चैत्राम यांनी एक अभिनव तोडगा काढला. तो म्हणजे दंड करण्याचा. परवानगी न घेता शाळेत अनुपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक रुपया, तर शिक्षकांना 51 रुपये असा दंड ठरवण्यात आला. ही कल्पना फारच यशस्वी झाली. मुले शाळेत जायला लागली. परिणामी, प्राथमिक शिक्षणात बारीपाडा 100 टक्के यशस्वी झाला आहे.
 
व्यसनमुक्तीच्या बाबतीत मात्र बारीपाड्यात अजून काम होणे बाकी आहे. अर्थात, त्याबद्दल विचारले असता चैत्राम म्हणाले की, “प्रामुख्याने मोहाची दारू वनवासी लोकं सेवन करताना दिसतात. अर्थात, त्याला ‘व्यसन’ म्हणायचे की नाही, याबद्दल मी तरी साशंक आहे. कारण, मोहाची दारू गळणे आणि तिचे सेवन करणे हे वनवासींच्या सवयीचा एक भाग आहे. आज आजूबाजूच्या जंगलात सुमारे 4,435 मोहाची झाडे आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंब मोहाची फुलं साठवून ठेवतात आणि गरज पडेल तेव्हा त्याची दारू गाळतात. मात्र, त्याचे सेवन करून कोणी शेतजमीन विकली, घरदार विकले, कुटुंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले, असे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे रूढअर्थाने याला ‘व्यसन’ म्हणायचे की नाही हा प्रश्न आहे. तसे पाहिल्यास दिवसातून 20 कप चहा पिणे हे सुद्धा एक प्रकारचे व्यसनच आहे. लोकांची रोजची दिनचर्या पाहता प्रचंड कष्ट आणि त्यामुळे थोडा आराम मिळावा म्हणून स्वतःच दारू गाळून तिचे सेवन करणे आणि शांत झोपणे याला व्यसन कसे म्हणायचे?”
 
शौचालयांच्या बाबतीतही बारीपाड्यात परिवर्तन दिसून येते. त्याबद्दल सांगताना पवार म्हणाले की, “सुरुवातीला 66 शोषखड्ड्यांच्या शौचालयाची निर्मिती केली होती. मात्र, गावातल्या लोकांना शौचास जाण्याची ही पद्धत काही पचनी पडली नाही. परिणामी आम्ही या विषयात अपयशी ठरलो. आज शासनाच्या योजनेतून स्वच्छतागृहे बांधली आहेत. सध्या सर्व स्वच्छतागृहांसाठी पाण्याची व्यवस्था देणगीतून आम्ही करत आहोत. त्यामुळे एकदा 24 तास पाणी उपलब्ध झाले की आपोआपच लोक त्याचा वापर करायला लागतील.”
 
गावातील सामाजिक जीवनाबद्दल बोलताना चैत्राम म्हणतात, “शहरात असणारे अनेक महत्त्वाचेे प्रश्न आमच्या भागात अस्तित्वातही नाही. आज शहरी भागात ‘बेटी बचाओ’ सारखे अभियान राबवावे लागते, आमच्या गावात या प्रकाराला सर्व हसतात. आज बारीपाड्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. गर्भलिंगचाचणीसारखे प्रकार अजिबात घडत नाहीत. आम्हाला ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या सहकार्याने सुरुवातीपासूनच डॉक्टर मिळाल्याने गावातील लोक आरोग्याबाबत जागरूक आहे. प्रत्येक घरात मच्छरदाणी वापरली जाते. पाणी शुद्ध होण्यासाठी जीवनड्रोप वापरले जाते. बचत गटांच्या माध्यमातून लहान मुलांचे आरोग्य म्हणजे त्याची स्वच्छता, नखे कापणे, आंघोळ घालणे अशा अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये जागरूकता निर्माण केली. बारीपाड्यातील 70 टक्के पुरुषांची नसबंदी झाली आहे. आरोग्याच्या क्षेत्रात आज मोठे यश मिळाले असल्याचे आपण म्हणू शकतो. विविध पुरस्कारांतून मिळालेल्या रकमेतून आज दोन कम्युनिटी हॉल आणि बाहेरगावच्या पाहुण्यांसाठी राहण्यासाठी खोल्या बांधल्या आहेत.”
 
बारीपाड्यात ‘वनभाजी महोत्सव’ हा एक आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. जंगलात मिळणार्‍या अनेक भाज्या आहेत की ज्यांच्याशी शहरी लोकांचा परिचयही नसतो. अशा महोत्सवाच्या माध्यमातून औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या समोर मांडल्या जातात. सोबतच भाजी बनवण्याची पद्धत, त्यासाठी वापरलेले घटक आणि भाजीचे औषधी गुणधर्म पुढे आणले जाऊन त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.
 
बारीपाड्याची दखल आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. चैत्राम पवार यांना इटली मधील ’खपींशीपरींळेपरश्र र्ऋीपव षेी असींळर्लीर्श्रीीींरश्र ऊर्शींशश्रेिाशपीं’ या संस्थेने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्याशिवाय राज्य सरकारचे 25 लाख रुपयांचे अनुदान, ‘कै. वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार’, ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’, ‘वनवासी सेवा पुरस्कार’, ‘संत तुकाराम वनग्राम पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अनेक अभ्यासक बारीपाड्याचा अभ्यास करण्यासाठी येत आहेत. आयआयटी पवई, दिल्ली, मद्रास आणि खरगपूर येथील विद्यार्थी खास अभ्यासासाठी येत आहेत. कॅनडा, अमेरिका, डेन्मार्क, जर्मनी यासह नऊ देशातील लोक बारीपाड्याला भेट देऊन गेले आहेत. हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त ‘वनवासी कल्याण आश्रमा’लाच आहे. ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे.
 
आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासींना स्वतःच्या पायावर उभे करणे. शासनाशी कसा संपर्क साधावा, हे सर्वांत महत्त्वाचे काम ‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि संघाने शिकवले. एकेकाळी सरकारी कामांना घाबरणारा वनवासी आत्मविश्वासाने सर्व गोष्टी करतो आहे. अन्य संघटनांशी जोडण्याचे कामही ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने केले आहे. सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे, ‘योजनांच्या मागे जायचे नाही तर योजना स्वतःहून आपल्याकडे आली पाहिजे’ हे सूत्र ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे आहे. त्यासाठी आपसूकच गावातील लोक एकत्र येतात आणि नवीन काहीतरी करायला सुरुवात करतात. त्याची दखल सरकारदरबारी लगेच घेतली जाते.
 
या सर्व यशाचे प्रमुख सुत्रधार असलेले चैत्राम पवार म्हणजे अगदी निगर्वी आणि पाय जमिनीवर असलेले व्यक्तिमत्व आहे. चैत्राम पवार म्हणतात, “संघ आणि ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची मुख्य शिकवण म्हणजे ‘पैसा दुय्यम आहे, माणूस महत्त्वाचा आहे.’ आज हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतो आहोत. या सर्व यशाचे श्रेय ते गावातील लोकांची साथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘वनवासी कल्याण आश्रम’ यांना देऊन मोकळे होतात. ‘वनवासी कल्याण आश्रम’ ही संघटना लोकांमध्ये जाऊन त्यांच्यातूनच नेतृत्व उभे करण्यावर भर देताना दिसते. परिणामी, कायमस्वरूपाचे काम उभे राहते आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे होणारा विकास हा शाश्वत स्वरूपाचा होतो आहे.” चैत्राम पवार यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत परिवारा’तर्फे मन:पूर्वक शुभेच्छा!