मुंबई : आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केला आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणूकीचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणूकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. २०२१ साली महाराष्ट्र गुंतवणूकीत मागे गेला होता. २०१४ ते २०१९ आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. त्यानंतर गुजरात आणि कर्नाटक पुढे गेले होते. ज्यावेळी आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं. जे लोकं महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चालले आहेत, असा नरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न करत होते त्यांना आता या आकड्याने पुर्णपणे उत्तर मिळाले आहे. सगळ्या मोठ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "महाविकास आघाडी आणि जरांगे दोघेही केवळ एकालाच..."; फडणवीस थेटच बोलले
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीच्या आकडेवारीवर टीका केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "वडेट्टीवार आणि काँग्रेसला गुजरातचंच गुणगान गाण्यात अधिक रस आहे. आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? त्यामुळे सरकार कुणाचंही असो, पण आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा त्यांनी आनंद मान्य केला पाहिजे," असेही ते म्हणाले.