अष्टविनायकांपैकी चौथा गणपती म्हणजे पुण्यातील ‘रांजनगावचा गणपती’. या गणपतीला ‘महागणपती’ म्हणून ओळखले जाते. हा महागणपती नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी देशभरातून अनेक भाविक येतात.
मंदिराचे वैशिष्ट्य :
या मंदिराची रचना वैशिष्टयपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. दक्षिणायण आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना केलेली आहे. या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या आहेत. मुळ मूर्ती जी ‘महोत्कट’ म्हणून ओळखले जाते परंतु ती मंदिराच्या तळघरात ठेवलेली आहे. मंदिरात पूजेसाठी जी मूर्ती ठेवलेली आहे ती डाव्या सोंडेची आणि आसन घातलेली असून तिचे कपाळ रुंद आहे. शेंदूर लावलेली ही मूर्ती सूर्याची किरणे तिच्यावर पडली की अधिकच आकर्षक भासतात. या मूर्तीच्या शेजारी रिद्धी-सिद्धीची मूर्ती ठेवलेली आहे.
मंदिराचा इतिहास:
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला आहे. शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मंदिरातील मूळ मूर्तीसाठी तळघर बांधले.
मंदिराशी संबंधित पौराणिक कथा:
भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने गणपतीची आराधना करून मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी भगवान शंकरांकडे वळवली. महादेवांकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन महादेव त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व महादेव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. महादेवांनी गणरायाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. महादेवांनी गणेशाचे जेथे स्मरण केले तिथेच गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
कसे पोहोचायचे :
पुणे स्टेशन आणि शिवाजी नगर येथून मंदिरात पोहोचण्यासाठी नियमित बस सेवा आहेत. पुण्यापासून रांजणगावचे अंतर ५१.४ किमी आहे .रांजणगाव गणपतीसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन उरुळी आहे, जे रांजणगाव पासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे.