सध्या देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष ऑलिम्पिकमधील क्रीडापटूंच्या कामगिरीकडे लागले आहे. पण, क्रीडा क्षेत्राची व्याप्ती केवळ विविध खेळांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांपुरतीच मर्यादित नाही, तर यामागेही मोठे अर्थकारण सामावलेले आहे. तेव्हा, ऑलिम्पिकच्या या क्रीडापर्वाच्यानिमित्ताने क्रीडासाहित्य आणि एकूणच क्रीडाउद्योगाचा आढावा घेणारा हा लेख...
क्रीडा क्षेत्र हे आता केवळ व्यावसायिकच राहिले नसून, त्यातून क्रीडासाहित्य निर्मिती व विक्री, खेळांच्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अशा कार्यक्रमांचे आयोजकच नव्हे, तर क्रीडाव्यवस्थापनापासून प्रत्यक्ष खेळांडूपर्यंत अनेकांना विविध प्रकारचे रोजगार वा व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
यासंदर्भात भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धांचे उदाहरण प्रामुख्याने देता येईल. भारतीय आयपीएल व त्याची लोकप्रियता, रंजकता व विविधता याआधारे अक्षरशः लाखोजणांना व्यवसायसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधी प्रामुख्याने जाहिराती प्रचार-प्रसार तिकीटविक्री, आहारव्यवस्था, वाहतूक व पर्यटन व्यवसाय, क्रीडाव्यवस्थापन, मार्गदर्शन इ. विविध क्षेत्रांत उपलब्ध होत असून, त्याचा फायदा मोठ्या संख्येत होत आहे. याचा अधिकांश लाभ युवावर्गाला होत आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय.
सद्यस्थितीत भारतात प्रामुख्याने दहा मुख्य स्वरूपाच्या आयपीएल क्रीडास्पर्धा होत आहेत. यांमध्ये मुख्यतः क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी या लोकप्रिय खेळांचा समावेश आहे. या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजनांच्या जोडीलाच आता तर ‘आंध्र प्रीमियर लीग’पासून ‘झी-महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा’पर्यंतच्या राज्य वा प्रादेशिक स्तरावर आयोजित केल्या जाणार्या क्रीडास्पर्धांमुळे, त्यांना मोठ्या रकमांसह प्रायोजक मिळू लागले आहेत. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल कायमस्वरूपी होत आहे. त्यातून निर्माण झालेल्या मोठ्या लाभाकडे पाहता, या स्पर्धा आयोजनात आता कॉर्पोरेट कंपन्या प्रामुख्याने उतरल्या आहेत. त्यामुळे खेळांपुरत्या मर्यादित असणार्या स्पर्धांमुळे आर्थिक व्यवहार, व्यवसाय व फायद्यांवर अधिक जोर दिला जात आहे.
जाणकारांच्या मते, भारताचे भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या त्यातील युवकांचे प्रमाण व सद्यस्थिती पाहता, भारतात मोठ्या प्रमाणात खेळ आणि क्रीडा आयोजनासाठी मोठा वाव आहे. भारताच्या विभिन्न प्रातांचे स्वतःचे असे क्रीडाप्रकाराचे वैशिष्ट्य असून, त्याचा फायदा क्रीडा आयोजनामुळे होणार आहे. यासंदर्भात केरळमधील सहा खेळाडूंसह खेळल्या जाणार्या ‘सेव्हंन्स फुटबॉल’पासून काश्मीरमधील लाकडी काठी व लाकडी चेंडूंसह खेळला जाणारा ‘खोदार खान’पासून नागालॅण्डच्या ‘बांबू फेक’ खेळापर्यंतचे उदाहरण वानगीदाखल दिले जात आहे. यातून भारतातील विविध खेळांचे वेगळेपण व त्यात विभिन्न राज्य व भौगोलिक क्षेत्रानुसार या खेळांना मिळणारा प्रतिसाद व लोकमान्यता स्पष्ट होते. या क्रीडाप्रकारांचे एक समान सूत्र म्हणजे, त्यांच्यामुळे क्रीडाविषयक संधी-रोजगार व स्वयंरोजगार इ. संधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात सातत्याने उपलब्ध होतात.
सरकारी स्तरावर जारी करण्यात आलेल्या क्रीडाविषयक धोरणानुसार देशांतर्गत क्रीडाकौशल्य व विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविणार्यांना प्रशिक्षणापासून मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यापर्यंत भर देण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 45 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 500 कोटींची तरतूद क्रीडाप्रशिक्षक व प्रशिक्षणासाठी केली होती. सरकारच्या याच धोरणानुसार निश्चित व कालबद्ध स्वरूपात क्रीडाप्रशिक्षणातून क्रीडाकौशल्यांसह अधिकाधिक संख्येत युवकांना अव्वल बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून भारतीय युवकांना ऑलिम्पिक व इतर जागतिक स्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडास्पर्धांमध्ये आवर्जून सामावून घेतले जाते.
क्रीडाक्षेत्रात आणि या क्षेत्रासाठी सरकारने व सरकारी स्तरावर काय करावे, वा करता येण्यासारखे आहे, हा मुद्दा विविध संदर्भात नेहमीच चर्चेत असतो. सरकारतर्फे क्रीडापटूंना शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, अर्थसाहाय्य इ. केले जाते. याशिवाय, शासनाच्या विविध योजनादेखील राबविल्या जातात. मात्र, सरकारने राज्य वा केंद्र स्तरावर आपापल्या वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद केल्यास खेळ आणि क्रीडापटूंना कायमस्वरूपी प्रोत्साहन मिळू शकेल. यातूनच काही प्रयत्न-पुढाकार विविध राज्यस्तरांवर घेतले जाऊ शकतात. महाराष्ट्र वा हरियाणा यांसारख्या राज्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देणे फायदेशीर ठरू शकते वा वन आणि वनवासीबहुल राज्यांनी नेमबाजी वा मल्लखांब यांसारख्या खेळाडू आणि क्रीडाप्रकारांना योजनापूर्वक प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिल्यास, त्याचे फायदे राज्यापुरतेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकतात.
खेळ आणि क्रीडाप्रकारांचा वाढता व्याप आणि प्रसार यांमुळे विविध प्रकारच्या खेळासाठी आवश्यक क्रीडासाधने आणि सामग्रीचे उत्पादन व विक्री हे नोकरी-व्यवसायाचे एक नवे दालन विकसित स्वरूपात उपलब्ध झाले आहे. विविध क्रीडावस्तू व संबंधित सामान यांचे उत्पादन व विक्री आता अनिवार्य ठरली आहे. त्यातही या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, एकीकडे वाढत्या क्रीडाप्रसाराबरोबरच त्यांना लागणार्या अधिकांश वस्तू एकवेळ वापरणे वा वारंवार बदलणे अशा प्रकारच्या असतात. क्रिकेटच्या बॉल-बॅटपासून बॅडमिंटन, फुटबॉल व थेट कुस्तीच्या गादीपर्यंतच्या वस्तूंचा यात समावेश करता येऊ शकतो.
खेळ आणि क्रीडाप्रकारांसाठी कायमस्वरूपी आवश्यक अशा वस्तू आणि उपकरणे-उत्पादने यांच्या उत्पादन-संशोधन, विक्री व्यवस्थापन व व्यवसाय यासंदर्भातसुद्धा भारताने आपली छाप जागतिक स्तरावर प्रस्थापित केली आहे. यामध्ये देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावर व्यवसायवाढ झालेली दिसून येते. भारत आणि भारतीय यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, सद्यस्थितीत आपल्या देशातील युवावर्गातील लोकसंख्या लक्षणीय स्वरूपात तर आहेच, याशिवाय त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय, खेळ, मनोरंजन यांसारख्या युवकांच्याच नव्हे, तर जनसामान्यांच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाच्या व प्राधान्याच्या क्षेत्रांत सहभागी होणारे, विविध क्रीडाप्रकार आणि आयोजनांमध्ये रुची घेणारे व प्रसंगी त्यासाठी खर्च करणारे या सार्यांमध्ये होणारी वाढ क्रीडाक्षेत्रासाठी सर्वोपरी पूरक ठरली आहे.
भारतीय क्रीडाउद्योगाच्या संदर्भात नव्यानेच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, 2023 या आर्थिक वर्षाअखेर भारतातील क्रीडा क्षेत्र आणि क्रीडासंबंधी उद्योगाची एकत्रित उलाढाल 5.1 अब्ज डॉलर्स होती. याच अंदाजानुसार, 2032 सालापर्यंत भारतातील क्रीडाउद्योगांची अधिक वाढ होऊन त्याची एकत्रित उलाढाल दहा अब्ज डॉलर्स होणे सहज शक्य आहे. या ढोबळ आकडेवारीवरून भारतातील क्रीडाक्षेत्राची वाढ व त्यातून होणार्या वाढत्या आर्थिक उलाढालीची प्रामुख्याने कल्पना येते. या आर्थिक उलाढालीतून वाढता व्यवसाय व क्रीडाविषयक विविध संधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात निश्चितपणे उपलब्ध होणार आहेत.
परंपरागतरित्या सांगायचे झाल्यास, भारतातील क्रीडा आणि त्यासंबंधी साहित्यनिर्मिती उद्योगाची सुरुवात भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या व पंजाबमध्ये जालंधर व उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबांनी केली. आपली मेहनत व कौशल्यांच्या आधारे देश-विदेशात नाव व लौकिक कमावले. आज 65 वर्षांनंतरसुद्धा या कारागीर व लघु-उद्योजकांना कोणतीही औपचारिक साथ वा साहाय्य न मिळतादेखील त्यांनी परिश्रमपूर्वक व खर्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ स्वरूपात आपले काम सुरूच ठेवले आहे.
अर्थात, गेल्या दहा वर्षांत भारतातील क्रीडासाहित्य निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. गेल्या वर्षीपासून मेरठ व जालंधर या दोन्ही ठिकाणी क्रीडासाहित्य निर्मिती व उत्पादन उद्योगातून 2,100 कोटी रुपयांच्या क्रीडासामग्रीची निर्यात करून जगात आपले नाव आणि कर्तृत्व प्रस्थापित केले आहे.
आता तर क्रीडाक्षेत्राचा सर्वांगीण व सार्वत्रिक विचार करून त्याला अधिक व्यापक व व्यावसायिकदृष्ट्या देश-विदेश पातळीवर यशस्वी करण्यासाठी क्रीडाव्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ यासारख्या प्रतिष्ठित संस्थांनी या कामी पुढकार घेतला असून, त्यामुळे भारतातील क्रीडा करिअर क्षेत्राला व्यापक दिशा लाभली आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन-सल्लागार आहेत.)
9822847886