मुंबई : वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. याआधी मिहीर शाहाचे वडील आणि शिवसेनेचे नेते राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. आता मिहीर शाहसह १२ जणांना शाहापूरमधून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
रविवारी सकाळी २४ वर्षीय आरोपी मिहीर शाह याने वरळीतील एका मॉलजवळ त्याच्या बीएमडब्ल्यू कारने एका स्कूटरला धडक दिली. एका महिलेला त्याने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यात त्या महिलेचाचा मृत्यू झाला तर तिचे पती जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आरोपी मिहीर शाह फरार झाला होता. तेव्हापासूनच पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, अपघातानंतर मिहीर शाहाने आपली कार वांद्रे येथे सोडली होती. त्याने आपले वडील राजेश शाहांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. यावर त्याच्या वडीलांनी त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला आणि ड्रायव्हिंग सीटवर चालकाला बसण्यास सांगितले. हा अपघात ड्रायव्हरने केला असे आपण सांगू, असे आरोपीच्या वडीलांनी त्याला सांगितले.
त्यानंतर आरोपी मिहीर त्याची आई आणि बहिणीसह फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधावर होते. दरम्यान, आता त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिहीरच्या आई आणि बहिणीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.