मुंबई : बृहन्मुंबईतील मंत्रालयासह राज्य शासकीय कार्यालयांमध्ये जे अधिकारी व कर्मचारी रेल्वेने दूरचा प्रवास करतात, त्यांना अतिवृष्टीमुळे आज (दि. ८ जुलै) दुपारी ३.०० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार ही परवानगी देण्यात आली.
हे वाचलंत का? - धक्कादायक! लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय गमावले
मुंबईत रविवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकजण सभागृहातील कामकाजाकरितासुद्धा उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. ही बाब विचारात घेऊन मंत्रालयातील व बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत कार्यालये व अधिकारी/कर्मचारी, स्वतःच्या वाहनाने प्रवास करणारे अधिकारी/कर्मचारी आणि विधिमंडळ कामकाजाशी संबंधीत अधिकारी/कर्मचारी वगळता) जे अधिकारी/कर्मचारी रेल्वेने दूरचा प्रवास करतात अशा सर्वांना आज सोमवार, दिनांक ०८ जुलै, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता मा. मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली.