मंगल प्रभात लोढांची तळमळ कामातून दिसते

08 Jul 2024 18:58:43

mangal lodha
 
मुंबई : "कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली, याबद्दल मी त्यांचे प्रथमतः अभिनंदन करतो. राज्यामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सुरू असलेली त्यांची तळमळ ही कामातून दिसून येते", असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. ८ जुलै रोजी काढले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा कार्यभार स्वीकारून दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षांत राबवण्यात आलेले विविध उपक्रम आणि योजनांच्या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री लोढा यांच्या कार्यशैलीचे तोंड भरून कौतुक केले.
 
मुख्यमंत्री म्हणाले, की देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यता आहे. कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासात मोठे योगदान देत असते. सर्वांना व्यावहारिक आणि दर्जेदार शिक्षण देणे, देशातील उद्योग तसेच आवश्यक त्या क्षेत्राला अनुसरून गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रणाली विकसित करणे, विकसित माहिती तंत्रज्ञानासह ज्ञान अद्ययावत करणे, काळाच्या मागणीनुसार शिक्षण धोरण तयार करणे या उपायांचा अवलंब करून देश विकासासाठी नैसर्गिक साधनांचा आणि संसाधनांचा वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करू शकतो.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या कार्यकालमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल मी त्यांचे प्रथमतः अभिनंदन करतो. राज्यामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या असलेली तळमळ ही कामातून दिसून येते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊन राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
कौशल्य युक्त, बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील - लोढा
 
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागाची जबाबदारीला स्वीकारून मला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून, कौशल्य युक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे.
 
विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर,आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंमरोजगार नोंदणी,प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही लोढा यांनी सांगितले.
  
Powered By Sangraha 9.0