मुंबई : मुंबईची आजची परिस्थिती आणि मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाला उबाठा गटाची २५ वर्षे जबाबदार आहेत, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले असून वाहतूक सुविधा ठप्प झाली आहे.
आशिष शेलार म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही नाले सफाईच्या कामांची पाहणी केली. त्याचवेळी आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की, कंत्राटदारांनी दिलेले नालेसफाईचे आकडे फसवे आहेत. त्यात काहीही सत्यता नाही. छोटे नाले आणि मोठ्या नाल्यांतून काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे. त्याची कुठलीही पडताळणी नाही."
हे वाचलंत का? - पालिका व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर!
"मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. कंत्राटदारांनी चोरी केली आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षात उबाठा गटाने मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे," असेही ते म्हणाले.