पंढरपूरातील विठुरायाचे २४ तास दर्शन

08 Jul 2024 11:22:46
 
vithumauli
 
पंढरपूर : “आषाढी यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना 24 तास दर्शन घेता येणार आहे. दि. 7 जुलै ते दि. 26 जुलैपर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन 24 तास चालू राहाणार आहे. देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला आहे,” अशी माहिती ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चे सहाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशी दि. 17 जुलै रोजी आहे.
 
वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, म्हणून देव 24 तास उभा असतो. या कालवधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्याआधी विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या-गिरद्यादेखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या.
 
देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. रविवारपासून देवाचे सर्व राजोपचार बंद केले आहेत. विठोबा आणि रुक्मिणीमातेच्या पाठी मऊ कापसाचा लोड ठेवण्यात आला आहे, जेणेकरून देवाला शीणवटा येणार नाही, अशी भावना वारकरी संप्रदायाची आहे. देवाचे दर्शन 24 तास खुले केल्याने आता रोज पायावर 50 हजार, तर मुखदर्शनातून 50 ते 60 हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे.
असे असतील विठुरायाचे नित्यक्रम
“पहाटे 4.30 वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त एक तास दर्शन बंद असेल. यानंतर दुपारी महानैवेद्याला 15 मिनिटे आणि रात्री 9 वाजता लिंबूपाणी देण्यासाठी 15 मिनिटे दर्शन थांबविण्यात येईल,” अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. याशिवाय, संपूर्ण दिवस-रात्र दर्शन घेता येणार आहे.
 सामान्य भाविकांना दिलासा
आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत असतानादेखील व्हीआयपी दर्शन सुरू होते. मात्र, भाविकांचे हाल होत असल्याने मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय, दर्शनाची रांगदेखील लवकर पुढे सरकण्यास मदत होत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0