हाथरस दुर्घटनेनंतर सांत्वन करताना राहुल गांधींचे नक्राश्रू

06 Jul 2024 15:38:54

Rahul gandhi
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मंगळवार, दि. 2 जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी घेतली. यावेळी कुटुंबीयांप्रती सांत्वन करताना नक्राश्रू दाखवत “अधिकाधिक मदत उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना करावी,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. पण, “ही राजकारण करण्याची ही वेळ नसून, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे,” अशी टीका भाजपचे राज्यसभेचे खा. सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.
 
भोलेबाबाच्या एकदिवसीय सत्संगामध्ये चेंगराचेंगरीत 121 लोकांचा बळी गेला. यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाने त्यांचा अहवाल शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला असून उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबांना मदत जाहीर केली आहे. यासंबंधी अशीही माहिती समोर आली आहे की, भोलेबाबा हा सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा निकटवर्तीय असून या बाबाच्या सत्संगाच्या आयोजन समितीमध्ये यादव समाजाचे वर्चस्व असल्याचेही समजते.
 
या संपूर्ण प्रकरणावर अखिलेश यादव यांच्या पक्षाची प्रतिक्रियादेखील विशेष लक्षवेधक ठरली. समाजवादी पक्षाचे खा. राम गोपाल वर्मा यांनी “हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण हा अपघात असून, असे अपघात होतच असतात,” असे असंवेदनशील विधान केले आहे. मात्र, एकीकडे योगी सरकारला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचा सल्ला देणार्‍या राहुल गांधींनी त्यांच्याच मित्रपक्षाच्या खासदाराच्या या विधानाचा निषेधदेखील नोंदवलेला नाही.
 
2020 सालीदेखील हाथरसमध्ये 19 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही रवाना झाले होते. काँग्रेसकडून त्यावेळीही जनमत क्षुब्ध करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच, भाजपशासित राज्यांमध्ये दुर्घटना घडल्यास राहुल गांधी अशा ठिकाणी तत्परतेने दौरे करतात. पण, तशाच प्रकारची दुर्घटना काँग्रेसशासित अथवा मित्रपक्षांचे सरकार असलेल्या राज्यात घडल्यावर राहुल गांधी तिथे फिरकत नसल्याची टीकाही विरोधकांना केली आहे.
राहुल गांधींचे दुर्घटनांनंतरचे निवडक दौरे
या दुर्घटनांप्रसंगी भेट दिली या दुर्घटनांप्रसंगी भेट दिली नाही
मणिपूर दंगल प्रकरण (भाजपचे राज्य सरकार)कर्नाटक ‘लव्ह जिहाद’ हत्या प्रकरण (काँग्रेस सरकार)
हाथरस बलात्कार (भाजपचे राज्य सरकार)राजस्थान कन्हैयालाल हत्या प्रकरण (काँग्रेस सरकार)
मुसावाला हत्या प्रकरण (पंजाबचे आप सरकार)प. बंगाल संदेशखाली प्रकरण (तृणमूल सरकार)
लखीमपूर-खेरी प्रकरण (उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार)प. बंगाल मुलीला मारहाण प्रकरण (तृणमूल सरकार)
सीएएविरोधी आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना भेट (आसाममधील भाजप सरकार)तामिळनाडू विषारी दारू मृत्यू प्रकरण (द्रमुक सरकार) हुतात्मा अग्निवीराच्या कुटुंबीयांना भेट (पंजाबमधील आप सरकार)पंजाब - होशियारपूर बलात्कार प्रकरण (राज्यात काँग्रेस सरकार)
 
 
Powered By Sangraha 9.0