मुंबई : १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे कृषी फीडर सोलरवर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात आपण सौर कृषी पंप योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत आता ९ लाख पंपांचा लक्षांक उपलब्ध आहे. त्यामुळे वित्तमंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी १ लाख १२ हजार लोकांना कनेक्शन दिले आहे. आता फक्त ३० हजार ८२१ मागणी बाकी आहे."
हे वाचलंत का? - केवळ पुस्तकी नव्हे तर निसर्गाचं ज्ञानही अवगत करावं : पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे
"सौर कृषी पंपामध्ये केंद्र सरकारचे ३० टक्के, राज्य सरकारचे ३० टक्के आणि ४० टक्के ग्राहकांचे पैसे होते. पण आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला असून त्याद्वारे ३० टक्के केंद्र सरकारचे, ६० टक्के राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडून फक्त १० टक्के पैसे घेण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के पैसे द्यायचे असून सरकार त्यांना ९५ टक्के पैसे सरकार देणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "जुनं कनेक्शन असणाऱ्यांना नव्याने पंप घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या फिडरचेच सोलरमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे फीडर सोलरवर जाणार आहेत. १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे कृषी फीडर सोलरवर जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहे," असेही त्यांनी सांगितले.