बेकायदेशीर धर्मांतरण : भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा मार्ग

05 Jul 2024 22:25:01
 Illegal conversion

“धर्मांतर करणार्‍या धार्मिक मंडळांना वेळीच रोखले नाही, तर देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल,” असे निरीक्षण नुकतेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. त्यानिमित्ताने बेकायदेशीर धर्मांतरण, त्यामागची कारणे आणि हिंदू समाजाने जागरुत राहण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...

तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवून आणणार्‍या मुस्लीम कट्टरवादाविरुद्ध आज संपूर्ण जग लढा देत आहे. हे इतके पद्धतशीर आणि सुनियोजित षड्यंत्र आहे की, लोकांना त्याबद्दल फार काहीच कल्पना नाही किंवा ज्यांना माहीत आहे, त्यांना त्याचा धोका अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळे हिंदू समाज एवढे मोठे षड्यंत्र गंभीरपणे घेत नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. अनेक ख्रिश्चन मिशनरी धर्मांतराच्या उद्देशाने अनुसूचित जाती आणि जमातींना लक्ष्य करत आहेत. या मिशनर्‍यांना बळ देणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारी आर्थिक रसद आणि मानवी सहकार्य. 200 वर्षांहून अधिक काळ, अनेक ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सनातन धर्माचे उच्चाटन करून भारतात ख्रिस्ती धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला आहे. 19व्या शतकातील मिशनरी आणि आजच्या मिशनरींमध्ये फरक एवढाच आहे की, पूर्वीच्या लोकांनी ते जाहीरपणे मांडले, तर आताचे मिशनरी काही कारणांमुळे पडद्याआड राहून आपले कार्य करीत आहेत.

‘प्यू रिसर्च’च्या मते, बहुसंख्य भारतीय ख्रिश्चन (54 टक्के) कर्मावर विश्वास ठेवतात, जी ख्रिश्चन संकल्पना नाही. अनेक भारतीय ख्रिश्चनांचा पुनर्जन्म (29 टक्के) आणि गंगा नदीच्या शुद्धीकरण शक्तीवर (32 टक्के) विश्वास आहे. आता ही दोन्ही मूळची हिंदू शिकवण. भारतीय ख्रिश्चनांसाठी इतर धर्मांशी संबंधित प्रथा पाळणेदेखील लोकप्रिय आहे. जसे की, दिवाळी साजरी करणे (31 टक्के) किंवा कपाळावर टिकली लावणे (22 टक्के), जी सामान्यतः हिंदू, बौद्ध आणि जैन स्त्रिया लावतात आणि ते अधिकृतपणे भारताच्या लोकसंख्येच्या केवळ 2.5 टक्के आहेत. दक्षिण भारतात देशातील सुमारे निम्मे ख्रिश्चन आहेत, तर भारताच्या विरळ लोकसंख्येच्या ईशान्य भागात ख्रिश्चन लोकसंख्येचा मोठा वाटा आहे, जिथे बहुतेक ख्रिश्चन आदिवासी समुदायाचे सदस्य आहेत.मग नेमके हे विश्लेषण काय सांगते? अधिकृत संख्या आणि अभ्यासानुसार, धर्मांतर करणार्‍यांपैकी निम्म्याहून अधिक हिंदू आहेत. त्रासदायक आणि चिंताजनक सत्य हे आहे की, या औपचारिक धर्मांतरांव्यतिरिक्त, अनेक एससी, एसटी आणि इतर उपेक्षित गरीब लोक, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, त्यांनी अधिकृतपणे त्यांचा धर्म बदललेला नाही.

कारण, या भीतीने ते सरकारी लाभ गमावतील. याचाच अर्थ एकूण धर्मांतरण खूप मोठ्या प्रमाणात आहे. धर्मांतर कायदेशीर तेव्हाच मानले जाते, जेव्हा ते स्वेच्छेने केले जाते. पण, आज मोठ्या प्रमाणात धर्मांतरण हे हिंदू धर्म, देवता आणि संस्कृती यांच्याबद्दल द्वेषनिर्मिती करून जाणीवपूर्वक केले जाते. मग हे मानवतेला अनुसरून कसे असेल? समाजसेवा ही नि:स्वार्थी असली पाहिजे, अन्यथा आपल्या समाजातील दुर्बलांची सेवा म्हणजे ईश्वरसेवा, या खोट्या श्रद्धेच्या नावाखाली मानवता आणि सनातन संस्कृती नष्ट करण्याचा हा आणखी एक डाव आहे. भारतावर राज्य करण्यासाठी ‘प्रॉक्सी’ म्हणून काम करणे हे धर्मांतराचे मुख्य ध्येय. दुर्दैवाने, या ख्रिश्चन धर्मांतरितांसाठी आरक्षण काढून टाकण्याची तरतूद राज्यघटनेत अजूनही समाविष्ट केलेली नाही. धर्मांतर करणारे बहुसंख्य ख्रिश्चन मूलतत्त्ववाद्यांसारखेच वागतात. त्यांना इतरांना प्रेरणा देण्यासाठी शिकवले जाते. त्यांनी त्यांचे तर्कशुद्ध विचार करण्याचे कौशल्य गमावले आहे आणि इतरांनीही तेच करावे, अशी त्यांची इच्छा. त्यांच्यापैकी बरेच जण मंदिरातील मिठाई खात नाहीत, मंदिराच्या परिसरात भेट देत नाहीत, त्यांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी देवाच्या प्रतिमांची उपस्थिती आवडत नाही आणि इतरांना सणाच्याही शुभेच्छा देत नाहीत.

ख्रिश्चन तज्ज्ञ त्यांना खूप चांगले धार्मिक शिक्षण देतात. बुद्धी भ्रमित करण्याचे काम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले जाते. नवीन धर्मांतरित लोक क्वचितच धार्मिक कार्यक्रम किंवा रविवारची प्रार्थना चुकवतात. त्यांची जीवनशैली धार्मिक गुरुंद्वारे ठरविली जाते. पहिले काही दिवस, धर्मांतरितांना थोडेफार पैसे किंवा इतर भेटवस्तूही मिळतात. धर्मांतर करणारे सहसा त्यांच्या जवळच्या किंवा ज्यांना समस्या आहेत, अशा लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करतात. हे नेटवर्क मार्केटिंगप्रमाणेच कार्य करते. अब्राहमिक धर्मांचा एक मूलभूत नियम आहे: आपला धर्म हा एकमेव खरा धर्म म्हणून पसरवणे. काही धर्माभिमानी ख्रिश्चनांचा असा गैरसमज की, अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करून ते त्यांना अनंतकाळाच्या नरकापासून वाचवत आहे. एकंदरीतच ख्रिश्चन धर्मात प्रभावी विपणन प्रणाली राबविली जाते. गरिबी, खोटे विमर्श व कथा आणि ज्ञानाचा अभाव यामुळे गरीब हिंदू ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या जाळ्यात अडकून पारंपरिक श्रद्धा सोडून देतात. सनातन धर्माशी परिचित नसलेल्या हिंदूंना ख्रिश्चन धर्म अधिक तार्किक वाटतो आणि ते त्यांच्यासोबतच्या वादात सहज पराभूतही होतात. पाश्चिमात्य आणि गोर्‍या लोकांनी अंगीकारलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे, ही गुलामगिरीची मानसिकता सदसद्विवेकबुद्धीला नष्ट करते.मानवतेवर विश्वास ठेवणारे आणि धर्मांतराला विरोध करणारे ख्रिश्चन चर्चचे एक पाद्री म्हणाले, “या जगाला देवाची पूजा करण्याचा एकच मार्ग का सांगावा? हिंदू धर्मातील विविधता आणि सौंदर्य आणि ही परंपरा जागतिक धर्माच्या विविधतेच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. तुम्ही भारतातून हिंदू धर्म काढून टाकला म्हणजेच; तुम्ही भारताचा आत्मा लुटला, जो त्याच्या विविधतेने ओळखला जातो. मला अजिबात आवडत नाही, जेव्हा कोणीतरी मुलाला त्याच्या आईपासून दूर नेते, माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, जगात आधीच खूप ख्रिश्चन आहेत.”

मग कोणती कृती आवश्यक आहे?

सर्वप्रथम कोणत्याही मिशनरी संस्थेला निधी देणे थांबवा, जी स्वतःला समाजसेवी म्हणून सादर करते. कारण, व्हॅटिकनचे आणि इतर सर्व वित्त बळजबरीने लोकांना ख्रिश्चन म्हणून धर्मांतरित करण्यासाठी वापरले जाते, अशा आशयाच्या बातम्या यापूर्वीही प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच प्रत्येक गावात, शहरात आधुनिक शिक्षण प्रणालीसह अधिक गुरुकुल आणि केंद्रीय विद्यालये तयार करा (नवीन शैक्षणिक धोरण, 2020). भगवद्गीता, रामायण, महाभारत, गौतम बुद्ध, गुरु गोविंद सिंग, भगवान महावीर आणि या महान राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि संस्कृती मजबूत करण्यास मदत करणारे सर्व काही आपल्या मुलांना शिकवा. कोणतीही जबरदस्ती किंवा धर्मविरोधी विमर्श तयार करून ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करण्यास प्रतिबंध करणारे कायदे करा; देशात बेकायदेशीर मिशनरी क्रियाकलापांवर कडक बंदी घाला. परकीय कार्यकर्ते आणि एजन्सी बनावट कथनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात धर्मांतर कसे करत आहेत, आणि ते हिंदू लोकांकडे कसे पाहतात, हे समजून घ्या.

‘चर्च ऑफ द टाइम्स’ने दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या अधिकृत खात्यावर अपलोड केलेल्या ‘साइन ऑफ द टाइम्स’ या व्हिडिओमध्ये, ख्रिस हॉजेसने भारतातील हिंदू लोकसंख्येचे वर्णन ‘दिशाहीन लोक’ म्हणून केले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या एका मिशनरीने त्यांना सांगितले की, भारत पृथ्वीवरील अशा ठिकाणांपैकी एक आहे, ज्यात दिशाहीन लोकांची संख्या जास्त आहे, जे एकमेकांशी संपर्क नसलेले आणि अगम्य आहेत. त्यांनी त्यांचे ध्येय उघड केले आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी निरपराध लोकांना कसे फसवले जाते, हे सांगितले. त्याने स्वतः 3,931 ‘आऊटरीच टीम्स’चे आयोजन केले, जे 15 उत्तर भारतीय राज्यांमध्ये प्रचार करण्यासाठी विखुरले आणि ‘मसीहा’ म्हणून प्रकट झाले. त्यामुळे ते आजारी नसलेले, पण आजारपणाचा दिखावा करणार्‍या सामान्य ख्रिश्चनांवर हात ठेवतात आणि आजारी लोक लगेच बरे होतात. त्यांनी वर्णन केले की, मिशनरी असुरक्षित लोकांचे शोषण करण्यासाठी भूतबाधेच्या अंधश्रद्धेचाही वापर करतात. त्यानंतर, त्यांना धर्मांतरित करणे अधिक सोपे जाते.
 
पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर

सामूहिक धर्मांतराच्या विरोधात लढताना मुघलांपासून हिंदूंना वाचवणार्‍या शीख धर्माची आजची परिस्थिती पूर्णपणे अजूनही समजू शकली नाही. गुरु गोविंद सिंग जी (दहावे गुरु) यांच्या दोन मुलांनी मुस्लीम होण्यास नकार दिला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आज दुर्देवाने त्यांचेच अनुयायी ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारत आहेत. त्यामागचे मुख्य कारणे म्हणजे, हिंदू धर्म आणि या महान देशाच्या महान संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात विष पेरणे, समजूतदारपणाचा अभाव आणि लोकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणारे खोटे विमर्श! म्हणूनच धर्मांतर करू इच्छिणार्‍या किंवा तसा मनातही विचार आणणार्‍या सर्वांना मी सनातन धर्माचे सखोल संशोधन करण्याचे आवाहन करतो. जर कोणी सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर निःसंशयपणे त्यांच्या लक्षात येईल की, हा धर्म अधिक वैश्विक आणि शांतताप्रिय आहे. इतरांची काळजी करू नका. हिंदू धर्मग्रंथांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शेजारच्या निष्पाप हिंदूंना (बौद्ध, शीख, जैन) त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी मदत करा. जर एखाद्या व्यक्तीला कायद्यानुसार धर्मांतर करायचे असेल, तर त्याला तशी परवानगी आहे. परंतु, खोट्या कथनांनी त्यांच्या मनात गोंधळ निर्माण करणे आणि त्यांच्या स्वधर्माबद्दल तीव्र द्वेष निर्माण करणे, हे मानवतेच्या विरोधात आहे. इतरांचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने मानवतावादी सेवा करू नये. आता वेळ आली आहे की, आपण जागे होऊया आणि कायदेशीर आणि सामाजिक दोन्हीदृष्ट्या धोक्याचा सामना करूया.
 

पंकज जयस्वाल



Powered By Sangraha 9.0