पात्र फेरीवाल्यांना हटवल्यास कारवाई होणार

05 Jul 2024 19:29:15

rahul narvekar
 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वेनुसार जे फेरिवाले पात्र ठरलेले आहेत, त्यांना कोणीही हटवू शकत नाही. जर त्या पात्र फेरिवाल्यांना हटवले जात असेल, तर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी दिला. विधानसभेत शुक्रवारी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मुंबईसह राज्यातील इतर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
 
पावसाळा सुरु असताना त्यांच्यावर कारवाई केली जाते हे अन्यायकारक आहे. ३० लाख कुटुंबाचा हा प्रश्न आहे, त्यांना कायदेशीर अधिकार देऊन सन्मानाने जगता याले पाहिजे. हातावरचे पोट असलेल्या गरीब लोकांचा हा प्रश्न असून केंद्र सरकार प्रमाणे राज्यात जोपर्यंत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. या मुद्द्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. ते म्हणाले, केंद्र सरकारने फेरीवाला कायदा करून १० वर्षे झाली, तरी राज्यात अद्याप ठोस धोरण नाही.
 
त्यासंदर्भातील कमिट्या झालेल्या नाहीत, फेरीवाल्यांची परिस्थीती अवघड झालेली आहे. सरकार एकीकडे फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देते आणि त्यांच्याच दुकानावर कारवाई करुन ती तोडली जातात, अशाप्रकारे आपण त्यांच्यावर अन्याय करत आहोत. याविषयावरील स्थगन प्रस्ताव नाकारला असला तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवार, दि. ९ जुलै रोजी या मुद्द्यावर चर्चा आयोजित करू, असे आश्वस्त करून सुप्रीम कोर्टाच्या सर्वेनुसार जे फेरिवाले पात्र ठरलेले आहेत त्यांना कोणीही हटवू शकत नाही आणि जर त्या पात्र फेरिवाल्यांना हटवले जात असेल तर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
Powered By Sangraha 9.0